Wednesday, April 26, 2017

दुर्ग भ्रमंती - रयतेचा रायरेश्वर

रायरेश्वर मंदिर 
रायरेश्वर. कोणी याला किल्ला म्हणेल. कोणी डोंगर. तर कोणी केवळ रायरेश्वराचे मंदिर म्हणेल, परंतु रायरेश्वर म्हटले की, ‘स्वराज्य स्थापनेची शपथ’ हा इतिहासातील प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. इतिहासातील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात काही निवडक मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, आणि रायरेश्वर पठाराची इतिहासात नोंद झाली. सतराव्या शतकाच्या मध्यावर शिवशाहीतील ही प्रेरक घटना त्यावेळी घनदाट अरण्यात असलेल्या रायरेश्वराच्या साक्षीने घडली. रायरेश्वर पठारावरील रायरेश्वर याठिकाणी महादेवाचे मंदिर आहे. रायरेश्वराच्या मंदिरात सभामंडप, समोर भग्न अवस्थेतील नंदी आणि महादेवाची पिंड असलेले छोटेसे गर्भगृह आहे. इतिहासातील नोंदीनुसार मूळ रायरेश्वर मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे. मंदिरपरिसरात छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेत असल्याचा एक फोटो देखील आहे. तसेच रायरेश्वर पठारावर पांडव लेण्या देखील आहेत. या पांडव लेण्यापर्यंत पावसाळ्यात जाणे अशक्य असल्यामुळे पावसाळा नसताना या परिसरात जाणे सोयीचे आहे.
रायरेश्वराच्या डोंगरावर केंजळगडाच्या वाटेने चालत गेल्यानंतर समोर आपणास विस्तीर्ण पसरलेले पठार दिसते. रायरेश्वराच्या या पठारावर वर्षा ऋतूमध्ये विविध प्रकारची फुले पहावयास मिळतात. तसेच पठारावर ग्रामस्थांकडून भात शेती केली जाते. भातशेती कशी असते, हे पाहण्यासाठी या परिसरात आपण जावू शकतो. वातावरण चांगले असेल तर रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून आपली चौफेर नजर जावू शकते. रायरेश्वराच्या पठारावरून, पठार फिरत असताना परिसरात असलेले पांडवगड, विचित्रगड, वैराटगड, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, चंद्रगड, रुद्रमाळ, मंगळगड, मकरंदगड हे किल्ले दिसतात.

रायरेश्वराचा इतिहास :
किल्ला म्हणता येईल, असे काहीच अवशेष या परिसरात नाहीत, सध्याच्या परिस्थितीत काही ग्रामस्थ मंदिराच्या शेजारी घरे बांधून राहतात. रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर खुप प्राचीन आणि पांडवकालीन आहे. स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठेशाहीच्या इतिहासात खुप महत्व आहे.

रायरेश्वरला जाण्यासाठीचा मार्ग :
रायरेश्वर पठार पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. पुण्याहून एस. टी. महामंडळाच्या बसने भोरपर्यंत गेल्यानंतर, पुढे केंजळगड आणि रायरेश्वरला जाता येते. रायरेश्वरला जाण्यासाठी भोरमार्गेच जावे लागते.

टिटे धरणाजवळून : पुण्याहून भोरमार्गे आंबवडे (भोर) गावातून टिटे धरणाजवळून रायरेश्वरावर जाता येते. पावसाळ्यातील दुर्ग भ्रमंतीसाठी ही वाट थोडी अवघड आहे.

केंजळगडमार्गे : केंजळगडावरून रायरेश्वरला जाण्यासाठी रस्ता आहे. केंजळगडाच्या पायथ्यापासून पुढे जाणारा एक डांबरी रस्ता, रायरेश्वराच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जातो. या वाटेने आपण वाहन घेवून रायरेश्वराच्या पायथ्यापर्यंत जावू शकतो. यामार्गे रायरेश्वराच्या पायथ्यापासून काही ठिकाणी शिडीने तर काही ठिकाणी पायऱ्यांच्या वाटेने रायरेश्वराचा डोंगर चढावा लागतो. डोंगर चढून वर गेल्यानंतर समोर विस्तीर्ण पठार नजरेस पडते. तेथून पायवाटेने रायरेश्वराच्या मंदिराकडे जाताना पठारावरील भातशेती दिसते. तसेच पावसाळ्यात या परिसरात गेल्यानंतर, पठारावर दाट धुके दिसते.

रायरेश्वराच्या पठारावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

रायरेश्वर पठार : रायरेश्वर डोंगराच्या पायथ्यापासून केंजळगडमार्गे डोंगर चढून वर गेल्यानंतर समोर रायरेश्वराचे विस्तीर्ण पठार नजरेस पडते. रायरेश्वर पठाराची उंची साधारणता ४००० मीटरच्या जवळपास आहे. या पठारावर विविध प्रकारची फुले नजरेस पडतात. संपूर्ण पठारावर रानफुले उमललेली आहेत. पाय वाटेने रायरेश्वराच्या मंदिराकडे जात असताना वाटेवर तलाव आहे. पावसाळ्यात या तलावात स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी साचलेले असते. तलावाच्या या परिसरात खुप मोठ्या प्रमाणात धुके पसरलेले असते. त्यामुळे धुके असताना सावधपणे पायवाटेने पुढे जाणे आवश्यक आहे. रायरेश्वराच्या पठारावर पावसात भातशेतीची मशागत करणारे शेतकरी बांधव देखील आपल्या नजरेस पडतात.

पांडव लेण्या : रायरेश्वराच्या पठारावर फिरत असताना एका ठिकाणी गुहे सारख्या, दगडात कोरलेल्या पांडव लेण्या आपल्या नजरेस पडतात. पावसाळ्यात या ठिकाणी प्रचंड धुके आणि पाणी असते. पठारावरून नाल्यामार्गे पाणी खाली दरीमध्ये पडत असताना दिसते. याच परिसरात छोट्यामोठ्या अशा नाल्यांना धबधब्याचे स्वरूप आल्यासारखे दिसते.

पाण्याचे टाके : रायरेश्वर मंदिराच्या परिसरात गाववस्तीकडे जात असताना वाटेवर पाण्याचे टाके आहे. गावातील राहणारे लोक याच पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. पाण्याच्या टाक्यात दगडामध्ये कोरलेले एक गाईचे मुख आहे. या गाईच्या मुखातून सतत टाक्यामध्ये पाणी पडत असते.

रायरेश्वर मंदिर : शेवटी रायरेश्वराच्या मंदिराजवळ पोचल्यानंतर असे लक्षात येते की, केवळ ग्रामीण भागातील खेडेगाव असल्यासारखा हा परिसर आहे. रायरेश्वराच्या मंदिरात महादेवाची पिंड आहे. आणि भग्न अवस्थेतील नंदीची मुर्ती आहे. तसेच मंदिराचा देखील वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला असावा हे तेथील परिस्थितीवरून लक्षात येते. मंदिरावर पत्रे टाकलेले आहेत. परिसरात राहणारी ग्रामस्थ मंडळी मंदिरात सर्व व्यवस्था पाहतात. हे मंदिरातील स्वच्छता पाहून लक्षात येते.

मंदिर परिसरातील शिवाजी महाराजांची मुर्ती :
रायरेश्वर मंदिराच्या परिसरात, मंदिराच्या एकदम समोर छत्रपती शिवाजी महाराजांची एक आसनस्थ मुर्ती बसवण्यात आलेली आहे. तसेच मंदिराच्या परिसरात एक विस्तीर्ण सभामंडप देखील आहे. येथील ग्रामस्थांनी सांगितले, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री दिवशी रायरेश्वराच्या दर्शनासाठी याठिकाणी लोकांची गर्दी असते.
किल्ला म्हणून कोणतेही अवशेष रायरेश्वरी अस्तित्वात नसले, तरीही मराठेशाहीच्या इतिहासातील महत्वपूर्ण क्षण रायरेश्वराच्या मंदिराने अनुभवलेला असल्यामुळे या परिसरास विशेष महत्व आहे. आणि हे महत्व, हे पावित्र्य हा परिसर आज ही टिकवून आहे. त्यामुळेच सूर्यास्ताच्या वेळी रायरेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या छत्रपतींच्या मुर्तीचे रूप खुप मनमोहक दिसते.
स्वराज्य स्थापनेच्या शपथेचा साक्षीदार असलेला ‘रयतेचा रायरेश्वर’ परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. आपण पर्यटक म्हणून या परिसरात गेल्यानंतर, छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष असलेल्या या रायरेश्वर पठाराची निसर्गरम्य दृश्ये डोळ्यांमध्ये साठवून परतीच्या वाटेला निघत असताना, प्रसन्न चित्ताने डोंगराच्या पायऱ्या उतरू लागतो.

हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 

Monday, April 17, 2017

दुर्ग भ्रमंती- पोलादी लोहगड

                   
लोहगड. लोहगड म्हटल की पुणे आणि परिसरातील दुर्ग प्रेमींना आठवतो तो हिरवाईने नटलेला विंचू कडा (विंचू काटा) आणि पावसाळा असो अथवा हिवाळा, लोहगडावर पसरलेले दाट धुके. लोहगड हा पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळ असलेला गिरीदुर्ग आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे निसर्ग सौंदर्य या गडाच्या सभोवती आपल्याला अनुभवण्यास मिळते. मावळ परिसरातील पवना नदीच्या खोऱ्यात असलेला आणि बोर घाटाचा संरक्षक म्हणून अभेद्यपणे उभा असलेला लोहगड हवा पालटासाठी खुप चांगले ठिकाण आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबई परिसरातील दुर्गप्रेमी सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी गडावर येत असतात. पुणे-लोणावळा लोकलने आल्यानंतर मळवली रेल्वे स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने मळवली गावात सर्व सुविधा आहेत. लोहगड परिसरात विसापूर (संबळगड), तुंग (कठीणगड) आणि तिकोणा (वितंडगड) हे किल्ले आहेत. तसेच भाजे आणि बेडसे या बौद्ध कालीन लेण्या देखील या परिसरात आहेत.
                 लोहगडाच्या पायथ्यापर्यंत वाहन घेवून जाता येते. मळवली गावातून गडाकडे जात असताना वाटेवर ‘गायमुख’ खिंड लागते. गायमुख खिंडीतून उजवीकडे लोहगड आणि डावीकडे विसापूर आहे. लोहगडाच्या या वाटेवर लोहगडवाडी हे गाव आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून पायऱ्या आहेत. आपण जसे गड चढू लागतो, तसे आपल्याला लोहगड परिसरातील निसर्ग सौंदर्य दिसू लागते.

लोहगडाचा इतिहास :
लोहगड केंव्हा बांधण्यात आला याची इतिहासात नोंद नाही. परंतु गडाच्या अभेद्य आणि पोलादी तटबंदीवरून गडाच्या इतिहासाबद्दल कयास बांधला जातो. लोहगडाजवळ दगडात कोरण्यात आलेल्या  भाजे आणि बेडसे या बौद्धकालीन लेण्या आहेत. त्यापूर्वी, म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे सांगण्यात येते. गडावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या सर्व राजवटीनी राज्य केलेले आहे. इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदशाहने निजामशाहीची स्थापना केली. त्यावेळी पुणे परिसरातील बहुतेक सर्व किल्ले जिंकून घेतले होते. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होता. इतिहासात अशी नोंद आहे की, इ. स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा निजाम शाह दुसरा बुर्‍हाण निजाम लोहगडावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये लोहगड आदिलशाहीच्या आधिपत्याखाली आला. त्यानंतर कालांतराने इ.स. १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला. त्यावेळी लोहगड–विसापूर हा परिसर स्वराज्यात सामील करून घेतला. इतिहासातील नोंदीनुसार इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात लोहगड मोगलांच्या स्वाधीन करण्यात आला होता. त्यानंतर १६७० मध्ये झालेल्या लधाईमध्ये मराठ्यांनी मोघलांकडून किल्ला परत जिंकून घेतला. त्यानंतर पहिल्या सुरत लुटीच्या वेळी, लुटलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर ठेवली होती. इ.स. १७१३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे यांना दिला होता.
लोहगड इ.स. १७२० मध्ये कान्होजी आंग्रे यांच्याकडून पेशवाईकडे आला. त्यानंतर इ.स. १७८९ मध्ये नाना फडनीसांनी किल्ल्याचे बांधकाम करून घेतले. पुढे इ.स. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
लोहगडवाडीतून गडावर जात असताना वाटेवर चार दरवाजे लागतात. या दरवाज्यांच्यामध्ये असलेल्या नागमोडी वाटेने गडाकडे जावे लागते. पावसाळ्यामध्ये या वाटेवर पाणी आणि शेवाळे असते, त्यामुळे गडावर जात असताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
  
गणेश दरवाजा : गणेश दरवाज्यावर काही शिलालेख लिहिलेले आहेत. त्यावरून या दरवाज्याविषयी माहिती मिळते. दरवाजाच्या दोन्ही बाजूस गणेशाच्या मुर्ती आहेत. तसेच दरवाज्यावर लोखंडी अणकुचीदार खिळे आहेत. गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने गणेश दरवाजा महत्वाचा आहे.

नारायण दरवाजा : नारायण दरवाजा पेशवाईत नाना फडनीसांनी बांधला होता. दरवाज्याच्या परिसरात धान्य साठवण्यासाठी एक भुयारी धान्य कोठार असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. गडावरील मुख्य दरवाज्यांपैकी नारायण दरवाजा आहे.

हनुमान दरवाजा : हनुमान दरवाजा हा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे. हनुमान दरवाज्यामधून गडाच्या आवारात प्रवेश करता येतो. हनुमान दरवाज्यामधून पुढे गेल्यानंतर आपण गडाचा परिसर पाहू शकतो. या परिसरात माकडांचा वावर जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे पर्यटकांनी सोबत नेलेल्या वस्तू माकडे हिसकावून घेणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. गडावर वास्तुंचे काही भग्न अवशेष आहेत.

महादरवाजा: महादरवाजा लोहगडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. नागमोडी वाटा पार करून आपण महादरवाज्याच्या पायथ्यापर्यंत पोचतो. त्यानंतर उंचावर असलेल्या गडाकडे जात असताना काही पायऱ्या चढून जावे लागते. महादरवाज्याचे काम नाना फडणीसांनी पूर्ण करवून घेतले होते. महादरवाज्यातून गडावर पोचल्यानंतर समोर एक मंदीर दिसते.

लोहगडावरील राजाराणीचे मंदीर : गडावर प्रवेश केल्यानंतर भग्न अवस्थेतील काही वास्तू आहेत. त्यामध्ये हे पडझड झालेले राजाराणीचे मंदीर देखील आहे. इतिहासातील नोंदीनुसार ही एका राजपूत किल्लेदाराच्या बायकोची समाधी असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या जवळच शेजारी राजसदर आणि लोहारखान्याचे अवशेष आहेत. मंदिराच्या बाहेर चुन्याचा घाना बनवण्याची गोलाकार तळी आहे. त्याच्या जवळच ध्वजस्तंभ आहे, त्यावर भगवा जरीपटका अखंड फडकत असतो. भग्न अवस्थेतील या वास्तूंच्या परिसरात एक तोफ लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या पुढे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. राजाराणी मंदिराच्या पुढे गेल्यानंतर लक्ष्मी कोठी आणि शिवमंदिर आहे.

लक्ष्मी कोठी: लक्ष्मी कोठी ही दगडांमध्ये कोरलेली गुहा आहे. येथे लोमेश ऋषींनी तपस्चर्या केल्याचे सांगण्यात येते. गडावरील सर्वात पुरातन वास्तूंपैकी लक्ष्मी कोठी ही गुहा आहे. लक्ष्मी कोठीला तळ मजला देखील आहे. पावसाळ्यामध्ये या कोठीमध्ये काही प्रमाणात पाणी साठलेले असते. पर्यटक गडावरील वास्तव्यासाठी लक्ष्मी कोठीचा वापर करतात.

शिवमंदिर : गड परिसरात भग्न अवस्थेतील शिवमंदिर आहे. मंदिराच्या पुढे एक छोटासा तलाव आहे. हा छोटासा तलाव अष्टकोनी आकाराचा आहे. या तलावाच्या बाजूस पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेले टाके आहे. शिवमंदिराचा जीर्नोधार करण्यात आलेला आहे. 

बावन टाकं : शिवमंदिर परिसरासह गड माथ्याच्या परिसरात ४० पेक्षा अधिक पाण्याची टाकी आहेत. त्यामध्ये नाना फडणीसांनी बांधलेल्या टाक्यांमध्ये बावन टाके गडावरील सर्वात मोठे टाके आहे. नाना फडणीसांनी हे टाके बांधल्याचा विशेष उल्लेख असलेला शिलालेख या टाक्यावर आहे.

पीर बाबा : टाक्याच्या जवळ उंचावर एक पीर बाबाच ठिकाण आहे. दर वर्षी या ठिकाणी पीर बाबाचा उरूस असतो, असे स्थानिकांकडून सांगण्यात येते.

