Saturday, August 8, 2015

कलाम सर सलाम


‘कलाम सर’, ‘मिसाइल मॅन’, ‘भारतरत्न’, लोकांचे राष्ट्रपती, एक आधुनिक काळातील वैज्ञानिक ऋषी, देशाचा इंजिनिअर अशा एक ना अनेक नावांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आदर केला जातो. परंतु खरे तर हे व्यक्तिमत्व अखेरपर्यंत एका प्राध्यापकाच्याच वेशात राहिले. वयाची 80 वर्षे सरून गेली असताना देखील ज्ञानाचा हा अगाध सागर, एखाद्या तरुण प्राध्यापकास देखील लाजवेल अशा तर्‍हेने वाहत राहिला. कलाम सरांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देखील ते शिलाँग-मधील एका कॉलेजमध्ये व्याख्यान देत होते. त्यामुळेच तर अशा या चिरतरुण आधुनिक काळातील विज्ञान ऋषीला वय वर्षे 96 उलटून गेलेल्या अर्जन सिंग या भारतीय सैन्यातील मार्शलने लष्करी गणवेशात येऊन सलाम केला. कलाम सर सलाम...!
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, यांच्यासारखं व्यक्तिमत्व खरं तर एका युगामध्ये एकदाच घडतं, असं म्हणाव लागेल, अगदी विज्ञाननिष्ठ प्राध्यापकापासून ते देशाचा राष्ट्रपती होऊन आपण राजकीयदृष्ट्यादेखील किती सक्षम आहोत हे दाखवण्यापर्यंत कलाम सरांनी अष्टपैलुत्वाचा नवा अध्याय देशासमोर रचला. देशाच्या
सर्वोच्च नागरी पदावर प्रथमच एखादी गैरराजकीय व्यक्ती स्थानापन्न झाल्यामुळे देशातील जनतेने देखील कलाम सरांचे त्यावेळी स्वागतचं केले. त्यामुळेच देशातील सर्वात लोकप्रिय आणि युवा वर्गामध्ये मिसळणारे ‘लोकांचे राष्ट्रपती’ हा बहुमान कलाम सरांना मिळाला. तसे पाहता काही वेळाच असे होत असावे, की यशाला देखील एकाच व्यक्तीच्या मागे लागून, त्या व्यक्तीकरवी समाजमनावर बिंबवण्याची इच्छा झाली असावी. कलाम सरांबाबत असे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, कारण सध्या स्थितीत जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला देखील कलाम सरांनी पोखरण-2 (11 मे 1998 - 13 मे 1998) ला घडवून आणलेल्या जमिनीअंतर्गत अणुस्फोटाबाबत माहिती होऊ दिली नव्हती. अमेरिकेच्या ताकास तूर लागू न देता ‘ऑपरेशन शक्ती’ या नावाने ओळखला जाणारा पोखरण-2 येथील जमिनीअंतर्गत अणुस्फोट घडवून आणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बरोबरीने कलामसरांनी देखील भारत देश अणुशकतीच्या बाबतीत अग्रेसर असल्याचे सार्‍या जगाला दाखवून दिले होते. त्यामुळेच तर कलाम सरांच्या निधनानंतर अमेरिकेच्या व्हाइट हाऊसवरील त्यांचा राष्ट्रीय ध्वज एका दिवसासाठी अर्ध्यावर उतरवून, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमतःच एखाद्या भारतीय नागरिकास या प्रकारे श्रद्धांजली वाहण्यात आली.
