Wednesday, November 23, 2016

शहाण्यांचा मुर्खपणा


'शहाण्यांचा मुर्खपणा' या शिर्षकाखाली विधवांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गो.ग. आगरकर यांनी लेख लिहिल्याची इतिहासात नोंद आहे. परंतु आजच्या घडीला सुशिक्षित राजकारणी तसेच तथाकथित कायमस्वरूपी सरकार विरोधक ज्याप्रकारे आणि ज्या स्थितीत सरकार द्वेष्ठेपणा दाखवतं आहेत अथवा राजकारण करत आहेत, ते पाहता हा शहाण्यांचा मुर्खपणा आहे, असेच म्हणावेसे वाटते.

दिल्ली विधानसभेत बहुमतावर स्वार असलेले नामधारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे माजी केंद्रीय कर्मचारी आहेत तसेच आदरणीय    आण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यातील एकेकाळचे त्यांचे सहकारी आहेत. बहुधा केजरीवालांचा हा भूतकाळच आजवर त्यांच्या पाठीशी असल्यामुळे जनतेने त्यांना राजकारणात प्रवेश करण्यास दिल्लीत परवानगी दिली होती. परंतु राजकारणाचा गंध ही नसलेले केजरीवाल, राजकारणात आल्या पासून सरळ सरळ कोणावरही काहीही आरोप करतं सुटले आहेत. लोक त्यांचा हा बालिषपणा हसण्यावरी घेतं असले तरी, दिल्लीतील जनतेने दिलेल्या बहुमताचा हा अनादर आहे,हे आपणास विसरुन चालणार नाही. मान्य आहे, केंद्रीय सरकारी पक्षाच्या विरोधकाच्या भूमिकेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी केजरीवालांची ही धडपड सुरू असावी! परंतु शहाणे असताना देखील ते असे मुर्खासारखे वागत आहेत.

केजरीवालांनी केलेल्या आरोपांपैकी एक आरोप असा आहे की,सरकारने म्हणे नोट बंदीचा निर्णय घेऊन आठ लाख कोटींचा घोटाळा केला, तसेच बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली. पण जनता संभ्रमात आहे, की हे शहाणे आहेत, माजी केंद्रीय कर्मचारी आहेत, तरीही हे दिशाभ्रम करतायत की स्वतःच संभ्रमात आहेत? जनतेचा पैसा बँकेत जमा आहे. त्याचवेळी बँकांनी उद्योगपतींची कर्ज नावे  'Non Performing  Assets' यादीमध्ये जमा केली, याचा संबंध लावला तरी ठीक, परंतु हा घोटाळा कसा म्हटला जावू शकतो? आणि तसेही कोणाचेही कर्ज माफ केले नसून त्यांना नॉन परफॉर्मिंग असेट्स यादी मध्ये टाकल्याचे खुद्द SBI अध्यक्षांनी सांगितले आहे. तरीही हे केजरीवाल नावाचे व्यक्ती केवळ राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी या गोष्टीस पुन्हा पुन्हा मांडत आहेत. आणि असे इतरही काही बिनबुडाचे आरोप ते पंतप्रधान मोदींवरती करत सुटले आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आपणही आहोत हे सिद्ध करण्यासाठी धडपड कारणाऱ्यांच्या यादीत आपलाही समावेश व्हावा यासाठी, चिट फंड घोटाळ्याचे आरोप असलेल्या तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममताजी देखील धावाधाव करत आहेत. खरे तर या राजकीय विरोधकांना जनतेचे काहीही देणेघेणे नाही, यांना केवळ सरकारच्या नोट बंदीच्या निर्णयाचे राजकारण करायचे आहे, आणि त्यावर स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे. त्यामुळे यास शहाण्यांचा राजकीय मुर्खपणा म्हणावे नाहीतर दुसरे काय म्हणावे?

उत्तरप्रदेशात पुढीलवर्षी विधानसभेच्या निवडणुका होताहेत. त्यामुळे खरंतर 'सप', 'काँग्रेस' आणि 'बसप' या निर्णया विरोधात उड्या मारत आहेत. कारण विरोध करणे हा विरोधकांचा हक्क असल्यागत आपल्या देशात राजकीय पुढारी विरोध करत असतात. तसेच इतरही काही शहाण्या परंतु सरकारच्या नोट बंदी निर्णयानंतर मुर्खासारखे वागणाऱ्या राजकारण्यांबाबत बोलावे लागेल, कारण त्यांचे ही हात दगडाखाली अडकलेले आहेत.

सरकाने 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्रास जरी होत असला, तरी या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे, कारण काहीतरी वेगळं होत असल्याबद्दल लोक समाधानी आहेत. सरकारमध्ये सत्तेत कोणता पक्ष आहे हे न पाहता त्यांनी घेतलेला निर्णय किती प्रभावी ठरू शकतो, या दृष्टीने ही विचार करणे आवश्यक आहे. आणि निर्णयाचे फळ येणारा भविष्यकाळ ठरवेल हे निश्चित आहे, कारण असे निर्णय काही विकसित देशांनी त्यांच्या इतिहासात घेतले होते, म्हणुनच आज ते महासत्ता म्हणून मिरवू शकत आहेत. त्यामुळे शहाण्या असलेल्या या विरोधकांनी समर्थन करायचे नसेल तर किमान शांत तरी बसावे.