विंचू कडा (विंचू काटा) : विंचू कडा (विंचू काटा) म्हणजे खुप लांब आणि रुंद अशी गडाची माची आहे. लोहगडावरून पाहिले असता गडाची ही माची विंचवाच्या नांगीसारखी दिसते, त्यामुळे यांस विंचूकाटा किंवा विंचूकडा असे म्हणतात. विंचू कडा (विंचू काटा) हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. कारण या माचीवरून गडाच्या आजूबाजूचा परिसर खुप मनमोहक दिसतो. विंचू कड्याच्या टोकावर एक बुरुज आहे. या बुरुजावरून परिसरातील दूरवरचा भाग नजरेच्या टप्प्यात येतो. 
भक्कम आणि संरक्षक तटबंदीत उभारलेला गड कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण लोहगड आहे. गडावर असलेल्या संरक्षक तटबंदी भेदून आक्रमण करणे शत्रू पक्षास खुप अवघड होते. त्यामुळे इतिहासात हा गड भक्कम अवस्थेत उभा होता. आज ही गड तसाच उभा आहे. केवळ गडावरील वास्तू नामशेष झाल्या आहेत. 
लोहगडावरून सह्याद्रीचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गडावर गर्दी करत असतात. यावेळी गड परिसरातील हिरवाईने नटलेले निसर्ग सौंदर्य एखाद्या निसर्ग चित्रासारखे दिसते. हे निसर्ग सौंदर्य आपल्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. हा अनुभव घेतल्यानंतर गड परिसर सोडून परत येण्यास नको वाटते.

Friday, April 14, 2017

शेतकरी संपावर गेला तर ?

         
   उत्तर प्रदेशात ज्या निकषांचा आधार घेवून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली त्या निकषांचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी दिली जावू शकते, किंवा जिल्हा बँकांकडून एक लाखापेक्षा कमी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी महाराष्ट्र सरकारने मागवली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या बातम्या केवळ प्रसार माध्यमातच आहेत का? सरकारी पातळीवर याबाबतीत काही हलचाली सुरु आहेत? याचा संक्षिप्त आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्षात दिसले की, माध्यमांकडून तत्सम आणखी काही बातम्या दाखवल्या जात आहेत. महाराष्ट्रातील काही गावांमधील ग्रामस्थ शेतकरी संपावर जाणार आहेत? पुढील वर्षी ते काहीच पिकं घेणार नाहीत! कर्जमाफी देणे अथवा न देणे यापेक्षा शेतकरी संपावर गेला तर काय? हा अधिक गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर संपावर जाण्याची वेळ का यावी? याचा विचार केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव आणि राजकीय चढावोढ हे एक कारण असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती देखील यास कारणीभूत आहे.

              देशाच्या एकूण सिंचन क्षेत्रापैकी १८% च्या जवळपास महाराष्ट्रात सिंचन क्षेत्र आहे. महाराष्ट्राच्या एकूण ३०७.६ लाख हेक्टर भूप्रदेशापैकी सुमारे २२५.७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण पिकाखालील क्षेत्र आहे. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या एकूण भूप्रदेशापैकी सुमारे २/३ क्षेत्र हे पिकांखालील क्षेत्र आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी मदत महणून कर्ज देण्यात जिल्हा सहकारी बँका, नाबार्ड आणि इतर बँकांची भूमिका महत्वाची असते. शेतकरी काही खाजगी सावकारांकडून देखील कर्ज घेतात. या सर्व गोष्टींचा विचार केला तर, शेतकऱ्यांना मुबलक कर्ज स्वरूपातील पैसा उपलब्ध असला तरी पाण्याअभावी नुकसानीतील शेती करावी लागते. कोरडवाहू शेती करावी लागते. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान देखील यास कारणीभूत आहे. याचा परिणाम म्हणून शेतीसाठी कर्ज- कोरडवाहू शेती –शेतमालाला हमीभाव नाही -पुन्हा कर्ज –आत्महत्या -दारिद्र्य हे कालचक्र शेतकऱ्यांच्या मागे सुरु होते. यावरती राज्यसरकारला उपया शोधायचा असेल तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे तसेच महाराष्ट्र राज्य सिंचन आयोग – १९६२ च्या शिफारशींवर काम करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य सिंचन आयोग - १९६२ : महाराष्ट्रातील सिंचन आणि जलसंपत्ती विकाससंबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी स. गो. बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ७ डिसेंबर, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य सिंचन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. १९६२ मध्ये या आयोगाने आपला अहवाल सादर केला. अहवालात काही शिफारशी करण्यात आल्या, त्यानुसार
  • ज्या प्रदेशात प्रवाही सिंचन पद्धती राबवणे अशक्य आहे, तेथे विहीरीसारखी सिंचन साधने बांधण्यात यावीत.
  • कालवे आणि उपकालवे ज्या भागातून जातील,  त्या भागातील ग्रामीण जनतेच्या घरगुती पाणी पुरवठ्याच्या गरजा विचारात घेतल्या जाव्यात.
  • प्रकल्पातील निर्वासित लोकांचे प्रत्यक्ष पुनर्वसन करण्याची जबाबदारी राज्यशासनाने घ्यावी.
  • दर १० ते १५ वर्षांनी सिंचन धोरणाचे पुनर्विलोकन करण्यासाठी खास चौकशी आयोगाची नेमणूक करावी.
  • अधिक पाणी आवश्यक असणार्‍या उद्योगांना पुरेसे पाणी आहे त्याचा प्रदेशात उद्योग उभारणीस परवानगी देण्यात यावी.
             त्यावेळी सत्तेत असलेल्या राज्य सरकारकडून वेळोवेळी या समित्यांच्या शिफारशी विचारात घेण्यात आल्या. तसेच नवीन समित्या देखील स्थापन करण्यात आल्या. परंतु या शिफारशींचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी विचार करण्यास दिरंगाई करण्यात आली. त्यावेळची राजकीय इच्छाशक्ती, आणि काही प्रादेशिक कारणे यामुळे खास करून पश्चिम महाराष्ट्रात सिंचन क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळेच आज पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकर्यांपेक्षा सुस्थितीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्र देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रमाणात अधिक आहे.
सत्यशोधन समिती (सुकथनकर समिती) –१९७३ : १९७२ मधील दुष्काळाच्या पार्श्र्वभूमीवर सुकथनकर समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने पाटबंधारे विकास,  भूजलपातळी,  पिण्याचे पाणी या विषयांचा विशेष अभ्यास केला होता. सुकथनकर समितीच्या शिफारशींनुसार,
  • अवर्षणप्रवण क्षेत्रात मृदा आणि जलसंधारणाची कामे एकात्मिक पद्धतीने पाणलोट क्षेत्र आधारावर करण्यात यावीत.
  • पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मृदा आणि जलसंधारणासाठी लोकशिक्षणाला महत्त्व देण्यात यावे.
  •  लघुपाटबंधारे क्षेत्रात वनीकरण कार्यक्रम राबवण्यात यावा.
  • ठिबक सिंचनास प्रोत्साहन देण्यात यावे. सिंचन प्रकल्प लाभ क्षेत्रात भूसुधारणेची कामे करावीत.
  • जलसंपत्ती उपलब्धता आणि वापर यासाठी एक कायमस्वरूपी संघटना स्थापन करावी.
             सुकथनकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करताना राज्य सरकारने काही प्रशंसनीय कामे केलेली आहेत. परंतु त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यास विशेष हातभार लागलेला नाही. कृषी उत्पन्न समित्यांची स्थापना यामुळे शेतकऱ्यांना धान्य विक्री करण्यासाठी एक ठिकाण उपलब्ध झाले असले तरी यामधून काही दलाल देखील तयार झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची परीस्थिती बदललेली नाही.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी: शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, यासह काही महत्वाच्या शिफारशी स्वामिनाथन आयोगाने केल्या आहेत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयोग गठीत करणारे राजकारणी, या आयोगाच्या शिफारशी आमलात आणण्यासाठी मात्र टाळाटाळ करत आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आमलात आल्यानंतर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. स्वामिनाथन आयोगाच्या काही महत्वाच्या शिफारशींनुसार,
  • शेतकऱ्यांचा खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचार्याप्रमाणे असावे.
  • शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५०% असावा.
  • शेतमालाची आधारभूत किंमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत देण्याची व्यवस्था करावी.
  • बाजारभावाच्या चढउतारापासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून ‘मूल्य स्थिरता निधी’ ची स्थापना करावी.
  • आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढीचा शेतकऱ्यांना तोटा होवू नये, याकरिता इतर देशामधून येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावण्यात यावा.
  • दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी ‘कृषी आपत्काल निधी’ ची स्थापना करण्यात यावी.
  • कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा. पिक कर्जावरील व्याजाचा दर कमी करण्यात यावा.
  • हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये, नैसर्गिक आपत्ती वेळी, पूर्वस्थिती येईपर्यंत गैर संस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे.
  • संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा रीतीने पिक विमा योजनेचा विस्तार आणि ‘ग्रामीण विमा विकास निधी’ ची स्थापना करावी.
  • पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉकच्या ऐवजी गाव हा घटक वापरून विमा संरक्षण देण्यात यावे.
  • सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकर्यासाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करण्यात यावी.
  • शेतकऱ्यांना परवडतील या दरात बी-बियाणे आणि इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी.
  • संपूर्ण देशात प्रगत शेती आणि माती परीक्षण प्रयोगशाळेचे व्यवस्थापन करावे. शेतीला कायम आणि समप्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा करण्यात यावा.
                   आपण केवळ म्हणत असतो की, लाखांचा पोशिंदा बळीराजा जगला पाहिजे. परंतु आपण असे वागत नाही. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव देण्याची वेळ येते तेंव्हा राज्य सरकारला बाजारपेठेतील भाववाढ, मध्यमवर्गीय लोकांच्या समस्या याकडे देखील लक्ष द्यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बदलत नाही. याचा विचार करत असताना शेतकरी संपावर गेला आणि शेतकर्यांनी केवळ त्यांना लागते तेवढेच धान्य उत्पादन करण्यास सुरुवात केली? तर काय परिस्थिती निर्माण होवू शकते याचा, आपण सर्वसामान्य लोकांनी देखील विचार करणे आवश्यक आहे. आणि त्यादृष्टीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी केवळ आपुलकी व्यक्त करत बसण्यापेक्षा त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