कलाम सरांच्या आयुष्याचा प्रवास तसा पाहता खडतरच होता, त्यावरही मात करत या विज्ञाननिष्ठाने अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्यरीत्या सांगड घालत देशामध्ये वैज्ञानिक क्रांती घडवून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. इस्रो, डीआरडीओ आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करत असताना कलाम सरांनी अनेक नवनवीन संशोधनांस नवे रूप दिले. भारताच्या अंतराळ संशोधनातील महत्त्वाच्या एस्.एल्.व्ही. आणि पी.एस्.एल्.व्ही या उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीमध्ये कलाम सरांचेच मार्गदर्शन कामी आलेले होते. एस्.एल्.व्ही.-3 या उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीबाबत कलाम सरांनी पत्रकारांशी बोलताना एक किस्सा सांगितला होता, तो येथे आवर्जून सांगावासा वाटतो. कलाम सर - ‘एकदा रात्री उशीरापर्यंत कलाम सर त्यांच्या कार्यशाळेमध्ये काम करत बसले होते. (थुंबा येथील कार्यशाळा) त्यावेळी तेथे विक्रम साराभाई आले आणि त्यांना पाहून म्हणाले की, एवढ्या रात्री एकटाच हे काय करतो आहेस?, त्यावर कलाम सर म्हणाले की, ‘सर मला अंतराळ संशोधनात काम करण्याची खूप इच्छा आहे, त्यामुळे एक संशोधन करत आहे, त्यावर विक्रम साराभाई म्हणाले की, ‘तू केवळ काम न करत राहता, डोळ्यासमोर एक व्हिजन ठेव आणि काम कर, अंतराळात उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तिसर्‍या टप्प्यासाठी तू काम सुरू कर, कारण अमेरिकेकडे पहिल्या टप्प्याचे संशोधन आहे.’ त्यावर कलाम सरांनी तिसर्‍या टप्प्याचे काम (एस्.एल्.व्ही-3) सुरू केले. पुढे दोन वर्षांच्या कालावधीनंतर श्रीमान् विक्रम साराभाई परत एकदा कलाम सरांना भेटायला आले, यावेळी त्यांनी विचारले, की काम झोल असेल तर, तुझे संशोधन उद्या येथे येणार्‍या कॅनडातील शिष्टमंडळापुढे सादर कर. कलाम सरांनी त्याप्रमाणे हे तिसर्‍या टप्प्यातील संशोधन कॅनडातील त्या शिष्टमंडळासमोर सादर केले आणि त्यावेळी ते तिसर्‍या टप्प्यातील संशोधन पाहून आश्‍चर्यचकित झालेल्या त्या कॅनडातील शिष्टमंडळाने कलाम सरांचे ते (एस्.एल्.व्ही-3) पेटंट विकत घेतले.’ हे सर्व सांगण्यामागचा उद्देश हाच की डोळ्यासमोर एखादे व्हिजन ठेवल्यानंतर ती पूर्णत्वाकडे घेऊन गेल्यानंतरच माणसाने सुखाची झोप घ्यायला हवी. ही व्हिजनच भविष्यातील भारतास घडवू शकेल याचसाठी कलाम सरांनी भारतासाठी ‘व्हिजन 2020’चा पाया रचला होता.
इस्रो आणि डी.आर्.डी.ओ.मध्ये असताना देखील सरांनी अनेक प्रकल्पांना नावारूपास आणले. एस्.एल्.व्ही-3 च्या उभारणीनंतर कलाम सरांनी पी.एस्.एल्.व्ही. ची उभारणी केली. तसेच इस्रोमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करत असताना भारतीय बनावटीच्या रोहिणी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यामध्येदेखील कलाम सरांचे योगदान होते. तसेच डी.आर.डी.ओ.मधील अग्नी आणि पृथ्वी या जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांच्या बांधणीमध्ये देखील कलाम सरांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. यामुळेच तर त्यांना ‘मिसाईल मॅन’ ही उपमा बहाल करण्यात आली.
