Monday, April 3, 2017

एम.पी.एस.सी म्हणजे सेवा करण्याची संधी

१० वीची परीक्षा दिल्यानंतर, परीक्षा झाल्याच्या आनंदात काही विद्यार्थी असतात तर काही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना भविष्यात काय करू, कुठे जावू याची चिंता लागलेली असते. त्यावेळी नातेवाईक, मित्र परिवार यांच्याकडून विविध सल्ले दिले जातात. कोणी म्हणत ११ वी १२ वी साठी सायन्स घे आणि पुढे मेडिकल इंजिनियरिंग कर खुप स्कोप आहे. तर कोणी म्हणत आर्ट्स नको घेऊ कॉमर्स घे तिकडे स्कोप आहे. कोणी म्हणत पुढे वकिली कर, वगैरे वगैर सर्व हितचिंतक नवनवीन पर्याय सुचवत असतात. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देवून एम.पी.एस.सी परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या सेवेत प्रशासकीय अधिकारी हो असा हि सल्ला काही जण देतात.
आपण जर स्पर्धा परीक्षा देऊन एम.पी.एस.सी परीक्षेची तयारी करून महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेत जावू इच्छित असाल तर एक लक्षात घ्यायला हवे, की मुळात एम.पी.एस.सी आणि यु.पी.एस.सी या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या आहेत. एम.पी.एस.सी ची परीक्षा दिल्यानंतर केवळ महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून निवड होऊ शकते, तर यु.पी.एस.सी.ची परीक्षा दिल्यानंतर देशाच्या प्रशासकीय सेवेत निवड होऊ शकते. त्यामुळे एम.पी.एस.सीची परीक्षा द्यायची आहे असं ठरवल्यानंतर आपण मग ११ वी १२ वी करत असताना सायन्स घेवू अथवा आर्टस् घेवू अथवा कॉमर्स घेवू याचा विचार करू लागतो. अशावेळी खरंतर आर्ट्स घेवून १२ वीची परीक्षा दिल्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी बी.ए.ला ऍडमिशन घेऊन अभ्यास सुरू करणे आवश्यक असते. आता बी.ए.च का कराव? हा प्रश्न पडू शकतो, परंतु यामागे देखील कारण आहे, बी.ए. करत असताना अभ्यासक्रमात जे विषय आहेत, तेच विषय पुढे एम.पी.एस.सी च्या अभ्यासक्रमात आहेत.
एम.पी.एस.सी चा अभ्यास करत असताना केवळ पुस्तकी अभ्यास करून थांबता येणार नाही. यासाठी अभ्यासक्रमातील पुस्तकी वाचनासोबतच इतर माहितीपर पुस्तकांच्या वाचनाची देखील आवड असणे आवश्यक आहे. एम.पी.एस.सी चा अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून तो आपल्यामधील सर्वांगीण गुणांचा विकास असतो. त्यामुळे आपण केवळ परीक्षार्थी म्हणून अभ्यास न करता विद्यार्थी म्हणून अभ्यास करणे आवश्यक असते. असे म्हणतात की, एम.पी.एस.सी. च्या परीक्षेत ‘Any Thing Under the Sun’ काहीही विचारू शकतात. त्यामुळे एका विशिष्ठ साच्यातील अभ्यास या परीक्षेसाठी व्यर्थ आहे. एम.पी.एस.सी. चा अभ्यास करत असताना आपण केवळ परीक्षाभिमुख दृष्टीकोन डोळ्यासमोर न ठेवता, समजून उमजून अभ्यास करणे आवश्यक असते. अभ्यास करताना आपणास काय अभ्यास करायचा आहे, यापेक्षा काय नाही करायचं याबबत लक्षात यायला हव.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एम.पी.एस.सी. परीक्षेच्या माध्यमातून राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट (अ) परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट (ब) परीक्षा, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा, सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी-२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट (ब), पोलीस उपनिरीक्षक परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, कर सहायक गट (क) परीक्षा, सहायक परीक्षा आणि लिपिक-टंकलेखक परीक्षा या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षामधून निवड झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या अधिकारातील विविध पदांवरती नियुक्ती केली जाते. उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, डी.वाय.एस.पी., सी.ओ., पी.एस.आय. अशा विविध पदांवर उमेदवार नियुक्त केले जातात. त्यांना नियुक्तीपूर्वी पुण्यातील यशदा या संस्थेमध्ये प्रशिक्षण देखील दिले जाते.

उमेदवारांची पात्रता :
डिसेंबर २०१६ मध्ये एम.पी.एस.सी.ने प्रकाशित केलेल्या जाहिरातीतील सूचना पत्रकानुसार उमेदवाराचे वय एम.पी.एस.सी. राज्यसेवा, मुख्य परीक्षेच्या वेळी १९ वर्षांपेक्षा कमी नसावे अथवा ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. मागासवर्गीय गटातील आणि अनुसूचित जाती- जमातींमधील उमेदवारास वयाच्या ४३ व्या वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. अंध, कर्णबधिर अथवा अस्थीव्यंग्य असणाऱ्या उमेदवारांना ही परीक्षा देण्यासाठी खुल्या गटापेक्षा १० वर्षे अधिक शिथिलता असते.
वयाची १९ वर्ष पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देवू शकतो. तसेच यु.पी.एस.सी. परीक्षेप्रमाणे एम.पी.एस.सी. परीक्षा उमेदवारांनी किती वेळा द्यावी यावर आयोगाकडून कोणतेही बंधन नाही. आपण वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देवू शकतो. परंतु परीक्षा देण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) असणे आवश्यक आहे. ‘राज्य सेवा मुख्य परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं.

