Monday, April 10, 2017

दुर्ग भ्रमंती - स्वराज्याचे तोरण ‘तोरणा’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक प्रमुख शिलेदार म्हणून तोरणा (प्रचंडगड) किल्ल्याची इतिहासात नोंद आहे. महाराष्ट्रातील सर्व गडांचा स्वतःचा असा विशिष्ठ इतिहास आहे. त्याचप्रमाणे तोरणा किल्ल्यावर देखील इतिहास घडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, त्यावेळी सर्वप्रथम तोरणा किल्ला सर केला असे इतिहास सांगतो. विजापूरच्या अदिलशहाच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. महाराजांनी तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळे या किल्ल्यास ‘तोरणा’ असे नाव दिले गेले, असे काही इतिहासकार सांगतात. तर काही इतिहासकारांच्या मते गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव ‘तोरणा’ असे ठेवण्यात आले होते. गड काबीज केल्यानंतर शिवाजी महाराजांनी गडाची पहाणी करत असताना गडाचा प्रचंड विस्तार पाहून, गडाचे नाव 'प्रचंडगड' असे ठेवले होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला तोरणा किल्ला अगदी गरुडाच्या घरट्यासारखा दिसतो. त्यामुळे त्यास ‘गरुडाचे घरटे’ असे देखील म्हणतात.
           पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बंगलोरकडे जात असताना नसरापूरहून वेल्हे या गावी पोहचता येते. वेल्हे हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेटहून वेल्हय़ाला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा आहे. तसेच पुण्याहून खडकवासला धरणापासून पुढे खानापूर गावाकडे जात असताना एक वाट पाबे घाटमार्गे वेल्हय़ाकडे जाते. या वाटेने देखील वेल्ह्यास पोहचता येते. स्वतःचे वाहन असेल तर या मार्गे जात असताना सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत वेल्ह्याकडे जाता येते.
           इतिहासामध्ये तोरणा किल्ला कोणी आणि इ. स. च्या कोणत्या षतकात बांधला याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु गडावर असलेल्या मंदिरांच्या जीर्ण अवशेषांवरून किल्ल्याच्या इतिहासाबाबत काही गोष्टी सांगण्यात येतात. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमदने हा किल्ला जिंकला होता. त्यानंतर कालांतराने हा किल्ला निजामशाही आणि आदिलशाहीच्या अखत्यारीत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी काही निवडक मावळ्यांसह तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले. त्यावेळी तोरणा किल्ल्याची डागडुजी करत असताना कोठी दरवाज्याजवळ सापडलेल्या धनाचा वापर करून मुरुंबदेवाच्या डोंगरावर असलेल्या राजगडाची उभारणी करण्यात आली होती. हाच राजगड पुढे अनेक वर्ष शिवाजी राजांच्या स्वराज्याची राजधानी होता. तसेच कोठी दरवाज्याजवळ सापडलेल्या धनाचा वापर तोरणा (प्रचंडगड) किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी देखील करण्यात आला होता.
         राजगडाला पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या तीन माच्या आहेत, त्याप्रमाणे तोरण्याला देखील झुंजार आणि बुधला या दोन माच्या आहेत. यातील झुंजार माची विस्ताराने छोटी असली तरी चढण्यास खुप अवघड आहे. राजगड आणि तोरण्याच्यामध्ये बुधला माची विस्तारलेली आहे. पावसाळ्यामध्ये बुधला माचीवर खुप मोठ्या प्रमाणात छोटे लाल रंगाच खेकडे आणि माकडे असतात.
            तोरणा (प्रचंडगड) हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर आहे. गडाची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत आहेत. तोरणा किल्ल्याच्या उत्तरेला कानद नदी आणि दक्षिणेला वेळवंडी नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. तोरणा किल्ला दगडी कातळामध्ये उभा आहे. गडावर जात असताना तोरण्याचा पहिला दरवाजा आपल्याला लागतो. दगडी कातळात असलेल्या या दरवाजाला बिनीचा दरवाजा म्हणतात. बिनीच्या दरवाजातून पुढे गेल्यानंतर कोठीचा दरवाजा लागतो.