कलाम सरांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे ‘ऑपरेशन शक्ती’ (पोखरण-2). त्यावेळी कलामसर आणि राजगोपाल चिदंबरम् यांच्या नेतृत्वाखाली शक्ती 1 ते शक्ती 5 अशा एकूण पाच अणुबॉम्बचा अणुस्फोट घडवून आणून भारताने अणुचाचणी यशस्वीरीत्या पार पाडली होती. यावेळी भारतावर काही कारणास्तव अनेक प्रकारचे निर्बंध असल्याकारणाने ‘ऑपरेशन शक्ती’चे कामकाज रात्रीच्या वेळी करावे लागत असे. कलाम सर त्यांच्या सहकार्‍यांसमवेत लष्करी गणवेशामध्ये उंटावरती बसून पेट्रोलिंगला निघालेल्या लष्करी अधिकार्‍यासारखे घटनास्थळी पोचतं, रात्रभर अंधारामध्ये, अमेरिकन उपग्रहांची नजर चुकवत काम करत आणि सकाळी ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण करून परत त्यांच्या बेस कॅम्पवर येत असत, या सर्व घटनेला मूर्तरूप देत असताना कलाम सरांच्या वैज्ञानिक आणि राजकीय कल्पनाशक्तीच्या बळावरचं, हा प्रयोग यशस्वी होऊ शकला. कलाम सर आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या या यशस्वी ऑपरेशन शक्ती नंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील त्यांचे भरभरून कौतुक केले होते. तसेच नंतर भारताच्या भेटीवर आलेल्या प्रत्येक अमेरिकन राष्ट्रपतींनी देखील आवर्जून कलाम सरांना भेटण्याची वेळ मागून घेतली. जगभरातील 40 च्या वर विद्यापिठांनी मानद डॉक्टरेट देऊन कलाम सरांचा पुढील काळामध्ये आदर सत्कार केला. परंतु भारत सरकारतर्फे कलाम सरांना कोणताही उचित पुरस्कार दिला गेला नाही, कारण ‘भारतरत्न’ या पुरस्कारासही आपलासा वाटणारा या प्राध्यापकास हा पुरस्कार 1997 सालीच देण्यात आला होता. त्यामुळे पुढे चालून राजकारणात उतरायची इच्छा नसताना देखील राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवून राष्ट्रपती ‘लोकांचा राष्ट्रपती’ होण्याचा बहुमान कलाम सरांना लाभला.
एक स्वच्छ प्रतिमेचा, राजकारणाची कसलीही जाण नसलेला आणि तरी देखील एक कणखर राष्ट्रपती म्हणून डॉ. कलाम सरांची राष्ट्रपतिपदाची कारकीर्द सर्वश्रुत आहे. राष्ट्रपती भवनात प्रवेश करत असताना मोजक्या वस्तूंनिशी (एक बॅग कपड्यांची आणि इतर दोन ते तीन बॅगा पुस्तकांच्या) प्रवेश करणारा देशाचा सर्वोच्च  प्रमुख प्रसारमाध्यमांसहित देशाने प्रथमच पाहिला असावा. सोनिया गांधींचा विदेशीचा मुद्दा आणि भारत-अमेरिका अणुकरार याबाबत एक राष्ट्रपती म्हणून डॉ. कलाम सरांनी यावेळी महत्त्वाची भूमिका निभावली होती. लोकांमध्ये मिसळून राहणार्‍या राष्ट्रपतींनी तत्कालीन एन्डीए सरकार जाऊन यूपीए सरकार 2004 साली सत्तेत आल्यानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान होऊ नये याखातर भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रपतींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु कुठल्याही दबावाला बळी न पडता, पंतप्रधानपदावर विराजमान होणारी व्यक्ती भारतीयच असायला हवी असा निर्णय देत डॉ. कलाम सरांनी डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी विराजमान केले होते. तसेच यूपीए सरकारशी अतिशय सौहार्दाचे आणि विनयपूर्वक संबंध असलेल्या राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी त्यावेळी ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ हे बिल संसदेच्या पुनर्विचारार्थ पाठवले होते. राष्ट्रपतींनी कॅबिनेटच्या मर्जीविना असा निर्णय घेतल्याचे कारण पुढे करून सरकारने त्यावेळी राष्ट्रपतींच्या वागणुकीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु अगदी राजकारणाची जाण नसली तरी एक उत्तम आणि कार्यशील राष्ट्रपती म्हणून काम करणार्‍या कलाम सरांनी ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट बिल’ संसदेस पुनर्विचारार्थ पाठवण्याचा आपला निर्णय कायम ठेवला होता. कलाम सरांच्या अशा या सरळ आणि निर्भीड वागणुकीमुळे राजकीय नेतृत्वाला देखील ते हवेहवेसे वाटत होते. राष्ट्रपतिपदावर असतानाच भविष्यातील भारताचे सध्याच्या युवापिढीला कलाम सरांनी स्वप्न दाखवण्यास सुरुवात केली होती. याखातर युवकांनी डोळ्यासमोर एक व्हिजन ठेवून काम करावे असे सतत कलाम सर सांगत असत. त्यामुळेच भविष्यात भारत नक्की महासत्ता होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भारताला ‘व्हिजन 2020’ चे स्वप्न दाखवले होेते. राष्ट्रपती भवनामधून, (25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007) आपली कारकीर्द पूर्ण केल्यानंतर बाहेर पडतेवेळी केवळ आपल्यासोबत एक कपड्याची बॅग आणि इतर तीन पुस्तकांच्या मोठ्या बॅगा बाहेर घेऊन पडणार्‍या या प्राध्यापक राष्ट्रपतीस खराच मनापासून सलाम...!
