Saturday, May 20, 2017

दुर्ग भ्रमंती - नरवीर ‘सिंहगड’

पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला सिंहगड (कोंडाणा किल्ला) पुणेकरांसाठी सर्वात जवळचे ठिकाण आहे. पुण्यातील दुर्गप्रेमी सिंहगडावर सतत गर्दी करत असतात. सह्याद्री पर्वताच्या भुलेश्वर डोंगररांगेवर पूर्वी "कोंढाणा" नावाचा प्राचीन किल्ला होता. तानाजी मालुसरेंच्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव "सिंहगड" ठेवले. तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला कोंढाणा किल्ला, आजच्या स्थितीत पुणेकर मंडळींसाठी पर्यटनस्थळ म्हणून कार्यरत आहे. सिंहगडावरून परिसरातील पुरंदर, लोहगड, विसापूर, राजगड आणि तोरणा किल्ल्यापर्यंतचा प्रदेश दिसतो.
सिंहगडावर जाण्यासाठी पुणे मनपापासून आणि स्वारगेटहून गडाच्या पायथ्यापर्यंत पी. एम. टी. बस आहेत. तसेच सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता असल्यामुळे खडकवासला धरणाजवळून गडाच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहन घेवून जाता येते. पी. एम. टी. बसने गडाच्या पायथ्यापर्यंत गेल्यानंतर हातकरवाडी गावातून पुढे पायी जाण्यासाठी पायवाट आहे. गडावर जाण्यासाठी वाहनाने जाण्यापेक्षा या पायवाटेने गेल्यानंतर ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो.
सिंहगडावर पुणे दरवाज्यापासून ते शेवटी असलेल्या टिळक वाड्यापर्यंत (बंगल्यापर्यंत) सर्व ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच गडावर अनेक हॉटेल्स देखील आहेत.

पुणे दरवाजा मार्गे : पुणे-सिंहगड पी. एम. टी. बसने पुण्यातून निघाल्यानंतर खडकवासला धरणापासून सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते.
पुणे- कोंढणपूरमार्गे : पुणे- कोंढणपूर बसने कल्याण गावामध्ये पोहचल्यानंतर कल्याण दरवाज्यातून सिंहगडावर जाता येते. कल्याण दरवाजा सिंहगडाच्या पश्चिम दिशेस आहे.

कोंढाणा किल्ला / सिंहगड चा इतिहास :
कोंढाणा किल्ला केंव्हा बांधला असावा, याचा ज्ञात पुरावा नाही. परंतु कोंढाण्याचा इतिहास सुरु होतो तो आदिशाहीच्या सत्तेपासून. कोंढाणा गावामध्ये असलेला कोंढाणा किल्ला पूर्वी आदिलशाहीच्या अखत्यारीत होता. त्यावेळी आदिलशाहिने दादोजी कोंडदेव यांना किल्ल्याचा सुभेदार म्हणून नियुक्त केले होते. इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पुरंदरच्या तहावेळी कोंढाणा किल्ला मोघलांना देण्यात आला. त्यावेळी मुघलशाहीकडून सरदार उदयभान राठोड यांस कोंढाणा किल्ल्याचा गडकरी म्हणून नियुक्त करण्यात आले.
मराठेशाहीच्या इतिहासात कोंढाणा किल्ल्यावर घडलेल्या पराक्रमामुळे कोंढाण्याचे नामकरण ‘सिंहगड’ झाले, आणि किल्ला विशेषत्वाने प्रसिद्धीस आला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने, मुघलांकडे असलेला कोंढाणा किल्ला, मराठ्यांनी जिंकला खरा परंतु यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांना वीर मरण आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी यावेळी, “गड आला, पण माझा सिंह मात्र गेला”, असे म्हणत कोंढाण्याचे नामकरण ‘सिंहगड’ असे केले.

सिंहगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
पुणे दरवाजा : सिंहगडाच्या वाहन तळापर्यंत गेल्यानंतर सुरुवातीस पुणे दरवाजा आहे. गडावर प्रवेश करण्यासाठी पुण्याच्या बाजूने हा मुख्य दरवाजा आहे. पुण्याच्या बाजूस असणारे असे तीन दरवाजे आहेत. एका मागे एक अशा या तीन दरवाज्यामधून गडाकडे जाण्याकरिता वाट आहे.

दारूचे कोठार : पुणे दरवाज्यातून आत आल्यानंतर समोर दारूचे कोठार दिसते. दारूच्या कोठाराची थोडीफार पडझड झालेली आहे. परंतु हे सुस्थितीत आहे. पुणे परिसरातील पर्यटकांची याठिकाणी सतत वर्दळ असल्यामुळे, याठिकाणी सतत गर्दी असते. गडावर येथे तोफखाना असे लिहिलेली एक पाटी देखील आहे.

खांद कडा : पुणे दरवाज्यामधून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर खांद कडा दिसतो. या कड्यावरून सह्याद्री पर्वताच्या परिसरातील निसर्ग दिसतो. तसेच पुण्यातील इमारती देखील दिसतात.

कोंढाणेश्वर महादेव मंदिर : इतर किल्ल्यांप्रमाणे कोंढाणा किल्ल्यावर देखील एक यादवकालीन महादेवाचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते. मंदिरामध्ये  कोंढाणेश्वर महादेवाची पिंड आणि एक नंदीची मुर्ती आहे.

अमृतेश्वर मंदिर : कोंढाणेश्वराच्या मंदिरापासून थोडे पुढे गेल्यानंतर अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. यादव घराण्याच्यापूर्वी कोंढाणा किल्ल्यावर कोळ्यांची वस्ती होती, आणि भैरव हा कोळ्यांचा देव असल्यामुळे अमृतेश्वर मंदिरामध्ये भैरव आणि भैरवीच्या मुर्त्या आहेत. यामध्ये हातात राक्षसाचे मुंडके असलेली भैरवाची मुर्ती आहे.

नरवीर तानाजी मालुसरे स्मारक : अमृतेश्वर मंदिराच्या मागील बाजूने पुढे चालत गेल्यानंतर नरवीर  तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते. उदयभान राठोडशी लढता लढता धारातीर्थी पडलेल्या नरवीर तानाजींच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आले आहे.

देव टाके : नरवीर तानाजी मालुसरे स्मारकाच्या जवळून पुढे गेल्यानंतर देव टाके आहे. या टाक्यातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होत असे.

कल्याण दरवाजा : सिंहगडाच्या पश्चिम दिशेस कल्याण दरवाजा आहे. कोंढणपूर गावामधून पायथ्याच्या कल्याण गावातून गडावर आल्यानंतर कल्याण दरवाज्यामधून गडावर प्रवेश करता येतो. कल्याण दरवाज्यावर काही दगडी शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.

उदयभान राठोडचे स्मारक : मोगलांनी उदेभान राठोड यास कोंढाण्याचा गडकरी म्हणून नियुक्त केले होते. नरवीर तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांच्या लढाईमध्ये उदयभान देखील मारला गेला होता. या उदयभान राठोडचे देखील गडावर स्मारक आहे.

झुंजार बुरूज : सिंहगडाच्या दक्षिण दिशेस झुंजार बुरूज आहे. उदयभान राठोडच्या स्मारकापासून पुढे गेल्यानंतर झुंजार बुरुजावर येता येते. झुंजार बुरुजावरून पानशेतचा परिसर, राजगड, तोरणा आणि पुरंदर दिसतात.

तानाजी कडा : तानाजी कडा सिंहगडाच्या पश्चिम दिशेस आहे. नरवीर तानाजी मालुसरे याच बुरुजावरून मावळ्यांसह गडावर चढले होते. तानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड आणि त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा वेगळ्याप्रकारे सांगण्याची गरज नाही.