तोरजाई देवी मंदीर (कोठी दरवाजा) आणि मेंगाई देवी मंदीर : 
              कोठी दरवाज्यासमोरच्या दगडी चिरेबंदी तटामध्ये एक छोटे मंदीर आहे. त्यामध्ये तोरणजाई देवीची मूर्ती आहे. याच ठिकाणी खोदाई करत असताना, मावळ्यांना मोहरांचे हंडे सापडल्याची इतिहासात नोंद आहे. गडाकडे पुढे जात असताना वाटेवर तोरणा टाके आणि खोकड टाके आहेत. या टाक्यापासून थोडे पुढे चालत गेल्यानंतर समोर बालेकिल्ल्याचे अवशेष आहेत. त्यापुढे जवळच मेंगाई देवीचे मंदीर आहे. रात्री मुक्कामी येणारे दुर्गप्रेमी या ठिकाणी राहतात. तसेच नवरात्र उत्सव काळात, वेल्हे गावातील लोक गडावरती देवीचा नवरात्र उत्सव साजरा करतात. मेंगाई देवी मंदिरापासून झुंजार माचीकडे जात असताना हनुमान बुरुज, भेळ बुरुज, सफेली बुरुज माळेचा बुरुज, फुटका बुरुज आणि लक्कडखाना आहे.

झुंजार माची : 
          मेंगाई देवीच्या मंदिराकडून हनुमान बुरुजाकडे आल्यानंतर, बुरुजाच्या तटावरुन खाली उतरुन दिंडीच्या दाराने झुंजार माचीकडे जाता येते. झुंजार माचीकडे जाणारी वाट सोपी नाही. तसेच पावसाळ्यात झुंजार माचीकडे जाणे धोकादायक देखील ठरू शकते. त्यामुळे पर्यटकांनी सतर्क राहून झुंजार माचीकडे जाणे गरजेचे आहे. झुंजार माचीवर पावसाळ्यात खुप मोठ्या प्रमाणात धुके असते. तसेच उन्हाळ्यात माचीवरून दूरवरचा प्रदेश नजरेत येतो.

तोरणेश्वर महादेवाचे मंदिर :
          मेंगाई देवी मंदीर परिसरामध्ये भग्न वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. याच ठिकाणी बुधला माचीकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर तोरणेश्वर महादेवाचे मंदीर आहे. या परिसरात देखील पावसाळ्यात खुप मोठ्या प्रमाणात धुके असते. समोरचा माणूस देखील दिसू शकत नाही. तर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी गेल्यानंतर तोरणा (प्रचंडगड) परिसरातील राजगड, रोहीडा, रायरेश्वर, केंजळगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, महाबळेश्वर, प्रतापगड पर्यंतचा परिसर दिसतो.

बुधला माची :
      गडाच्या पश्चिमेला बुधलामाची आहे. बुधला माचीच्या टोकाला चित्ता दरवाजा आहे. बुधला माचीकडून गडाकडे येत असताना कोकण दरवाजा, टकमक बुरुज, शिवगंगा, पाताळगंगा टाके दिसते. बुधला माचीवरून एक वाट भगत दरवाज्याकडे, तर दुसरी वाट घोडजित टोकाकडे जाते. भगत दरवाजाच्या वाटेने राजगडाकडे जाता येते. पावसाळ्यात या वाटेने जाणे धोक्याचे ठरू शकते, या ठिकाणी अतिशय कठीण वाट आहे. आणि एकदम उभा कातळ कडा आहे.

बालेकिल्ला :
     बालेकिल्ला ही तोरणा (प्रचंडगड) गडावरील सर्वात उंचावरची जागा आहे. बुधला माची परिसरातील सह्याद्रीचे सौंदर्य पाहून पुन्हा परतीच्या वाटेने मेंगाई देवीच्या मंदिराकडे आल्यानंतर बालेकिल्ल्याचे अवशेष दिसतात. बालेकिल्ल्यापासून गडाचा भलामोठा विस्तारही नजरेस पडतो. खरेतर त्याच्या या विस्तारावरूनच शिवाजी महाराजांनी तोरण्याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले होते.

      तोरणा किल्ल्यावर पुणे आणि परिसरातील पर्यटक सुट्ट्यांमध्ये येत असतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या या गरुडाच्या घरट्यावर येणाऱ्या पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा देखावा नजरेत साठवताना, स्वतःची सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून, जास्त उत्साही न होता, गड पाहणे गरजेचे आहे. कारण तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत चढाईस अवघड आहे.


हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे .

No comments:

Post a Comment