आयुष्यात जगत असताना डोळ्यासमोर एक ध्येय ठेवून ते पूर्ण करण्यासाठी अविरत झगडत राहिल्यास आयुष्य सार्थकी लागते, असे मरेपर्यंत सांंगत राहणार्‍या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (अवुल पाकिर जैनुलाब्द्दीन अब्दुल कलाम ) सरांना वैमानिक व्हायचे होते, परंतु त्याही पेक्षा मोठे स्वप्न उराशी बाळगून ज्ञानसागराचा ध्यास घेतलेल्या या प्राध्यापकाने आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत अनेक कलाम (आदरभाव आहे) घडवले. आधुनिक काळातील या विज्ञानऋषीस विद्यार्थ्यांशी संवाद साधन असतानाच आयुष्याचा शेवट करवून घ्यावासा वाटला हा एक योगायोगच म्हणावा लागेल. अग्निपंखात देशाच्या ‘मिसाइल मॅन’ला आदरपूर्वक, भावपूर्ण श्रद्धांजली...!

आणि भारतातील युवापिढीकडून कलाम सरांना अखेरचा सलाम...!

प्रसारमाध्यमांची डोकी ठिकाणावर आहेत का?

सनसनाटी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी आणि त्याचबरोबर स्वत:ला लोकशाहीचे उपासक म्हणवून घेणाऱ्या काही अति रिकाम-टेकड्या वृत्तपत्रांनी डोकं गहाण ठेवल्यागत वागण्याची जणू काही एकमेकांमध्ये स्पर्धाच चालवली आहे. आता येथे विषय असा होऊ शकतो, दुसऱ्यांवर टीका करण्याच्या हेतूनेच मी हे लिखाण करत आहे. परंतु प्रिय वाचक मित्रहो, याकूब मेमनच्या नुकत्याच होऊन गेलेल्या खटल्यास ज्याप्रकारे माध्यमांनी रंगरंगोटी करून आपल्यासमोर मांडले, ते सारे पाहून आज खूप दिवसांनंतर लिखाण करावेसे वाटले तर असो.
प्रिय,
वाचक लोकहो,
            प्रसारमाध्यमे, ज्यांना लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे, त्यांचे सर्वांचे डोके ठिकाणावर आहे का? हे तपासण्याची वेळ आज जनतेवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे माध्यमांवरील तासन्तास चालणाऱ्या (निरर्थक) चर्चा आणि त्यांमुळे निर्माण होणारा सततचा संभ्रम यांपासून स्वत:ला दूर ठेवतं या टीआर्पीवाल्यांना देखील देशप्रवाहात घेऊन येण्यासाठी लोकसहभागामधून प्रयत्न व्हायला हवेत, असे वाटते.
            ब्रेकिंग न्यूजआणि त्यातहीती प्रथमत: आमच्याच वाहिनीवर आम्ही दाखवत आहोत.’ असे म्हणणाऱ्या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांची रेलचेल वाढलेली आहे. याकूब मेमनच्या खटल्यामध्ये त्याचा दिवस कसा सुरू झाला, तो किती वाजता झोपला किंवा सकाळी किती वाजता उठला किंवा त्याने सकाळी थंड पाण्याने / गरम पाण्याने आंघोळ केली, त्याला त्याच्या आवडीचा नाश्ता खायला घातला गेला, त्याची शेवटची इच्छा विचारल्यानंतर त्याने त्याच्या मुलीशी फोनवरून बोलण्याची इच्छा बालून दाखवली, त्याला पोलिस प्रशासनाकडून कोणत्या रंगाचे कपडे घालावयास दिले, इथपासून ते त्याने फाशीस सामोरे जाण्याआधी काय म्हटले इथपर्यंत सर्व बाबी अगदी तिखटमीठ लावून रंगवून, एकाचढ एक ॅनिमेटेड व्हिडिओज् वगैरे तयार करून दाखवण्यात आले. या सर्व टीआरपीवाल्यांची अक्कल कोठे गेली होती, यावेळी?