Wednesday, April 12, 2017

शेतकरी कर्जमाफी वास्तव आणि राजकारण

      नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने, उत्तरप्रदेशात सरकार आल्यानंतर तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू असे जाहीरनाम्यात जाहीर केले होते. भाजपचे सरकार आल्यानंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. उत्तरप्रदेशातील ज्या शेतकऱ्यांनी एक लाखापेक्षा कमी कर्ज घेतले आहे, त्यांचे कर्ज माफ करण्यात आले. उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आणि त्यामुळे महाराष्ट्र, तामिळनाडूसह देशातील इतर राज्यांमधील विरोधी पक्षांना राजकारण करण्यास एक नवीन कारण मिळाले. खरतर शेतकरी कर्जमाफीचे वास्तव आणि त्यावर होत असलेले राजकारण यामधील फरक सामान्य नागरिक म्हणून आपण समजून घ्यायला हवा. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी आहे.
              भारतातील एकूण जलसिंचनाखालील क्षेत्राचा विचार केला तर सर्वाधिक म्हणजेच जवळपास ९८% जलसिंचन पंजाबमध्ये आहे. तर हरयाणामध्ये जवळपास ८५% क्षेत्र जलसिंचनाखाली आहे. उत्तरप्रदेशमध्ये ७६% आणि महाराष्ट्रात हेच प्रमाण १८% च्या जवळपास आहे. यास जबाबदार कोण? देशाच्या सर्व राज्यांमध्ये कमी अधिकप्रमाणत जलसिंचनाखालील जमिनीचे प्रमाण बदलत जाते. २००९ साली केंद्र सरकारने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची ७१ हजार कोटींची कर्जे माफ केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरच थांबल्या का? शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त झाला का? या गोष्टींचा विचार न करता, आजच्या दिवशी महाराष्ट्रात देखील कर्जमाफीवरून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत आहेत.
                  भारत देशाचा विचार केला तर भारत हा कृषिप्रधान देश आहे, असे आपण म्हणतो, परंतु भारत देश स्वतंत्र झाल्यापासून कृषी क्षेत्र वाढीसाठी अथवा शेतकऱ्यांसाठी देशातील कोणत्या राजकीय पक्षांनी किती योगदान दिले? अथवा केवळ निवडणुकांच्या तोंडावरच घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची मते स्वतःच्या पारड्यात पाडून घेतली? या गोष्टींचा सामान्य नागरिक म्हणून किंवा सामान्य शेतकरी म्हणून आपण विचार करत नाही. कोणत्याही आजारावर कयमस्वरूपी इलाज करणे आवश्यक असते. परंतु हे राजकीय पक्ष केवळ मलमपट्टी करत असतात. आणि आजाराच्या खपल्या पुन्हा पुन्हा काढत असतात. कर्जमाफी हा देखील असाच प्रकार आहे. सत्तेत असणाऱ्या आणि वेळोवेळी विरोधात असणाऱ्या राजकीय पक्षांनी केवळ मलमपट्टी करण्यापेक्षा शेतकरी संपूर्णपणे कर्जमुक्त कसा होईल, आणि यासाठी काय करता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात झालेल्या सिंचन घोटाळ्याचा आढावा घेण्यासाठी चितळे समिती स्थापन करण्यात आली होती. ७० हजार कोटी रुपये खर्च करून झाल्यानंतर ही महाराष्ट्राच्या सिंचन क्षेत्रात एकूण किती टक्के वाढ झाली अथवा नेमका घोटाळा काय होता याचा अहवाल चितळे समितीने सादर केला. तत्पूर्वी २००९ साली शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ७१ हजार कोटीची कर्जमाफी दिली गेली होती. आणि २०१३ मध्ये महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर घोटाळ्याची चौकशी सुरु करण्यात आली. म्हणजेच राजकीय पक्षांचे हे निर्णय शेतकऱ्यांच्या हितांचे नसून ‘एक हात से लो और दुसरे हात से लो’, या प्रकारातील आहेत. राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांसाठी किंवा शेतीसाठी काहीच केले नाही असे ही म्हणता येणार नाही. परंतु राजकारण्यांचे आजवरचे सर्व निर्णय राजकीय इच्छाशक्तीने प्रेरित असतात. सर्व राजकीय पक्षांनी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेले निर्णय शेतकऱ्यांसाठी तात्पुरते दिलासादायक असले तरी दीर्घकालीन चिंता वाढवणारे ठरत आहेत.
           उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर, महाराष्ट्रातही विरोधी पक्षांसह सत्तेत असलेल्या शिवसेनेसह सर्व पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी उचलून धरली आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून यासाठी संघर्ष यात्रा काढून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. विधानसभेत देखील गदारोळ सुरु आहे. यासर्व राजकारणाची फलश्रुती म्हणून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली, तर काय कायमस्वरूपी शेतकरी कर्जमुक्त होणार आहे का? किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का? किंवा यामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावेच लागणार नाही? अशी परिस्थिती निर्माण होणार आहे का? याबाबत काहीच विचार नसलेल्या विरोधकांकडून कर्जमाफीची जी मागणी होत आहे. त्याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. कारण मागील हंगामात पुरेसा पाऊस झालेला आहे. त्यमुळे शेतीचे उत्पन्न देखील चांगले झाले आहे. असे असताना देखील कर्जमाफी करणे चुकीचे आहे.
             महाराष्ट्रात प्रादेशिक असमतोल असला तरीही, मागील वर्षी अपेक्षेपेक्षा अधिक पाऊसकाळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर आहे अथवा वाढले आहे. दरम्यान महराष्ट्र सरकारने राबवलेल्या काही योजनांमुळे देखील शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. जलयुक्त शिवार योजना, युरियाचे निम कोटिंग करणे, माती परीक्षण केंद्रांची उभारणी, फळांवर प्रक्रिया करणाऱ्या केंद्राची उभारणी, जिल्हा स्तरावर शासकीय शितगृहे आणि शासकीय गोदामांची उभारणी यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती पूर्वीपेक्षा बदलली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील आवर्षणग्रस्त भागात यावर्षी उन्हाळ्यातील परिस्थिती मागील वर्षीपेक्षा वेगळी आहे. हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की, महराष्ट्र सरकारने चालवलेल्या काही योजना खरच अभिनंदनीय आहेत. या योजना शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू शकत नसतील परंतु भविष्यात कर्जमुक्ती नक्की देवू शकतील. यासर्व योजनांचा विचार करता महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी खर तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्यापेक्षा शेतकरी कर्जमुक्त कसा होईल यादृष्टीने विचार करून सरकारी पक्षावर दबाव आणणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नाला हमी भाव देणे, उत्पन्नाच्या वाढीसाठी प्रयत्न करणे, शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन सिंचनाखाली येण्यासाठी त्यांना मदत करणे तसेच शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करण्यास उपयुक्त योजनांची माहिती देणे. यादृष्टीने प्रयत्न केल्यानंतर कालांतराने शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणार आहे. त्यामुळे केवळ शेतकरी कर्जमाफीचे राजकारण करण्यापेक्षा त्यामागील वास्तव जाणून घेवून सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच भविष्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणार आहे, अन्यथा कर्जमाफी पुन्हा आत्महत्या पुन्हा कर्जमाफी पुन्हा आत्महत्या हे चक्र सुरूच राहणार आहे.