Wednesday, September 28, 2016

एक मराठा लाख मराठा !?!


कोपर्डीतील घटनेचे पडसाद म्हणून ठीक ठिकाणी मराठा समाजाकडून अत्यंत शिस्तबद्ध रीतीने मूक मोर्चे काढले जात आहेत. (नक्कीच स्वागतहार्य आहे, समाज जागृत होत असल्याचे हे लक्षण आहे.)
परंतु कोपर्डी बलात्कार आणि हत्याकांड घटनेत बलात्कार करणारे नराधम दलित समाजातील होते म्हणून एका विशिष्ठ समाजास दोष देणे योग्य नाही...
आजवर अनेक विचित्र मानसिकतेच्या लोकांनी अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले आहेत.
ते मराठा असोत वा दलित,
मग आजच का, या मोर्चे बांधणीचा अट्टाहास?
ते तरुण दलित होते म्हणून?
की खरंच समाज जागृत झाला आहे म्हणून?
म्हणजे इतर समाजातील विकृत लोक बलात्कार करत नाहीत असंच म्हनायचं?
यावेळी केवळ दलिताकडून मराठ्यांवर अत्याचार असा जो जातीय रंग पसरवला जात आहे तो योग्य नाही(हे पसरवण्यात प्रसारमाध्यमे आघाडीवर आहेत)...

मोर्चे निघत असताना बलात्कार थांबले आहेत का?
मागच्या आठवड्यात एक घटना उघड झाली आहे, जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर सतत तीन वर्षे बलात्कार करून तिचा लैंगिक छळ केला!
मग तो दलित होता की मराठा की आणि कोणी यात तथ्य नाही. तो केवळ एक वासनांध नर होता...
हे मोर्चे समाज भावनांचा उद्रेक दर्शवत असले तरी यामधून जी फलश्रुती होणार आहे, जी शिकवण मिळणार आहे,
त्यामधून या पुरुषप्रधान संस्कृतीस नर आणि मादी या पलीकडील नात्यांचा पडत चाललेला विसर आणि पालक आणि पाल्य यांमधील हरवलेला संवाद सुधारण्यासाठी काही करता येते का हे या समाज बांधवानी विचारात घ्यायला हवे.

'एक मराठा लाख मराठा' चा आवाज देत महाराष्ट्रभर मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाकडून अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धरीतीने या मोर्च्यांचे आयोजन होत आहे. आपल्या मागण्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या या महाराष्ट्रीयन मराठा क्रांती मूक महामोर्च्याची इतिहासात नक्कीच नोंद होणार आहे.
एवढ्या मोठया संख्येने सहभागी होत समाजाने एकत्रित येऊन मोर्चे काढण्याची बहुधा हि पहिलीच वेळ आहे,
असे असले तरी येथे एक गोष्ट स्पष्टपणे विचारावीशी वाटते की,
आज एकत्रित आलेला अखिल मराठा समाज खरंच एकत्रित आहे का हो?
येथे घराघरात, भाऊबंदकीमध्ये भावा-भावामध्ये वाद आहेत (ते इतरांमध्ये पण असतील ही, परंतु आपण घर पातळीवर एकजूट नाही आहोत, तर समाज पातळीवर कसे असू?),
आपली वृत्ती अनेक वेळा खेकड्याप्रमाणे दिसून येते, एकमेकांचे पाय ओढण्याची...
आपल्या गावामधील, भाऊबंदकीतील कष्टाळू आणि तत्पर लोकांना आपण पुढे जाण्याची संधी देत नाही, उलट त्यांच्यासोबत कुत्सित बुद्धीने वागतो,
त्यात बांधला बांध असून शेतीचे वाद, गावातील राजकारण, गटबाजी यामुळेच आजवर महाराष्ट्रात सर्वाधिक असलेला मराठा समाज मागास होत चालला आहे,
प्रमाणात इतर समाज पाहिला, तर ते भाऊबंदकीत आणि संघटन पातळीवर देखील एकत्रित असतात, त्याचा परिणाम म्हणूनच आज मराठा समाजावर मोर्चे काढण्याची वेळ आली आहे.

येथे मराठा समाजामध्ये दोन भावांमध्ये, दोन घराण्यांमध्ये, दोन गल्ल्यामध्ये, दोन गावांमध्ये वाद आहेत.
मग आपण एकत्रित आहात, हे मान्य करायचे कसे?

जर अखिल मराठा समाजास समाज परिवर्तन घडवून आनायचे असेल, सर्व समाज संघटित करून सर्वांना एकत्रित पुढे न्यायचे असेल तर त्यासाठी आधी स्वतःपासून सुरुवात करत, मग कुटुंब, मग गाव आणि मग मराठा समाज असा विचार करत काही बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीचे वाद, वयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवतं एकत्रित येऊन एकमेकास समजून घेण्याची गरज आहे.

तरचं सर्व समाज संघटित होईल आणि सर्वांना सोबत पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.
विचार बदला, मार्ग नक्की सापडेल...!