छत्रपती राजाराम महाराज स्मारक : छत्रपती राजाराम महाराज यांची सिंहगडावर समाधी आहे.  मुघलशाहीशी लढा देत असताना छत्रपती राजारामांचे सिंहगडावर निधन झाले होते. त्यावेळी छत्रपती राजाराम यांचे स्मारक सिंहगडावर बांधण्यात आले. पुढे पेशवाईमध्ये सिंहगडावर असलेल्या या स्मारकांची रीतसर व्यवस्था ठेवण्यात आलेली होती.

लोकमान्य टिळक यांचा वाडा : सिंहगडावर लोकमान्य टिळक यांचा एक वाडा आहे. इ.स. १९१५ साली लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची या वाड्यामध्ये भेट झाली होती. आगरकर आणि लोकमान्य टिळक सिंहगडावर आल्यानंतर येथे येत असत.

सिंहगड. सिंहगड आपणास मराठेशाहीच्या एका सरदाराच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. इतिहासात विजयी पताका मिरवणारा ‘सिंहगड’ आजच्या दिवशी मात्र आपल्याच लोकांनी बाटवला आहे. रेव्ह पार्ट्या, दारू पिवून दंगा करण्यासाठी आजकाल पुणे परिसरातील मंडळींसाठी सिंहगड पायथा एक प्रकारचा अड्डाच झाला आहे. अश्लील चाळे करण्यासाठीच जाऊन काही हे मुक्त ठिकाण असल्यागत गडावर प्रेमी युगुलं वावरत असतात. याच साठी नरवीर तानाजींनी बलिदान दिले का? याच साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सिंहगड ठेवले होते का? याचा विचार आजकाल खुप कमी लोक करत असावेत. त्यामुळेच सिंहगडावर दुर्गप्रेमी कमी आणि प्रेमी लोक अधिक असतात.
प्रशासनाच्या पुढाकाराने सध्या गडावर व्यवस्था राखली जात आहे. तरी देखील इतिहासातील वास्तवाचा पुरावा असलेल्या सिंहगडचे पावित्र्य, एक नागरिक म्हणून आपण देखील जपणे गरजेचे आहे. गडावर गेल्यानंतर स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या या ऐतिहासिक वारसा स्थळांना आपल्या भावी पिढ्यांसाठी एक आदर्श आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणून वारसारूपाने प्रदान करण्यास हातभार लावू शकतो.


हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 
- नागेश कुलकर्णी 

Friday, May 19, 2017

दुर्ग भ्रमंती - सज्जनगड



|| दास डोंगरी राहतो, 
यात्रा रामाची पाहतो |
देव भक्तासवे जातो, ध्यान रुपे ||

महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांच्या इतिहासात स्वतःच्या विशिष्ठ पाऊल खुणा अस्तित्वात आहेत. मग आजच्या दिवशी त्या किल्ल्यावर काही अवशेष असतील अथवा नसतील, तरीही अनेक किल्ले स्वतःचे पावित्र्य आणि वेगळेपण जपून आहेत. त्यामध्ये सज्जनगडाचा रायगडाच्या बरोबरीने क्रमांक लागतो. समर्थ रामदासांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी जाणून घेत असताना सज्जनगडाचा नामोल्लेख येतोच, त्यामुळे सज्जनगडाचे स्वराज्य स्थापनेत विशेष आणि महत्वपूर्ण योगदान आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील शंभू महादेव या नावाने ओळखली जाणारी एक डोंगररांग सातारा जिल्ह्यात पुर्व दिशेस विस्तृतपणे वाढत जाते. शंभू महादेव डोंगररांगेवरच सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या अगदी जवळ असलेल्या परळी गावाच्या डोंगरराईत हा किल्ला आहे. उरमोडी नदीच्या खोर्‍यात परळीचा किल्ला उभा आहे. सज्जनगड किल्ल्यावर समर्थ रामदासांची समाधी आहे. तसेच समर्थ रामदासांचे याठिकाणी अनेक दिवस वास्तव्य होते.

सज्जन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. कोणत्याही वाटेने गेल्यानंतर पायऱ्या चढून गडावर जावे लागते.