दुर्ग भ्रमंती - पराक्रमी प्रतापगड

         
टेहळणी बुरुज 
  पराक्रमी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाच्या यशोगाथा आपण इतिहासात वाचत असतो. इतिहासकारांकडून ऐकत असतो. शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमावर आधारलेली गीते, भारुडे अगदी अंगावर शहारा येईपर्यंत ध्यानमग्न होऊन आपण ऐकत असतो. परंतु या पराक्रमी प्रतापगडावर आजच्या घडीला केवळ पर्यटनासाठी जाणारे लोक, गडाचे पावित्र्य जपत नाहीत. गडावर वाढत्या पर्यटनामुळे कचरा वाढत आहे. गडावर वास्तू कमी आणि हॉटेल्स, खानावळी जास्त आहेत. त्यामुळे गडावरील वास्तुंचे पावित्र्य आणि इतिहासाची आठवण नाहीशी होत असून एक दुर्गप्रेमी म्हणून याबद्दल काळजी वाटणे सहाजिक आहे. आपण सर्वांनी पुढाकार घेवून पराक्रमी प्रतापगडाचे पावित्र्य जपण्यासाठी गडास भेट देवून तेथे घडलेला इतिहास जपण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
             सह्याद्रीच्या पर्वत रांगेत जावळीच्या खोऱ्यात दाट जंगलामध्ये प्रतापगड किल्ला बांधलेला आहे. प्रतापगडाच्या पूर्वेस महाबळेश्वर पठार आणि घनदाट जंगल आहे. पश्चिमेकडे पार घाट आणि कोकण परिसर आहे. प्रतापगड सातारा जिल्यातील गिरीदुर्ग आहे. वाई परिसरातील जावळीच्या खोऱ्यात असलेला प्रतापगड महाबळेश्वर- पोलादपूर रस्त्यावर महाबळेश्वर पासून जवळच २१ कि. मी. अंतरावर आहे. राज्य महामार्ग ७२ ने प्रतापगडावर पोचता येते. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधील टेंभावर हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. किल्ल्याची चढाई जास्त अवघड नसून, पायथ्यापर्यंत आपण वाहन घेऊन जावू शकतो. महाबळेश्वरहून पोलादपूरला जाणारी एस.टी. (बस) कुमरोशी गावाजवळ आपल्याला सोडते. तेथून प्रतापगडला जाता येते. आपले स्वतःचे वाहन घेवून गेल्यानंतर आपण गडाच्या पायथ्यापर्यंत जावू शकतो. गडाच्या पायथ्याजवळ पार्किंगची आणि इतर सर्व व्यवस्था आहे. गडावर पायी जायचे असल्यास पार किंवा कुंभरोशी गावातून वर जाण्यासाठी वाट आहे. गडाच्या पायथ्यापर्यंत पोचण्याच्या वाटे व्यतिरिक्त गडावर जाण्यासाठी पाच चोर वाटाही आहेत. त्यातील काही वाट आज वापरात आहेत.

प्रतापगडाचा इतिहास : 
          प्रतापगडाच्या डोंगराला पूर्वी भोरप्याचा डोंगर असे म्हणत असत. इ. स. १६५७-५८ मध्ये चंद्रराव मोरे यांच्याकडील जावळी परिसर जिंकून घेतल्यानंतर परिसरातील काही किल्लेही शिवाजी महाराजांनी जिंकले होते. त्यानंतर महाराजांनी प्रतापगडाची उभारणी केली. इ. स. १६५७ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगड उभारणीचे काम सुरु झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाच्या उभारणीमध्ये विशेष लक्ष दिले होते. नीरा आणि कोयना नदीच्या परिसरातील प्रदेशाचे संरक्षण करता यावे हा मुख्य उद्देश समोर ठेवून गडाची उभारणी करण्यात आली होती. इ. स. १६५६-५७ मध्ये प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची ऐतिहासिक भेट होऊन त्यात महाराजांनी अफजलखानाचा वध केला. अफझल खानाच्या वधाने शिवाजी महाराजांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानभर झाले होते. अफजलखान वधाचा सर्व लेखाजोखा आपण अनेक पुस्तकातून वाचत असतो. तसेच इतिहासकारांकडून ऐकत असतो. महाराजांच्या शौर्य गाथेची साक्ष असणारा प्रतापगड आणि त्याच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची कबर म्हणजे आजच्या स्वराज्याची एक प्रकारे पायाभरणी आहे.
          जावळीच्या प्रांतात गेल्यानंतर पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. गडाकडे जात असताना राज्य महामार्ग ७२ सोडून थोडे पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूस एक पायवाट दिसते. तेथे रस्त्याच्या कडेला दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ येथे अफजलखानाची कबर आहे. अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला. त्यावेळी संभाजी कावजी यांनी अफजल खानाचे शिर (मुंडके) गडावरील बुरुजात पुरले, अशी इतिहासात नोंद आहे. प्रतापगडावरील मुख्य टेहळणी बुरुज आणि त्यावर फडकत असलेला स्वराज्याचा ‘भगवा ध्वज’ शिवप्रेमी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते.


गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
महादरवाजा :
गडाच्या पायथ्याजवळ गेल्यानंतर वाहनतळावरून गडाच्या दक्षिण दिशेस असलेल्या टेहळणी बुरुजाजवळून पुढे जाणाऱ्या पायवाटेने आपण महादरवाज्यात येऊन पोहोचतो. गडावरील या महादरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो. तसेच सुर्योदयावेळी उघडला जातो. महादरवाज्यातून गडाकडे आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूस चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. 

भवानी देवीचे मंदीर :
गडावरील मुख्य ठिकाण म्हणजे गडाच्या मध्यावर भवानी मातेचे दगडी बांधकामातील मंदीर आहे. या मंदीरात देवीची काळया पाषाणाची मुर्ती आहे. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधून शाळिग्राम शिळा (दगड) आणून त्यामधून घडवलेली आहे. मंदिरामध्ये या मूर्ती शेजारीच शिवाजी महाराजांच्या दररोजच्या पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. भवानी देवीच्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या बाजूस समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती आहे. त्यापुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर मंदिराजवळ येऊन पोहोचतो.

केदारेश्वर मंदीर आणि बालेकिल्ला :
बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यानंतर समोरच केदारेश्वराचे मंदीर आहे. बालेकिल्ला परिसरात केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईंच्या वाड्याचे अवशेष आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची राज सदर आहे. याच ठिकाणी असलेल्या बागेच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. हा पुतळा गडावरील आकर्षक ठिकाण आहे. या पुतळ्याच्या जागेवर पूर्वी शिवाजी महाराजांचा राहता वाडा होता. प्रतापगडावरील या पुतळ्याचे लोकार्पण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते. महाराजांच्या या पुतळ्याशेजारी शासकीय विश्रामधाम आहे. बालेकिल्ल्याच्या ईशान्य दिशेस दोन तळी आहेत. या ठिकाणी गेल्यानंतर दऱ्या खोऱ्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेले कोयना नदीचे खोरे दिसते. प्रतापगडाचे शेवटचे टोक याठिकाणी आहे.

टेहळणी बुरुज :
गडाच्या पायथ्याकडून महादरवाजाकडे जात असताना एक वाट टेहळणी बुरुजाकडे जाते. टेहळणी बुरुजावरून जावळीच्या खोऱ्यातील निसर्ग सौंदर्य पाहता येते. याठिकाणी असलेला ‘भगवा ध्वज’ परिसरात दुरूनच दिसतो.
         विमानातून अथवा हेलिकॉप्टरमधून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. महाराष्ट्रातील इतर गडांपेक्षा प्रतापगडास भक्कम आणि आज ही चांगल्या अवस्थेत असलेली तटबंदी आहे. तसेच प्रतापगडाला महादरवाज्याशिवाय घोरपडीचे चित्र असणारा दिंडी दरवाजा देखील आहे. या दरवाज्यास राज पहाऱ्याचा दरवाजा असे ही म्हणतात. दिंडी दरवाज्याच्या शेजारी जवळच रेडका बुरूज, त्यापुढे यशवंत बुरूज आणि सूर्य बुरूज आहेत. प्रतापगडावर कडेलोट करण्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी दोषी आरोपींना कडेलोटाची शिक्षा देण्यात येत असे. प्रतापगडावरुन पश्चिम दिशेस असलेला रायगड आणि दक्षिण दिशेस असलेला मकरंदगड उन्हाळ्यामध्ये दिसतो. परंतु हिवाळ्यामध्ये याठिकाणी भरपूर थंडी आणि धुके असते. त्यामुळे परिसरातील प्रदेश दिसत नाही. प्रतापगडावर दुर्ग प्रेमींनी हिवाळ्यामध्ये जाणे आणि गडाचा परिसर पाहणे योग्य आहे. प्रतापगडावर गेलेल्या दुर्ग प्रेमींना येथे खवय्येगिरीची मेजवानी देखील मिळते. गडावरील हॉटेल्समध्ये झुणका भाकरीसह खेडेगावातील सर्व खाद्य पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध आहेत.
      पराक्रमी प्रतापगडाचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानासोबत झालेल्या लढाईमध्ये खानाचा वध केला नसता तर इतिहासामध्ये अफजल खान वधानंतर घडलेल्या इतिहासाची वेगळी नोंद असली असती. त्यामुळे या इतिहासाची जाणीव ठेवून पराक्रमी प्रतापगडास भेट देवून आपण छत्रपतींच्या पराक्रमास त्रिवार मुजरा करणे आवश्यक आहे.


हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 

Monday, April 10, 2017

दुर्ग भ्रमंती - स्वराज्याचे तोरण ‘तोरणा’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक प्रमुख शिलेदार म्हणून तोरणा (प्रचंडगड) किल्ल्याची इतिहासात नोंद आहे. महाराष्ट्रातील सर्व गडांचा स्वतःचा असा विशिष्ठ इतिहास आहे. त्याचप्रमाणे तोरणा किल्ल्यावर देखील इतिहास घडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, त्यावेळी सर्वप्रथम तोरणा किल्ला सर केला असे इतिहास सांगतो. विजापूरच्या अदिलशहाच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. महाराजांनी तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळे या किल्ल्यास ‘तोरणा’ असे नाव दिले गेले, असे काही इतिहासकार सांगतात. तर काही इतिहासकारांच्या मते गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव ‘तोरणा’ असे ठेवण्यात आले होते. गड काबीज केल्यानंतर शिवाजी महाराजांनी गडाची पहाणी करत असताना गडाचा प्रचंड विस्तार पाहून, गडाचे नाव 'प्रचंडगड' असे ठेवले होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला तोरणा किल्ला अगदी गरुडाच्या घरट्यासारखा दिसतो. त्यामुळे त्यास ‘गरुडाचे घरटे’ असे देखील म्हणतात.
           पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बंगलोरकडे जात असताना नसरापूरहून वेल्हे या गावी पोहचता येते. वेल्हे हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेटहून वेल्हय़ाला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा आहे. तसेच पुण्याहून खडकवासला धरणापासून पुढे खानापूर गावाकडे जात असताना एक वाट पाबे घाटमार्गे वेल्हय़ाकडे जाते. या वाटेने देखील वेल्ह्यास पोहचता येते. स्वतःचे वाहन असेल तर या मार्गे जात असताना सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत वेल्ह्याकडे जाता येते.
           इतिहासामध्ये तोरणा किल्ला कोणी आणि इ. स. च्या कोणत्या षतकात बांधला याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु गडावर असलेल्या मंदिरांच्या जीर्ण अवशेषांवरून किल्ल्याच्या इतिहासाबाबत काही गोष्टी सांगण्यात येतात. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमदने हा किल्ला जिंकला होता. त्यानंतर कालांतराने हा किल्ला निजामशाही आणि आदिलशाहीच्या अखत्यारीत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी काही निवडक मावळ्यांसह तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले. त्यावेळी तोरणा किल्ल्याची डागडुजी करत असताना कोठी दरवाज्याजवळ सापडलेल्या धनाचा वापर करून मुरुंबदेवाच्या डोंगरावर असलेल्या राजगडाची उभारणी करण्यात आली होती. हाच राजगड पुढे अनेक वर्ष शिवाजी राजांच्या स्वराज्याची राजधानी होता. तसेच कोठी दरवाज्याजवळ सापडलेल्या धनाचा वापर तोरणा (प्रचंडगड) किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी देखील करण्यात आला होता.
         राजगडाला पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या तीन माच्या आहेत, त्याप्रमाणे तोरण्याला देखील झुंजार आणि बुधला या दोन माच्या आहेत. यातील झुंजार माची विस्ताराने छोटी असली तरी चढण्यास खुप अवघड आहे. राजगड आणि तोरण्याच्यामध्ये बुधला माची विस्तारलेली आहे. पावसाळ्यामध्ये बुधला माचीवर खुप मोठ्या प्रमाणात छोटे लाल रंगाच खेकडे आणि माकडे असतात.
            तोरणा (प्रचंडगड) हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर आहे. गडाची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत आहेत. तोरणा किल्ल्याच्या उत्तरेला कानद नदी आणि दक्षिणेला वेळवंडी नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. तोरणा किल्ला दगडी कातळामध्ये उभा आहे. गडावर जात असताना तोरण्याचा पहिला दरवाजा आपल्याला लागतो. दगडी कातळात असलेल्या या दरवाजाला बिनीचा दरवाजा म्हणतात. बिनीच्या दरवाजातून पुढे गेल्यानंतर कोठीचा दरवाजा लागतो.

तोरजाई देवी मंदीर (कोठी दरवाजा) आणि मेंगाई देवी मंदीर : 
              कोठी दरवाज्यासमोरच्या दगडी चिरेबंदी तटामध्ये एक छोटे मंदीर आहे. त्यामध्ये तोरणजाई देवीची मूर्ती आहे. याच ठिकाणी खोदाई करत असताना, मावळ्यांना मोहरांचे हंडे सापडल्याची इतिहासात नोंद आहे. गडाकडे पुढे जात असताना वाटेवर तोरणा टाके आणि खोकड टाके आहेत. या टाक्यापासून थोडे पुढे चालत गेल्यानंतर समोर बालेकिल्ल्याचे अवशेष आहेत. त्यापुढे जवळच मेंगाई देवीचे मंदीर आहे. रात्री मुक्कामी येणारे दुर्गप्रेमी या ठिकाणी राहतात. तसेच नवरात्र उत्सव काळात, वेल्हे गावातील लोक गडावरती देवीचा नवरात्र उत्सव साजरा करतात. मेंगाई देवी मंदिरापासून झुंजार माचीकडे जात असताना हनुमान बुरुज, भेळ बुरुज, सफेली बुरुज माळेचा बुरुज, फुटका बुरुज आणि लक्कडखाना आहे.

झुंजार माची : 
          मेंगाई देवीच्या मंदिराकडून हनुमान बुरुजाकडे आल्यानंतर, बुरुजाच्या तटावरुन खाली उतरुन दिंडीच्या दाराने झुंजार माचीकडे जाता येते. झुंजार माचीकडे जाणारी वाट सोपी नाही. तसेच पावसाळ्यात झुंजार माचीकडे जाणे धोकादायक देखील ठरू शकते. त्यामुळे पर्यटकांनी सतर्क राहून झुंजार माचीकडे जाणे गरजेचे आहे. झुंजार माचीवर पावसाळ्यात खुप मोठ्या प्रमाणात धुके असते. तसेच उन्हाळ्यात माचीवरून दूरवरचा प्रदेश नजरेत येतो.

तोरणेश्वर महादेवाचे मंदिर :
          मेंगाई देवी मंदीर परिसरामध्ये भग्न वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. याच ठिकाणी बुधला माचीकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर तोरणेश्वर महादेवाचे मंदीर आहे. या परिसरात देखील पावसाळ्यात खुप मोठ्या प्रमाणात धुके असते. समोरचा माणूस देखील दिसू शकत नाही. तर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी गेल्यानंतर तोरणा (प्रचंडगड) परिसरातील राजगड, रोहीडा, रायरेश्वर, केंजळगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, महाबळेश्वर, प्रतापगड पर्यंतचा परिसर दिसतो.

बुधला माची :
      गडाच्या पश्चिमेला बुधलामाची आहे. बुधला माचीच्या टोकाला चित्ता दरवाजा आहे. बुधला माचीकडून गडाकडे येत असताना कोकण दरवाजा, टकमक बुरुज, शिवगंगा, पाताळगंगा टाके दिसते. बुधला माचीवरून एक वाट भगत दरवाज्याकडे, तर दुसरी वाट घोडजित टोकाकडे जाते. भगत दरवाजाच्या वाटेने राजगडाकडे जाता येते. पावसाळ्यात या वाटेने जाणे धोक्याचे ठरू शकते, या ठिकाणी अतिशय कठीण वाट आहे. आणि एकदम उभा कातळ कडा आहे.

बालेकिल्ला :
     बालेकिल्ला ही तोरणा (प्रचंडगड) गडावरील सर्वात उंचावरची जागा आहे. बुधला माची परिसरातील सह्याद्रीचे सौंदर्य पाहून पुन्हा परतीच्या वाटेने मेंगाई देवीच्या मंदिराकडे आल्यानंतर बालेकिल्ल्याचे अवशेष दिसतात. बालेकिल्ल्यापासून गडाचा भलामोठा विस्तारही नजरेस पडतो. खरेतर त्याच्या या विस्तारावरूनच शिवाजी महाराजांनी तोरण्याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले होते.

      तोरणा किल्ल्यावर पुणे आणि परिसरातील पर्यटक सुट्ट्यांमध्ये येत असतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या या गरुडाच्या घरट्यावर येणाऱ्या पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा देखावा नजरेत साठवताना, स्वतःची सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून, जास्त उत्साही न होता, गड पाहणे गरजेचे आहे. कारण तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत चढाईस अवघड आहे.


हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे .

Thursday, April 6, 2017

दुर्ग भ्रमंती - राजराजेश्वर राजगड

पाली दरवाजा 
राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी. पुणे जिल्ह्यातील भोर–वेल्हे तालुक्याच्या सीमाभागात असणारा राजगड म्हणजे दुर्गप्रेमी पर्यटकांसाठी मध्यवर्ती किल्ला आहे. तीन दिशांना पसरत गेलेल्या तीन माच्या आणि मधोमध बालेकिल्ल्याची सोंगटी अशी या किल्ल्याची रचना आहे. राजगड किल्ल्यावरून परिसरातील तोरणा, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रायगड, लिगांणा, रोहीडा, रायरेश्वर, लोहगड आणि विसापूर हे किल्ले दिसतात.