            कारागृहाच्या बाहेर शंभर फुटांवरून अंतर्ज्ञानी असल्यागत त्यांचा हा वृत्तांकन सोहळा सुरू होता. (मी सहमत आहे, की वृत्तांकन केले जावे, परंतु त्यात पत्रकारिता धर्माचा अनादर होणार नाही, याचा विचार केला जावा. याप्रकारचा अतिउत्साही / आत्मघातकी वृत्तांकन सोहळा भावना भडकवण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी साजरा होऊ नये. याकूब नागपूर कारागृहामध्ये काय करत असावा किंवा काय करत असेल याबाबत कल्पना लढवल्या जात असतांना दुसरीकडे कारागृहाबाहेरील परिस्थिती दाखवली जात होती. याकूब मेमनचे नातेवाईक हॉटेलमधून बाहेर पडून, नागपूर कारागृहाजवळ जाईपर्यंतच्या क्षणांचे छायाचित्रण प्रक्षेपित करणे, मृतदेहाचा कारागृहापासून विमानतळापर्यंतचा प्रवास, माहीम (मुंबई) मधील तणावाचे वातावरण, जसे काय एखादा थोर नेता मरण पावला असल्यागत त्याच्या अंत्ययात्रेस जमलेला हजारोंचा जनसमुदाय, या सर्व बाबींचे अगदी साग्रसंगीत वृत्तांकन या महामहीम टीआर्पीवाल्यांनी अगदी चोखंदळपणे केले.
            परंतु यांच्या या टीआर्पीचा चढता उतरता आलेख झुलत असतांना, तिकडे रामेश्वरमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न दिवंगत डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम सर यांच्या अंत्यविधीस लाखोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायास यांनी खूप कमी महत्त्व दिले. अधून मधून खालील स्क्रोलबारवर या बातम्या झळकत होत्या एवढेच...!
            याकूब मेमनच्या फाशीचा घटनाक्रम अशाप्रकारे दाखवण्याची खरेच गरज होती का? तो कोणी देशभक्त होता का? एका निरपराधी व्यक्तीस फासावर लटकवले, किंवा भाजप सरकार सत्तेत असल्याकारणानेच एका मुस्लिम व्यक्तीस तडकाफडकी निर्णय घेऊन फासावर लटवले गेले. असे हे म्हणतात. (२० वर्षांच्यावरचा कालावधी यांच्यादृष्टीने तडकाफडकीकसा काय असू शकतो.) एका देशद्रोह्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर, राष्ट्रपती आणि राज्यपालांकडून दयेचा अर्ज फेटाळून झाल्यानंतर त्याने २० वर्षे कारावास भोगल्यानंतर या टीआर्पीवाल्यांच्या नजरेत तो निर्दोष कसा? मग १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये मरण पावलेले ते २५७ जण खुनी होते का? त्यांचा काय अपराध होता?