परळी गावामधून : सातारा गावामधून परळी गावामधून गडाकडे जाता येते. परळी गावातील गड पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत.

गजवाडी पासून : सातारा परळी वाटेवर परळीच्या अलीकडेच गजवाडी गाव आहे. तेथून गडावर जाता येते. तेथून पुढे गडावर जाता येते.


सज्जन गडाचा इतिहास :
परळी गावाच्या शेजारी असलेल्या डोंगरावर पूर्वी आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, असे म्हणतात. त्यामुळे या किल्ल्यास अपभ्रंश स्वरुपात ‘अस्वलगड’ असे म्हटले जात असे, स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर असे सांगण्यात आले. सज्जन गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव असल्यामुळे, या किल्ल्यास परळीचा किल्ला असे देखील म्हणतात. सज्जनगडाची उभारणी शिलाहार घराण्यातील भोज राजाने ११ व्या शतकात केली असल्याचे इतिहासकारांकडून सांगण्यात येते. सज्जनगड हा किल्ला बहमनी राजाकडून वारसदार आदिलशाहीकडे वर्ग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो स्वराज्याच्या सेवेत दाखल झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीस मान देवून समर्थ रामदास स्वामी उर्फ नारायण विसाजी ठोसर हे परळीच्या किल्ल्यावर वास्तव्यासाठी आले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे "सज्जनगङ" असे नाव ठेवले, असे इतिहासातून समजते. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याचे पहिले छत्रपती या नात्याने छत्रपती शिवाजीराजे भोसले सज्जनगडावर समर्थ रामदासांच्या भेटीसाठी आले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांनी युवराज संभाजी राजांना समर्थ रामदासांच्या सज्जनगडावरील वास्तव्यात पाठवले होते. दरम्यान युवराज संभाजीराजे भोसले  सज्जनगडावरून पळून गेले होते. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज याचं गुरु शिष्याच नात होत. समर्थ रामदासंकडून मार्गदर्शन घेण्याकरिता शिवाजी महाराज वेळोवेळी सज्जनगडावर जात असत अथवा पत्र व्यवहार करत असत. (यावर वाद असू शकतो, परंतु इतिहासातील नोंदींवरून हे मान्य करावेच लागेल.) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर तसेच प्रतापगडावरून अफजल खानाच्या वधाचा डाव आखत असताना,समर्थ रामदासांच्या अनुयायांनी म्हणजेच ‘रामदासी’नी छत्रपतींसाठी हेरगिरीचे काम केले असल्याची नोंद इतिहासात आढळते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर इ.स. १६८२ मध्ये सज्जनगडावर श्रीरामाचे मंदिर बांधून तेथे राममूर्तींची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थ रामदासांचे निधन झाले. समर्थ रामदासांचे रामदासी, रामदासांच्या निधनानंतर देखील सज्जनगडावर श्रीराम मंदिरात रामदासांच्या समाधीजवळ राहत होते. यावेळी समर्थ रामदासांच्या शिष्या अक्कास्वामी यांनी मठाची व्यवस्था पाहिली होती. त्यानंतर इ.स. १७०० मध्ये फतेउल्ल खानाने सज्जनगडास वेढा देऊन, सज्जनगड मोगलांच्या ताब्यात घेतला. त्यावेळी गडाच्या विशिष्ठ ठिकाणावरून त्याचे ‘नौरसतारा’ असे नामकरण करण्यात आले होते. त्यानंतर मुघलांकडून इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी सज्जनगड पुन्हा मराठेशाहीच्या राजवटीखाली सहभागी करून घेतला. इ.स. १८१८ मध्ये सज्जनगड ब्रिटीशांच्या राजवटीत कंपनी सरकारच्या अधिपत्याखाली आला.