नीरा-वेळवंडी नद्यांच्या खोऱ्यात मुरुंबदेवाचा डोंगर आहे. या डोंगरावरचा किल्ला म्हणून बहामनी राजवटीत राजगडास पूर्वी मुरुंबदेव असे नाव होते. मुरुंबदेव किल्ला काही दिवस निजामशाही तर काही दिवस आदिलशाहीच्या आधिपत्याखाली होता. इ.स. १६३० च्या सुमारास शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला, दरम्यान हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या शिवाजी राजांनी मुरुंबदेव किल्ला केंव्हा जिंकून घेतला याची इतिहासात नोंद नाही. परंतु रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर तोरणा किल्ला शिवाजी राजांनी काबीज केला. त्यानंतर मुरुंबदेव काबीज करून त्यावर बांधकाम आणि किल्ल्याची डागडुजी सुरु केल्याचा अंदाज इतिहासावरून लावता येवू शकतो.  मावळ प्रांतात  राज्यविस्तार करण्यासाठी तोरणा आणि मुरुंबदेव हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. इ.स. १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. स्वराज्याची २६ वर्षे राजधानी या व्यतिरिक्त राजगडावर राजारामांचा जन्म आणि महाराणी सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे छत्रपती  शिवाजी  महाराजांचे पहिले राजकीय केंद्र होते. परंतु राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी रायगडावर नेली.

पुणे बसस्थानकाहून महाराष्ट राज्य परिवहन मंडळाच्या बसने किंवा खाजगी वाहनाने गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पुणे-राजगड या बसने वाजेघर या गावी उतरून गुप्त दरवाज्याने राजगडावर जाता येते. पुणे-वेल्हे बसने वेल्हेमार्गे पाबे या गावी उतरुन कानद नदी पार करून पाली दरवाज्याने राजगडावर जाता येते. हा रस्ता पायऱ्यांचा असून सर्वात सोपा आहे. पुणे-वेल्हे मार्गासनी गावातून साखरगावमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. तेथून गुंजवणे दरवाज्याने राजगडावर जाण्यास थोडासा अवघड रस्ता आहे. तसेच गुंजवणे गावातून एक रस्ता जंगलातून सुवेळा माचीवर येतो.

राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. ४ फेब्रुवारी १७०३ रोजी औरंगजेबाने राजगडावर आक्रमण केले होते. गड जिंकल्यानंतर इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘नाबिशहागड’ असे ठेवले होते. शत्रूला जिंकण्यास अतिशय कठीण असा "राजराजेश्वर राजगड" त्याच्या वैभवासाठी आणि बालेकिल्ल्याच्या सुरक्षित ठिकाणासाठी स्वतःची इतिहासात वेगळी ओळख दर्शवतो. तर किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी राजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दर्शवतो.

पाली दरवाज्याचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग खुप प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या आहेत. पाली दरवाजाचे प्रवेशद्वार उंच आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून पुढे आल्यानंतर एक प्रवेशद्वार आहे. या दुसऱ्या प्रवेशद्वारावर अभेद्य आणि बुलंद बुरुज आहेत. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके आहेत. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत आल्यानंतर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.

पद्मावती माची :
राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. या पैंकी सर्वात प्रशस्त आणि विस्तीर्ण माची म्हणजे पद्मावती माची. पूर्वी पद्मावती माचीवर लष्करी केंद्र आणि निवासाचे ठिकाण होते. पद्मावती देवीचे मंदिर, महाराणी सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे, रत्नशाला आणि  सदर या वास्तू आजही येथे आहेत. राजगडावर पद्मावती मंदिरामध्ये रात्रीच्यावेळी पर्यटक राहू शकतील अशी व्यवस्था आहे.
शिवाजी महाराजांनी  किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यानंतर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधल्याची इतिहासात नोंद आहे. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे. मंदीर परिसरातील वास्तुंचे अवशेष आजही छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष म्हणून उभे आहेत.

सुवेळा माची :
सुवेळा माची गडाच्या पूर्वेस आहे. सुर्योदयास सुवेळा माचीवरून सुर्योदय पाहण्यासाठी पर्यटक येत 
असतात. पद्मावती माचीकडून बालेकिल्ल्याकडे जाताना  सुवेळा माची आणि संजीवनी माचीकडे जाण्यासाठी पायवाट आहे. सुवेळा माचीकडे जात असताना वाट निमुळती होत जाते. गडावर  चिलखती बुरूज आणि  चिलखती तटबंदी हे या दोन्ही माच्यांचे वैशिष्ट्य आहे.
शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ला ताब्यात घेतल्यानंतर किल्ल्याच्या पूर्व आणि पश्चिमेकडील डोंगररांगेलवर भक्कम तटबंदी बांधली. गडाच्या पुर्व दिशेस असल्यामुळे या माचीस सुवेळा माची असे नाव म्हणतात. सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे. तसेच रामेश्र्वर मंदिर आणि काळेश्र्वरी बुरुज आहे.

संजीवनी माची :
संजीवनी माची ही गडाच्या पश्चिम दिशेस आहे. पाली दरवाज्याने गडावर गेल्यास संजीवनी माचीकडे जाणारी निमुळती वाट दिसून येते. सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. संजीवनी माचीवर घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीवर विस्तीर्ण पाण्याची टाकी, विशिष्ठ अंतरावर बुरूज तसेच भुयारी मार्ग आहेत. भुयारी मार्गांनी संजीवनी माचीच्या बाहेरील तटबंदीकडे जाता येते.तोरण्यावरून राजगडावर येण्यासाठी संजीवनी माचीवर आळू दरवाजा हा एकमेव मार्ग आहे. आळू दरवाजा सद्य स्थितीला बऱ्यापैकी ढासळलेल्या अवस्थेत आहे. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात तसेच पाण्याची टाके देखील आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.

बालेकिल्ला :
राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला.बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. बालेकिल्ल्याकडे जाणारे बिकट चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा महादरवाजा आहे. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननी मंदिर आणि चंद्रतळे आहे. तळ्याच्या समोरच उत्तर बुरूज आहे. येथून पद्मावती माची आणि संजीवनी माचीचा परिसर दिसतो. उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, राजवाड्यांचे अवशेष आढळतात.

राजगडावरील अभेद्य तीन दिशांच्या तीन माच्या, गडाच्या मध्यावर असलेला बालेकिल्ला, ३ प्रमुख दरवाजे, गडावरील अभेद्य तटरक्षक दुहेरी चिलखती तटबंदी, दुहेरी-तिहेरी बांधणीचे बुरुज हे गडबांधणीतील अभिनव प्रयोग आहेत. शिवाजी महाराजांनी दुर्गबांधणीत एका शास्त्राचा वापर करून नवनिर्माणाची उभी केलेली नांदी म्हणजे राजगड असे म्हणता येईल. गडाचे सौंदर्य आणि इतिहास पाहता, गड खरच राजराजेश्वर दुर्गराज शोभतो. राजगड हा दुर्ग वास्तुशास्त्राचा सर्वोत्तम नमुना आहे. बुलंद आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.
राजगडचे हे वास्तुवैभव पाहून फक्त मला एवढेच आठवते (साभार संग्रह),

"हे शिवसुंदर मंदिर बघता। क्षणभर थांबे रवी मावळता
दिग्गज आणति अभिषेकाला स्वर गंगेचे घडे ॥
उभे हे राजगडाचे कडे, उभे हे राजगडाचे कडे..."





- नागेश कुलकर्णी 
हा लेख  मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे . 

