Saturday, February 9, 2019

सहसंवेदना

मनुष्य प्राणी भूतकाळाच्या अनुभवांवर मार्गक्रमण करत पुढे जात असतो. आपण बोलत असताना असं ही म्हणतो, की "आपण अनुभवातून शिकतं पुढे जातो."असे अनुभव प्रत्येक व्यक्तीला येत असतात. यामध्ये काही सुखद अनुभव असतात, तर काही नकळत दु:ख देऊन जातात. अन् ते अनुभव आपल्या दिनचर्येचा केव्हा भाग बनून जातात, हे आपणास कळतही नाही. शेवटी प्रत्येक व्यक्तीला येणारे सर्व अनुभव सारखेच असतील असं ही आपण म्हणू शकत नाही. इतरांना आलेले अनुभव आपणही अनुभवू शकलो असतो तर अथवा आपण अनुभवू शकतो का? याबाबत बोलत असताना आपणांस फक्त विचार करावा लागतो.

केवळ अन् केवळ इतर व्यक्तींच्या भावना जाणून घेवून आपण त्यावर जाहीर प्रकट होवू शकतो. यामध्ये अर्थातच प्रत्येकाच्या  अनुभवानुसार बदल होत असतोच. इतर व्यक्तींचे अनुभव सुखद असतील तर आपण संवेदना म्हणून आनंद व्यक्त करु शकतो अन् दु:खद असतील तर? तर काय? दु:खद असतील तर वेळेनुसार आपण दु:खात सहभागी होतो. बस्स...! मग सहसंवेदना??? केवळ व्याख्या म्हणाल तर  एखाद्या भावनाप्रधान व्यक्तीच्या जागी स्वतःला पाहुन त्याच्या भावना अनुभवण्यास अनुकूल असणे, म्हणजे सहसंवेदना! ही झाली केवळ व्याख्या.

पुढे असे म्हणता येईल की, प्रत्येक व्यक्तीला इतर व्यक्तीबाबत सहसंवेदना असू ही शकते. परंतु त्याचा समतोल प्रत्येकजण स्वतःला आलेल्या अनुभवांवरुन राखत असतो. शेवटी स्वानुभवच सहसंवेदना ठरवतं असतो. परंतु सहसंवेदना अनुभवताना अनुभवणाऱ्या व्यक्तीला आलेल्या अनुभवाप्रमाणे समान सहसंवेदना अनुभवणे तसे कठीणच म्हणावे लागेल. कारण  शेवटी तो ज्याचा त्याचा स्वभाव असतो. त्यामुळे सहसंवेदना अनुभवणे हे तसे काम आहे.

सहसंवेदना अनुभवताना अनुभवणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या अनुभवातून काय जाणीव होते. अथवा ते कोणत्या प्रकारे आणि कश्या भावना व्यक्त करतात,याचे आपण केवळ तार्किक विश्लेषण करू शकतो. परंतु आपण जशास तशा भावना अनुभवून त्यात प्रत्यक्ष भाग घेवू शकत नाही. आपण गरज वाटल्यास मौखिक दु:ख व्यक्त करतो. हेच सत्य आहे. हे तार्किक बोलणे झाले, परंतु उदाहरणं द्यायचे झाले, तर एखाद्या विधवा स्त्रीच्या बाबतीत आपण संवेदना व्यक्त करतो. वेळप्रसंगी सहसंवेदना ही व्यक्त करतो. परंतु जर त्याठिकाणी एखादी बलात्कार पिडीत व्यक्ती असेल तर अनेक वेळा केवळ भावना व्यक्त करणे, संवेदना व्यक्त करणे या पलिकडे जावून सहसंवेदना व्यक्त करण्याचे धाडस खूप कमी जण करतात. कारण बलात्कार पिडीत व्यक्तीच्या भावना आपल्या या सामाजिक पद्धतीनुसार आपण नाही समजू शकत. त्यामुळे व्यक्तीनुसार, स्थानानुसार आणि अनुभवानुसार संवेदना व सहसंवेदना यांचे परिणाम बदलत राहतात.

शेवटी सहसंवेदना म्हणजे केवळ इतरांच्या भावना समजावून घेवून त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून भावना अनुभवून पाहणे असे म्हणणे, कमी योग्य ठरेल. कारण व्यक्तीनुसार स्वभाव बदलत राहतो. त्यामुळेच सहसंवेदना अनुभवणे किंवा व्यक्त करणे तसे सोपे काम नाही.

सहवेदना, सहसंवेदना हे सर्व मान्य आहे. परंतु अगदी खासगी अथवा मनातील गोष्टी सहसंवेदनेद्वारे अनुभवता येणार नाहीत. यामध्ये पुरुषांना स्त्रियांच्या संवेदना उमगणार नाहीत, तर स्त्रियांना पुरुषांच्या. परंतु काही भावना अत्यंत उत्कट व सर्वांमध्ये समान असू शकतात. उदा. राष्ट्र भावना. पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवत असताना, राष्ट्रगीत गात असतानाची भावना. परंतु शेवटी याठिकाणी ही  प्रत्येक मन वेगळं असू शकतं. ते वेगळेपण आणि खासगीपण घेऊनच प्रत्येकजण जगतो.  इथे यायचं एकटं, जायचं एकटं हे जेवढं खरंय तेवढंच एका मर्यादेपर्यंत, जगायचं एकटं हेही खरंच आहे! त्यामुळे शेवटी स्वतःच्या अनुभवानुसार प्रत्येक व्यक्ती भावनेवर मात करतो, हेच खरे आहे.

- नागेश कुलकर्णी 

No comments:

Post a Comment