सज्जन गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

समर्थ दर्शन : सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत पोचत असताना, वाटेवर उजव्या बाजूस हनुमानाची उंच मुर्ती नजरेस पडते. गडाच्या पायथ्याजवळ असलेल्या वाहन तळाकडे जात असताना ही मुर्ती दिसते. या मूर्तीच्या परिसरात समर्थ दर्शन येथे, समर्थ रामदासांचा जीवनपट उलगडलेला आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाद्वार : सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत वाहनाने गेल्यानंतर, पायथ्यापासून गडाकडे जात असताना वाटेवर सर्वप्रथम ‘श्री छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ लागते. गडावर जाण्यासाठी मुख्य द्वार असल्यामुळे, दररोज रात्री ९ वाजता नियमाप्रमाणे द्वार बंद करण्यात येते. तसेच सकाळी द्वार उघडण्यात येते. शिवाजी महाद्वार खुप भक्कम आणि उंच आहे.

श्री समर्थ महाद्वार : शिवाजी महाद्वारातून पुढे गेल्यानंतर पुढे दुसरे द्वार लागते, ते म्हणजे ‘श्री समर्थ महाद्वार’ होय. आजही या दोन्ही द्वारांचे मुख्य दरवाजे रात्री ९ नंतर बंद होतात. या दोन्ही मुख्य महाद्वारांच्या तटबंदी भक्कम आहेत. गडाकडे जात असताना वाटेवर समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतीची प्रतिकृती स्वरूपातील छोटी मंदिरे आहेत.

रामघळ : श्री समर्थ महाद्वारातून पायर्‍या चढून गडावर प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस रामघळ आहे. रामघळ समर्थ रामदासांची एकांतात बसण्याची जागा होती.

अंग्लाई देवीचे मंदिर : गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे एक पाटी लावलेली दिसते, अंग्लाई देवी मंदिराकडे. या पाटीपासून पुढे गेल्यानंतर एक छोटे तळे आहे. याच परिसरात अंग्लाई देवीचे मंदिर आहे. अंग्लाई देवीची ही मुर्ती समर्थ रामदासांना डोहात सापडली असल्याची आख्यायिका सांगितली जाते.

पेठेतील मारुती मंदिर : गडावरील मुख्य पेठेत हे मारुती मंदिर आहे. समर्थ रामदास गडावर राहण्यास येण्यापूर्वीपासून हे मंदिर गडावरती आहे.

समर्थ रामदासांचे समाधी मंदिर आणि श्रीराम मंदिर : अंग्लाई देवीच्या मंदिराकडून परत येवून समाधी मंदिराकडे जात असताना वाटेवर संस्थानाचे कार्यालय, श्री समर्थ संस्थान कार्यालय आणि काही छोटी साहित्य भांडार वस्तूंची दुकाने आहेत. मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर विस्तीर्ण आणि भव्य असा सभामंडप आहे. सभामंडप परिसरात मंदिराचा मुख्य गाभारा आहे. सभामंडप परिसरातच समर्थ महाप्रसाद गृह आहे. समोरच श्रीरामाचे मंदिर, समर्थ रामदासांचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थ रामदासांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. श्रीराम मंदिराच्याखाली तळ मजल्यावर समर्थ रामदासांचे समाधी मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूने गेल्यानंतर संस्थानच्या धर्मशाळेकडे जाण्यासाठी वाट आहे. सज्जनगडावरील धर्मशाळेत निशुल्क राहण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच मंदिर परिसरातील प्रसादालयात निशुल्क भोजन देखील करता येते.
सज्जनगडावर परिसरात कल्याण स्वामी यांचे स्मारक आहे. तसेच समर्थ रामदासांच्या शिष्या वेण्णा बाई आणि अक्काबाई स्वामी यांचे देखील समाधी वृंदावन मंदिर आहे. ब्रह्मपिसा स्मारक आहे. एकूणच काय तर सज्जनगड परिसर सध्या केवळ समर्थमय आहे.