Monday, April 3, 2017

एम.पी.एस.सी म्हणजे सेवा करण्याची संधी

१० वीची परीक्षा दिल्यानंतर, परीक्षा झाल्याच्या आनंदात काही विद्यार्थी असतात तर काही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना भविष्यात काय करू, कुठे जावू याची चिंता लागलेली असते. त्यावेळी नातेवाईक, मित्र परिवार यांच्याकडून विविध सल्ले दिले जातात. कोणी म्हणत ११ वी १२ वी साठी सायन्स घे आणि पुढे मेडिकल इंजिनियरिंग कर खुप स्कोप आहे. तर कोणी म्हणत आर्ट्स नको घेऊ कॉमर्स घे तिकडे स्कोप आहे. कोणी म्हणत पुढे वकिली कर, वगैरे वगैर सर्व हितचिंतक नवनवीन पर्याय सुचवत असतात. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देवून एम.पी.एस.सी परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या सेवेत प्रशासकीय अधिकारी हो असा हि सल्ला काही जण देतात.
आपण जर स्पर्धा परीक्षा देऊन एम.पी.एस.सी परीक्षेची तयारी करून महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेत जावू इच्छित असाल तर एक लक्षात घ्यायला हवे, की मुळात एम.पी.एस.सी आणि यु.पी.एस.सी या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या आहेत. एम.पी.एस.सी ची परीक्षा दिल्यानंतर केवळ महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून निवड होऊ शकते, तर यु.पी.एस.सी.ची परीक्षा दिल्यानंतर देशाच्या प्रशासकीय सेवेत निवड होऊ शकते. त्यामुळे एम.पी.एस.सीची परीक्षा द्यायची आहे असं ठरवल्यानंतर आपण मग ११ वी १२ वी करत असताना सायन्स घेवू अथवा आर्टस् घेवू अथवा कॉमर्स घेवू याचा विचार करू लागतो. अशावेळी खरंतर आर्ट्स घेवून १२ वीची परीक्षा दिल्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी बी.ए.ला ऍडमिशन घेऊन अभ्यास सुरू करणे आवश्यक असते. आता बी.ए.च का कराव? हा प्रश्न पडू शकतो, परंतु यामागे देखील कारण आहे, बी.ए. करत असताना अभ्यासक्रमात जे विषय आहेत, तेच विषय पुढे एम.पी.एस.सी च्या अभ्यासक्रमात आहेत.
एम.पी.एस.सी चा अभ्यास करत असताना केवळ पुस्तकी अभ्यास करून थांबता येणार नाही. यासाठी अभ्यासक्रमातील पुस्तकी वाचनासोबतच इतर माहितीपर पुस्तकांच्या वाचनाची देखील आवड असणे आवश्यक आहे. एम.पी.एस.सी चा अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून तो आपल्यामधील सर्वांगीण गुणांचा विकास असतो. त्यामुळे आपण केवळ परीक्षार्थी म्हणून अभ्यास न करता विद्यार्थी म्हणून अभ्यास करणे आवश्यक असते. असे म्हणतात की, एम.पी.एस.सी. च्या परीक्षेत ‘Any Thing Under the Sun’ काहीही विचारू शकतात. त्यामुळे एका विशिष्ठ साच्यातील अभ्यास या परीक्षेसाठी व्यर्थ आहे. एम.पी.एस.सी. चा अभ्यास करत असताना आपण केवळ परीक्षाभिमुख दृष्टीकोन डोळ्यासमोर न ठेवता, समजून उमजून अभ्यास करणे आवश्यक असते. अभ्यास करताना आपणास काय अभ्यास करायचा आहे, यापेक्षा काय नाही करायचं याबबत लक्षात यायला हव.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एम.पी.एस.सी. परीक्षेच्या माध्यमातून राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट (अ) परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट (ब) परीक्षा, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा, सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी-२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट (ब), पोलीस उपनिरीक्षक परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, कर सहायक गट (क) परीक्षा, सहायक परीक्षा आणि लिपिक-टंकलेखक परीक्षा या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षामधून निवड झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या अधिकारातील विविध पदांवरती नियुक्ती केली जाते. उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, डी.वाय.एस.पी., सी.ओ., पी.एस.आय. अशा विविध पदांवर उमेदवार नियुक्त केले जातात. त्यांना नियुक्तीपूर्वी पुण्यातील यशदा या संस्थेमध्ये प्रशिक्षण देखील दिले जाते.

उमेदवारांची पात्रता :
डिसेंबर २०१६ मध्ये एम.पी.एस.सी.ने प्रकाशित केलेल्या जाहिरातीतील सूचना पत्रकानुसार उमेदवाराचे वय एम.पी.एस.सी. राज्यसेवा, मुख्य परीक्षेच्या वेळी १९ वर्षांपेक्षा कमी नसावे अथवा ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. मागासवर्गीय गटातील आणि अनुसूचित जाती- जमातींमधील उमेदवारास वयाच्या ४३ व्या वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. अंध, कर्णबधिर अथवा अस्थीव्यंग्य असणाऱ्या उमेदवारांना ही परीक्षा देण्यासाठी खुल्या गटापेक्षा १० वर्षे अधिक शिथिलता असते.
वयाची १९ वर्ष पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देवू शकतो. तसेच यु.पी.एस.सी. परीक्षेप्रमाणे एम.पी.एस.सी. परीक्षा उमेदवारांनी किती वेळा द्यावी यावर आयोगाकडून कोणतेही बंधन नाही. आपण वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देवू शकतो. परंतु परीक्षा देण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) असणे आवश्यक आहे. ‘राज्य सेवा मुख्य परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं.

एम.पी.एस.सी. परीक्षेचे स्वरूप :
मुख्यत्वे ही परीक्षा- पूर्व परीक्षा (प्रिलिम्स), मुख्य परीक्षा (मेन्स) आणि मुलाखत (इंटरव्यू) अशा तीन स्तरांवर घेतली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या क आणि ड वर्गाच्या परीक्षांसाठी मुलाखत घेतली जात नाही. तसेच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी देखील घेतली जाते. ही परीक्षा सापशिडीप्रमाणे असते तुम्ही या तीन टप्प्यातील एका परीक्षेतून बाद झालात तर तुम्हाला परत पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागते.
पूर्व परीक्षा: राज्यसेवा पूर्व परीक्षा ही वैकल्पिक (मल्टिपल चॉईस) प्रकारची असून त्यात सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) आणि बुद्धिमत्ता चाचणी (CSAT) या प्रत्येकी २०० गुणांच्या दोन पेपर्सचा समावेश असतो.
पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययन या विषयाचा अभासक्रम विचाराल तर त्यामध्ये भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह), भारताचा भूगोल (महाराष्टाच्या संदर्भासह), पर्यावरण, अर्थकारण, महाराष्ट्रातील समाजसेवक, राज्यघटना आणि शासन व्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान,  गणिती क्षमता, चालू महाराष्ट्र संबंधी घडामोडी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी हे विषय असतात. यामध्ये महाराष्ट्रासंबंधी घटनांवर आधारित विषयांवर अधिक प्रश्न असतात.

मुख्य परीक्षा: मुख्य परीक्षा ही देखील पूर्व परीक्षेप्रमाणे वैकल्पिक प्रकारची असून यु.पी.एस.सी. प्रमाणे लेखी अर्थात लघु किंव दीर्घ उत्तर स्वरूपाची नसते. आयोगाने ठरवल्याप्रमाणे मुख्य परीक्षा ही ८०० गुणांची असून त्यात ६ पेपर असतात. यापैकी सामान्य अध्ययनासाठी एकूण ६०० गुण (सामान्य अध्ययन पेपर १, २, ३, ४ - प्रत्येकी १५० गुण) तर मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी प्रत्येकी १०० गुण असतात. यासाठी आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेत स्थळाला भेट देवून अधिक माहिती मिळवू शकतो.
मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपरमध्ये पहिला पेपर इतिहास-भूगोलचा, दुसरा भारतीय राज्यघटना आणि प्रशासन (महाराष्ट्राच्या संदर्भासह), तिसरा मानव संसाधन विकास आणि अधिकार तसेच चौथा पेपर अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवर आधारित असतो.

मुलाखत: मुलाखतीचा टप्पा या परीक्षेतील सर्वात महत्वाचा टप्पा असतो. एम.पी.एस.सी.कडून सर्व गटातील परीक्षेसाठी वेगवेगळ्या स्तरांवर मुलाखत घेतली जाते. राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची १०० गुणांची मुलाखत घेतली जाते. तज्ञ व्यक्तींचे सुमारे पाच सदस्यीय पॅनल एम.पी.एस.सी. मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत घेते. यामध्ये उमेदवारांच्या नेतृत्वगुणांचा, संभाषण कौशल्याचा आणि विचारशक्तीचा विशेष विचार केला जातो. मुलाखतीच्या या प्रक्रीयेतुन उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्रातील विविध प्रशासकीय पदांवर नियुक्ती केली जाते. यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून किती उमेदवारांची मागणी आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पदांसाठी जाहिरात काढत असते.

एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होवून महाराष्ट्र राज्याच्या सेवेत प्रशासकीय अधिकारी होवू इच्छिणाऱ्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना शेवटी एवढच सांगावस वाटत की, आपण केवळ शासकीय नोकरीत जाण्याच्या उद्दिष्टाने या परीक्षेची तयारी करणे अपेक्षित नाही. तर देश सेवा करण्याची संधी उपलब्ध होत आहे, सामाजिक क्षेत्रात आपल्या कल्पनेतून काही कल्पक गोष्टी राबवून आपण लोकांसाठी काही तरी करू शकतो. या भावनेने आपण जर या परीक्षेस सामोरे गेलात तर यश नक्की मिळेल. बाकी अभ्यास करणे, यश मिळणे न मिळणे हा प्रक्रियेचा भाग आहे. या क्षेत्रात येवून स्पर्धा परीक्षांची तयारी करणार असाल तर. सर्वकाळ सर्व शुभेच्छा !