            हे सर्व पाहता टीआर्पीवाल्यांना खरेच अक्कल गहाण ठेवण्याची सवय आहे का? याचा आपण वाचक मित्रांनी विचार करायला हवा. कारण याकूबबाबत विविध वाहिन्यांवरून ज्या प्रकारे प्रक्षेपण केले गेले त्यामुळे मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या लोकल, रेल्वे ओस पडल्या होत्या. अठ्ठावीस हजारांच्या जवळपास पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला होता. या तणावा मधून जर एखाद्या व्यक्तीच्या हातून काही अनुचित प्रकार घडला असता, तर त्याची ठिणगी पडून देशभर प्रतिक्रिया उमटण्यास वेळ लागला नसता. अक्कलशून्य टीआर्पीवाल्यांचा हा अतिशहाणपणा, सरकारविरोधी (भाजपविरोधी) लिखाण एवढे टोकाचे होते, की त्यांनी याकूब मेमनच्या फाशीच्या दुसऱ्या दिवशी संविधानाचा अनादर करत भराभर या देशद्रोह्याच्या समर्थनार्थ लिखाणे केली तो कसा निर्दोष होता आणि याकूबला पकडले त्यावेळी तत्कालीन प्रमुख रमण यांनी २००७ साली एक लेख लिहिला होता. याबाबत अनेक महाशयांनी अनेक तर्कवितर्क लढवले. सरकारी धोरणांना एक शोकान्त उन्मादही उपमा देण्यापासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने याकूबच्या फाशीच्या विरोधात आपल्या पदाचा राजीनामा दिला. येथपर्यंत सारी थोतांडे त्यांनी अगदी सढळ अलंकारिक भाषेमध्ये मांडून टाकली. अशा प्रकरणांना व्यापक स्वरूप दिल्यानंतर देशात जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, याचे भान या टीआर्पीवाल्यांना नसते का हो? हिंदू-मुस्लिम, दलित-उच्चवर्णीय, गरीब-श्रीमंत या सर्व प्रकारांची दरी,  भेदभाव तंटा निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यामध्ये या टीआर्पीवाल्यांचा सहभाग असतो. दोन रुपड्यांची नोकरी करणारा एखाद्या वृत्तवाहिनीचा छोटामोठा ॅन्करदेखील अगदी राष्ट्रपती असल्यागत वागतो. वेळ-काळ यांचे भान बाळगता कुठेही काहीही बरळल्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण होऊ शकतो, हे या टीआर्पीवाल्यांच्या लक्षात येत असावे की नसावे? स्वत:ची पोळी भाजण्याकरता हे किती मोठा अपराध करतायत हे यांना सांगण्या आणि समजण्यापलीकडचे आहे.
            सन्माननीय वाचकहो, स्वत:ला लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणवणाऱ्या या टीआर्पीवाल्यांवर आणि त्यांच्या मानसिकतेवर खरेच प्रश्नचिन्ह उभे राहते. मी या घडीला विचार केला तो आपणा सर्व सुजाण नागरिकांच्यादेखील डोक्यात आला असावा, हीच सदिच्छा...!
            आपल्या भारत देशाने लोकशाहीमध्ये माध्यमांना पुरेशी सूट दिलेली आहे, परंतु त्याचा देशाच्या हितासाठी फायदा करून घेता हे, देशांतर्गतच तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर इंग्रज सरकारसारखा प्रेस व्हर्नॅ/क्युलर ॅक्ट लावायला हवा. (हा राग व्यक्त झालेला आहे) शेवटी लोकशाहीत कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जाऊ नये हे जरी सत्य असले तरी त्याचवेळी समाजामध्ये एकमेकांच्या वर्तणुकीचा एकमेकांस त्रास होता कामा नये, हेही तितकेच खरे! यामुळे समाजात तेढ, घबराट किंवा अस्थिरता निर्माण होणार नाही याची काळजी शेवटी सरकारने आणि लोकशाहीतील जनतेचा आवाज म्हणून प्रसारमाध्यमांनी घ्यायची असते. त्यामुळे माध्यमांनी सावधपणाची वागणूक ठेवण्याची आवश्यकता आहे. अगदी स्वत:चे पोट भरण्यापासून ते एखादी बातमी प्रसारित करण्यापर्यंत रामदास स्वामींच्या या दोन ओळी अंगीकारणे आवश्यक वाटते.
सकल कामनापूर्ती मुखे राहे सरस्वती
मधुर शब्दे बोलावया
            वाचकहो, आपण देखील एका जागरूक नागरिकाची भूमिका निभावत, माध्यमांच्या या भंपक कथा सरितांना बळी पडता भारत देशाच्या घटनेवर विश्वास ठेवणारा एक सुजाण नागरिक, म्हणून समाजात वावरायला हवे, ही विनंती कळावे.
आपलाच
लेखक मित्र