धाब्याचा मारुती मंदिर : सज्जनगडाच्या पश्चिम तटबंदीजवळ समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. असे सांगण्यात येते की, गडाच्या या पश्चिम बाजूस छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांची भेट होत असे. धाब्याच्या मारुतीपासून ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता दिसतो.
सज्जनगड परिसरात आल्यानंतर साताऱ्याहून ठोसेघर धबधबा, अजिंक्यतारा किल्ला आणि कास पठार ही ठिकाणे देखील जवळ आहेत. पर्यटक सज्जनगडावर आल्यानंतर यासर्व ठिकाणी जावून येवू शकतात.
आजच्या दिवशी सज्जनगडावर पडलेल्या अवस्थेतील तटबंदी आहेत आणि गड म्हणून काही भग्न अवस्थेतील अवशेष आहेत. परंतु समर्थ रामदास स्वामींच्या समाधी स्थळामुळे सज्जनगडास विशेष श्रद्धास्थान प्राप्त झाले आहे. रामदासी आणि समर्थ रामदासांना श्रद्धास्थान मानणारे भाविक गडावर नियमित येत असतात. तसेच राम नवमीला गडावर उत्सव असतो. त्यामुळे समर्थांच्या या भूमीवर आपण पर्यटक म्हणून अथवा भाविक म्हणून गेल्यानंतर गडाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 

-    नागेश कुलकर्णी

Monday, May 1, 2017

दुर्ग भ्रमंती - परम प्रतापी पुरंदर

ज्याप्रमाणे प्रतापगडाने पराक्रमी इतिहास अनुभवलेला आहे, त्याचप्रमाणे पुरंदरनेदेखील मोरारबाजी देशपांडे यांचा पराक्रम पाहिलेला आहे. पुणे परिसरातील इतर किल्ल्यांच्या दृष्टीने पुरंदरचा इतिहास खुप महत्वाचा आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. तसेच पेशवे कालीन इतिहासात देखील पुरंदरावर पेशव्यांचे विशेष वर्चस्व होते. त्यामुळेच इतिहासात पुणे आणि कोकणच्या वाटेवर असलेल्या पुरंदर किल्ल्याला इतिहासात विशेष महत्व होते. पुरंदरपासून जेजुरी गड जवळ आहे.

 
पोवाडे गाणारे शाहीर आणि इतिहासकार, पुरंदरचे वर्णन करत असताना म्हणतात,
 
अल्याड जेजुरी,

पल्याड सोनोरी |

मध्ये वाहते कऱ्हा,

पुरंदर शोभतो शिवशाहीचा तुरा ||
 
पुरंदर किल्ला बांधण्यात आलेल्या डोंगराचे नाव ‘इंद्रनील पर्वत’ असे होते. त्यामुळे पुरंदर म्हणजे इंद्र, याप्रमाणे किल्ल्यास पुरंदर हे नाव देण्यात आले असावे असा कयास आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. नारायणपूरमध्ये यादवकालीन महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. त्यामुळे हा किल्ला साधारण १००० ते १२०० वर्षांपूर्वी बांधण्यात आला असावा असे इतिहासकार सांगतात.

पुण्याहून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी सासवडला आल्यानंतर नारायणपूरकडे जाणाऱ्या एस.टी.बसने आपण किल्ल्यापर्यंत पोहचू शकतो. तसेच स्वतःचे वाहन घेवून गेल्यानंतर याच मार्गाने पुरंदरच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते. सासवड हे पुणे जिल्ह्यातील पुणे जेजुरी रस्त्यावरील तालुक्याचे ठिकाण आहे.
 
 
पुरंदरचा इतिहास :
एका आख्यायिकेनुसार द्रोणगिरी पर्वत उचलून नेत असताना, हनुमानाकडून पर्वताचा काही भाग या परिसरात खाली पडला होता, तोच हा डोंगर. पुढे यास ‘इंद्रनील पर्वत’ असे देखील म्हटले गेले.