एम.पी.एस.सी. परीक्षेचे स्वरूप :
मुख्यत्वे ही परीक्षा- पूर्व परीक्षा (प्रिलिम्स), मुख्य परीक्षा (मेन्स) आणि मुलाखत (इंटरव्यू) अशा तीन स्तरांवर घेतली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या क आणि ड वर्गाच्या परीक्षांसाठी मुलाखत घेतली जात नाही. तसेच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी देखील घेतली जाते. ही परीक्षा सापशिडीप्रमाणे असते तुम्ही या तीन टप्प्यातील एका परीक्षेतून बाद झालात तर तुम्हाला परत पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागते.
पूर्व परीक्षा: राज्यसेवा पूर्व परीक्षा ही वैकल्पिक (मल्टिपल चॉईस) प्रकारची असून त्यात सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) आणि बुद्धिमत्ता चाचणी (CSAT) या प्रत्येकी २०० गुणांच्या दोन पेपर्सचा समावेश असतो.
पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययन या विषयाचा अभासक्रम विचाराल तर त्यामध्ये भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह), भारताचा भूगोल (महाराष्टाच्या संदर्भासह), पर्यावरण, अर्थकारण, महाराष्ट्रातील समाजसेवक, राज्यघटना आणि शासन व्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान,  गणिती क्षमता, चालू महाराष्ट्र संबंधी घडामोडी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी हे विषय असतात. यामध्ये महाराष्ट्रासंबंधी घटनांवर आधारित विषयांवर अधिक प्रश्न असतात.

मुख्य परीक्षा: मुख्य परीक्षा ही देखील पूर्व परीक्षेप्रमाणे वैकल्पिक प्रकारची असून यु.पी.एस.सी. प्रमाणे लेखी अर्थात लघु किंव दीर्घ उत्तर स्वरूपाची नसते. आयोगाने ठरवल्याप्रमाणे मुख्य परीक्षा ही ८०० गुणांची असून त्यात ६ पेपर असतात. यापैकी सामान्य अध्ययनासाठी एकूण ६०० गुण (सामान्य अध्ययन पेपर १, २, ३, ४ - प्रत्येकी १५० गुण) तर मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी प्रत्येकी १०० गुण असतात. यासाठी आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेत स्थळाला भेट देवून अधिक माहिती मिळवू शकतो.
मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपरमध्ये पहिला पेपर इतिहास-भूगोलचा, दुसरा भारतीय राज्यघटना आणि प्रशासन (महाराष्ट्राच्या संदर्भासह), तिसरा मानव संसाधन विकास आणि अधिकार तसेच चौथा पेपर अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवर आधारित असतो.

मुलाखत: मुलाखतीचा टप्पा या परीक्षेतील सर्वात महत्वाचा टप्पा असतो. एम.पी.एस.सी.कडून सर्व गटातील परीक्षेसाठी वेगवेगळ्या स्तरांवर मुलाखत घेतली जाते. राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची १०० गुणांची मुलाखत घेतली जाते. तज्ञ व्यक्तींचे सुमारे पाच सदस्यीय पॅनल एम.पी.एस.सी. मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत घेते. यामध्ये उमेदवारांच्या नेतृत्वगुणांचा, संभाषण कौशल्याचा आणि विचारशक्तीचा विशेष विचार केला जातो. मुलाखतीच्या या प्रक्रीयेतुन उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्रातील विविध प्रशासकीय पदांवर नियुक्ती केली जाते. यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून किती उमेदवारांची मागणी आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पदांसाठी जाहिरात काढत असते.

एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होवून महाराष्ट्र राज्याच्या सेवेत प्रशासकीय अधिकारी होवू इच्छिणाऱ्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना शेवटी एवढच सांगावस वाटत की, आपण केवळ शासकीय नोकरीत जाण्याच्या उद्दिष्टाने या परीक्षेची तयारी करणे अपेक्षित नाही. तर देश सेवा करण्याची संधी उपलब्ध होत आहे, सामाजिक क्षेत्रात आपल्या कल्पनेतून काही कल्पक गोष्टी राबवून आपण लोकांसाठी काही तरी करू शकतो. या भावनेने आपण जर या परीक्षेस सामोरे गेलात तर यश नक्की मिळेल. बाकी अभ्यास करणे, यश मिळणे न मिळणे हा प्रक्रियेचा भाग आहे. या क्षेत्रात येवून स्पर्धा परीक्षांची तयारी करणार असाल तर. सर्वकाळ सर्व शुभेच्छा !

No comments:

Post a Comment