पुरंदर किल्ल्याबाबतच्या इतिहासातील नोंदीनुसार बहामनी राजवटीमध्ये हा किल्ला चंद्र संपत देशपांडे यांच्या ताब्यात होता. त्यांनी पुरंदर किल्ल्यावर पुर्ननिर्माणास प्रारंभ केला. त्यानंतर इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीमधील अनेक किल्ले स्वराज्याला जोडून घेतले होते. म्हणूनच शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढण्यास पाठवले होते. तेंव्हा पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज देवून, लढाई जिंकली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना गडाचा कारभारी म्हणून नेमले.

इतिहासातील महत्वाची घटना या पुरंदरच्या पायथ्याशीच घडलेली आहे. ती घटना म्हणजे पुरंदरचा तह. दिलेर खान आणि मिर्झाराजे जयसिंग, औरंगजेबाच्या सांगण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि दख्खन प्रांतातील त्यांच्या कारवाया थांबवण्यासाठी शिवाजी राजांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याच्या हेतूने, दख्खन प्रांतात दाखल झाले होते. त्यावेळी छत्रपतींचे मावळे आणि खानच्या शिबंदीमध्ये पुरंदरजवळ लढाई झाली होती. दिलेर खानाने लढाईच्या शेवटच्या टप्प्यात वज्रगड ताब्यात घेवून पुरंदरावर हल्ला केला, त्यावेळी पुरंदरच्या माचीवर दिलेर खानाची आणि मुरार बाजींची लढाई झाली होती. लढाईमध्ये शेवटपर्यंत लढा दिल्यानंतर मुरारबाजी धारातीर्थी पडले आणि पुरंदरही पडला. पुरंदर किल्ला पडल्याचे समजताच छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले. त्यानंतर ११ जून १६६५ रोजी झालेला ’पुरंदरचा तह’ इतिहासात प्रसिद्ध आहे. पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी पुणे परिसरातील २३ किल्ले मोघल साम्राज्यास दिले होते. पुरंदरचा तह जरी झालेला असला, तरीही पुरंदर परिसराने मुरार बाजींचा परम प्रताप पाहिलेला होता, त्यामुळे या पुरंदर किल्ल्यास ‘परम प्रतापी पुरंदर’ अशी उपाधी नकळतपणे मिळते.

त्यानंतर मराठेशाहीतील सरदार निळोपंत मुजुमदार यांनी किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी पुरंदर ताब्यात घेवून त्याचे नाव ’आजमगड’ ठेवले होते. त्यानंतरच्या लढाईमध्ये मराठेशाहीतील सरदाराने पुरंदर परत स्वराज्यात आणला, त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी किल्ला पेशव्यांच्या स्वाधीन केला. पुण्याच्या आधी पुरंदर किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. दरम्यान पेशवाईतील श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांचा जन्म पुरंदरावर झाला. त्यानंतर इंग्रजांनी इ.स. १८१८ मध्ये पेशवाईच्या पडावानंतर पुरंदर ताब्यात घेतला.
 
पुरंदर किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. सह्याद्री पर्वताच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही डोंगररांगा पुर्व दिशेस विस्तृतपणे वाढत जातात, त्यापैकी एका डोंगर रांगेवर सिंहगड आहे. त्याच्याच पुढे भुलेश्वरजवळ, याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड किल्ले आहेत. कात्रजचा घाट, बापदेव घाट, दिवेघाट चढून गेल्यानंतर पुरंदरच्या पायथ्याशी पोहचता येते.

पुरंदरच्या पायथ्यापासून मुरारगेटने किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर समोर "पद्मावती तळे" दिसते. त्याच्या पुढे इंग्रजांच्या काळात बांधलेले एक चर्च आहे. चर्चपासून पुढे गेल्यानंतर "वीर मुरार बाजींचा” पुतळा आहे.
 
बिनी दरवाजा : बिनी दरवाज्यामधून किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर “वीर मुरारबाजीं” चा पुतळा दिसतो. किल्ल्याच्या उत्तर दिशेस असलेल्या माचीवरील हा एकमेव दरवाजा आहे. बिनीच्या दरवाज्यातून पुढे गडाकडे थोडे पुढे गेल्यानंतर ‘पुरंदरेश्वर’ मंदिर आहे.
 
पुरंदरेश्वर मंदिर : हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले महादेवाचे पुरंदेश्वर मंदिर, गडावरील मुख्य स्थान आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिरात देवेंद्र इंद्र देवाची मूर्ती आहे. पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील बाजूस पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. पुरंदेश्वर मंदिराबाहेर एक विहिर आहे, या विहिरीस "मसणी विहीर" असे म्हणतात.
 
राजाळे तलाव आणि भैरवखिंड : पुरंदरेश्वर मंदिरापासून पुढे चालत गेल्यानंतर उत्तर माचीच्या टोकावर राजाळे तलाव आहे. राजाळे तलावाच्या पुढे पुरंदर आणि वज्रगड यांच्यामध्ये भैरवखिंड आहे. भैरव खिंडीतून वज्रगडाकडे जाण्यासाठी वाट आहे.
 
पेशव्यांचा वाडा : पुरंदेश्वर मंदिराच्या एका बाजूस पेशव्यांच्या दुमजली वाड्याचे भग्न अवशेष दिसतात. पेशवाईच्या सुरुवातीस बाळाजी विश्वनाथ यांनी हा वाडा बांधून घेतला होता. या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते.
 
दिल्ली दरवाजा : पुरंदर किल्ल्याच्या उत्तर दिशेस हा दरवाजा आहे. दरवाज्यावर हनुमानाची मुर्ती आहे. दिल्ली दरवाज्यातून आत गेल्यानंतर "गणेश दरवाजा" आहे. गणेश दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर "बावटा बुरुज" आहे. पूर्वी येथे ध्वज लावला जात असे.
 
कंदकडा : गणेश दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर समोर पूर्व दिशेस पसरलेला कंद कडा नजरेस पडतो. या कड्याच्या शेवटी कंदकडा बुरूज आहे. कंदकडा पाहून परत गणेश दरवाज्याजवळ आल्यानंतर शेंदर्‍या बुरुजाकडे जाता येते.
 
शेंदर्‍या बुरूज : हा बुरुज पद्मावती तळ्याच्यामागे आहे. स्थानिकांकडून सांगण्यात येते की, शेंदर्‍या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत होता, तेव्हा गडावरील उपस्थित सोननाक यांनी त्यांचा मुलगा आणि सून यांचा बळी देवून बुरूज उभा केला होता.
 
केदारेश्वर मंदिर : पुरंदरचे मूळ दैवत असलेल्या केदारेश्वर मंदिरात जाण्यासाठी दगडी जीना बांधलेला आहे. तसेच या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीला भाविक केदारेश्वराच्या दर्शनासाठी आजही येत असतात. केदारेश्वराचे मंदिर पुरंदर किल्ल्यावरील सर्वात उंचावरील ठिकाण आहे. मंदिर परिसरातून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहीडा, मल्हारगड हे किल्ले दिसतात. केदारेश्वर मंदिराजवळच केदारगंगेचा उगम होतो.

आजच्या परिस्थितीत पुरंदर किल्ला आणि वज्रगड भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सुरेक्षेच्या कारणास्तव पुरंदर किल्ला बंदच असतो. आणि वज्रगड किल्ल्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. भारतीय सैन्याकडून पुरंदर किल्ल्यावरील कंदकडा, केदार दरवाजा आणि बावची माची सुरक्षेच्या कारणास्तव तारांचे कुंपण घालून बंद करण्यात आली आहेत. तसेच भैरवखिंड आणि वज्रगड परिसरात जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.

मुरार बाजींच्या परम प्रतापाची साक्ष देणारा पुरंदर आज भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे गडावर सुरक्षा व्यवस्था अधिक असते. परंतु इतिहासातील लढायांची आठवण करून देणारा हा किल्ला पाहिल्यानंतर मराठेशाहीचा सार्थ अभिमान वाटतो.

हा लेख महा तरुण भारत साठी लिहिलेला आहे .

नागेश कुलकर्णी