Friday, September 4, 2015

आरक्षण


आरक्षण. आरक्षण म्हटले की सर्व जुन्या जाणत्या लोकांना देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा आणि नंतर मंडल आयोगाच्या काही शिफारसींपर्यंतचा भयानक इतिहास आठवत असणार, कारण आपल्या देशात मागून काही मिळत नाही. तर मग आंदोलने, जाळपोळ, देशव्यापी बंद यामार्फत सरकारला झुकवण्याचा प्रयत्न करण्याचे कौशल्य अगदी सर्वांच्याच अंगी भिनलेले आहे. कोण कुठला हा नवखा तरुण हार्दिक पटेल म्हणे, आरक्षणासाठी गुजरात सरकार आणि केंद्र सरकारला वेठीस धरू पाहत आहे. आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा सांगणार्या या हार्दिकरावांना सरदारांचा इतिहास ठाऊक नाही, असे दिसते; कारण संविधान निर्मितीवेळी आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आणि आदरणीय सरदार पटेल यांच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेला वाद सर्वश्रुत आहे. सरदारांना आरक्षण हा प्रकार कदापि मान्य नव्हता.
             हार्दिक पटेल हा गुजरातमधील पाटीदार (उच्चभ्रू) समाजातील असून, पटेलांचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करावा, यासाठी या हार्दिकरावांची पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या मार्फत धडपड सुरू आहे. तसा हा पाटीदार समाज .. १९३१ पर्यंत कुणबी पटेल म्हणून ओळखला जात होता, परंतु १९३१ च्या जातीनिहाय जनगणनेनुसार हे देखील आपल्याकडील मराठा आणि कुणबी मराठा  याप्रमाणे वेगळे, म्हणजेच पाटीदार म्हणून ओळखले जाऊ लागले. जनगणनेमध्ये बहुसंख्य असलेल्या या पाटीदारांपैकी लेवा पटेल आणि कडवा पटेल या मुख्य पोटजाती उद्योगधंदे आणि व्यापार यांमार्फत स्वतःची उपजीविका करत असल्याचे त्यावेळी सरकारकडून सांगण्यात आले. म्हणजेच, तसे पाहता व्यवसायाने उच्चभ्रू (वैश्य) असलेला हा पाटीदार समाज आणि त्यांचा व्यवसाय स्वातंत्र्यानंतर देशाच्या बाहेर जगभर पसरला. मग आता प्रश्न पडतो की उच्चभ्रू आणि सुस्थितीत असणारा एखादा समाज कायदा हातात घेऊन अशा प्रकारे आरक्षणाची मागणी करू लागला तर, उद्या ऊठसूट सर्वच आरक्षणाची मागणी करत सुटतील. महाराष्ट्रातील मराठा समाज, राजस्थानातील गुज्जर समाज आणि पंजाब, हरियाणामधील जाट समाजातील रिकामटेकडे, आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. आंदोलन, जाळपोळ याला बळी पडून केंद्र सरकारने जर या पाटीदारांचा समावेश आरक्षितांमध्ये केला तर हळुहळू इतरांच्याही मागण्या सुरू होतील आणि अनारक्षित समाजाच्या बुद्धिकौशल्याचे अथवा आरक्षितांमधील बुद्धिवादाला मोलच उरणार नाही. कारण राखीव जागा असल्याकारणाने कोणीही उच्चपदांवरील अधिकारी म्हणून स्वतःचा डंका पिटू लागेल. अशा परिस्थितीत हा आरक्षणाचा गुंता देशाची आर्थिक प्रगती रोखत, यामार्फत जातीवादाचे विष समाजामध्ये असेच पसरवत राहील, असे दिसते.
            स्वातंत्र्योत्तर काळात सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. प्रथमतः संविधान निर्मितीच्यावेळी १० वर्षांच्या कालमर्यादेकरिता आरक्षणाची तरतूद होती. परंतु, पुढे साठीच्या आणि सत्तरीच्या दशकातील काँग्रेसी राजकारणाने केवळ  मतांच्या पेट्या भरण्याच्या उद्देशाने, संविधानात दुरुस्ती करत आरक्षण दर १० वर्षांसाठी पुनर्निश्चित केले. त्यात ज्या समाजाकडून आपल्या पक्षास अधिक फायदा त्या समाजास अधिक आरक्षण देऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली गेली. त्याचीच परिणती म्हणून सध्या देशात १५% अनुसूचित जाती, .% अनुसूचित जमाती आणि २७% इतर मागासवर्ग, असा आपला समाज सरकारमार्फतच विभागला गेला आहे. एका बाजूस जातीवाद नष्ट करण्याच्या बाजूने आपण किती प्रयत्न करत आहोत, हे दाखवून दिले जाते तर दुसरीकडे हे असले आरक्षणाचे गाजर दाखवून केवळ मतांच्या पेट्या भरण्याकरीता सर्वच राजकीय पक्षांकडून फायदा उचलला जातो. इंदिरा सरकारच्या पराभवानंतर १९७७ साली मोरारजी देसाई पंतप्रधान झाले, त्यावेळी देखील आरक्षण आणि तत्सम विषयांचा वाद काही नवा नव्हता. कारण त्यावेळी देखील १९७० च्या दरम्यान याच गुजरात राज्यातील पटेल वर्गास चीतपट करण्याचा प्रयत्न काँग्रेसजनांनी चालवला होता. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या चिमणभाई पटेलांचा इतिहास यावेळी नव्याने सांगणे आवश्यक नाही. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा ज्या पक्षाकडून पूर्ण केली गेली त्या पक्षाचा पाठिंबा घेऊन ते पाटीदार पटेल, मुख्यमंत्री म्हणून स्वतःच मिरवू लागले. त्याचवेळी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मंडल आयोगाची स्थापना करून मतपेट्या भरण्याची नवीन तरतूद (भविष्यकालीन) करून ठेवली. तसे पाहता त्यावेळी १० वर्षांचे दोन टप्प्यांचे आरक्षण दिल्यानंतर सर्वांसाठी समान नागरी कायदा लागू करायला हवा होता परंतु, मंडल आयोग आणि त्यांच्या शिफारसी यांमुळे उच्चभ्रू आणि हरिजन यांच्याबरोबर तिसरा इतर मागसवर्गीय हा नवीन समाज निर्माण झाला. या राजकारण्यांच्या अतिमूर्खपणामुळे हे आरक्षणाचे भूत त्यावेळेपासून अधिक प्रखरपणे भारतीयांच्या मानगुटीवर बसत गेले. १९९० च्या सुमारास व्ही.पी. सिंगांच्या सरकारने तर मंडल आयोगाच्या शिफारसी मान्य करून इतर मागासवर्गीयांना २७% आरक्षण आंदण म्हणून दिले. हे आरक्षण देत बसण्यापेक्षा २००२ साली करण्यात आलेली शिक्षण हक्क घटना दुरुस्ती लवकरात लवकर अंमलात आणली असती अथवा देशाची आर्थिक प्रगती साधण्याच्या दृष्टिकोनातून सर्व मागासवर्गीयांसाठी आरक्षण सोडून इतर काही तरतुदी केल्या असत्या तर सरकारांना वर्षानुवर्षे चालणारे हे जातीचे राजकारण थांबवता आले असते.
            संविधानामध्ये कलम १६(), २९() आणि ४६ नुसार समाजातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि अन्य कारणांमुळे मागास व्यक्तींसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली असल्यामुळे, ‘त्यांना त्यांचा हक्क मिळायलाच हवावगैरे म्हणणाऱ्यांची देखील सध्या समाजात रेलचेल असते. परंतु त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की जे संविधान आरक्षणाबाबत बोलते, तेच संविधान समान नागरी कायदा, कायद्यापुढे समानता (कलम १४), धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास मनाई (कलम १५) देखील करते, तर मग अशा प्रकारे आरक्षण मागत बसण्यापेक्षा सर्वांना समान शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्यास हा खटाटोप करण्याची आवश्यकताच भासणार नाही. खरे तर यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
            देशातील इतर समाजांप्रमाणे आरक्षण मंजूर करवून घेण्यासाठी सरकारला धमकावणाऱ्या हार्दिकरावांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपले आदर्श असल्याचे म्हटले आहे, हेही किती हास्यास्पद आहे! तर दुसरीकडे सध्याचे महाराष्ट्रातील काही भाडोत्री विचारवंत सध्या मराठा समाजास कशा प्रकारे आरक्षण मंजूर करवून घेता येईल आणि राज्यात ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतर हा नवा नसलेला वाद पुन्हा कसा उकरून काढता येईल यासाठी अट्टाहासाने प्रयत्न करत आहेत. त्यात हार्दिकरावांच्या या हेकेखोरपणामुळे गुजरात मॉडेल फोल ठरल्याचा जावईशोध लावणाऱ्यांमधील हे महाराष्ट्रातील पुरोगामी अविचारी, केवळ मोदी सरकारला धारेवर धरण्याच्या प्रयत्नात बडबड करत आहेत. खरे विचारवंत असतील तर यांनी आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजाला चार महत्त्वाच्या गोष्टी समजूतदारपणे समजावून सांगायला हव्यात. परंतु केवळ जातीवाद निर्माण करून सरकार अस्थिर करणे आणि नंतर दोन्ही स्वतःचा ढोल बडवणे या पलिकडे हे काही करू शकत नाहीत. गुजरातमधील या दुराग्रही मागणीचा प्रभाव म्हणून हे हार्दिकराव देशभर ओळखले जाऊ लागले असताना, गुजरातमधील या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी गुजरात क्षत्रिय ठाकोर सेना, अल्पेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सरकारला दम देऊ लागली आहे. त्यांच्या मते सरकारने % जरी आरक्षण पाटीदारांना दिेले तर २०१७ सालच्या निवडणुकांमध्ये गुजरातमध्ये कमळ फुलू देणार नाही. आता ही गोष्ट पाहण्यासारखी असेल की, आरक्षणाचा हा तिढा गुजरात सरकार आणि केंद्र सरकार कशाप्रकारे हाताळून या ऐतखाऊ आणि लाचार लोकांचा उद्रेक शांत करते. (मी येथे लाचार हा शब्द वापरला, कारण व्यवसाय/उद्योग करून उपजीविका करण्यापेक्षा आरक्षणाची मागणी करत सरकारी मालमत्तेचे नुकसान करणारे ऐतखाऊ आणि लाचारच म्हणावे लागतील.)
           
ज्येष्ठ पत्रकार आदरणीय भाऊ तोरसेकरांनी नुकताच या विषयावर पटेलांच्या मोदींनाहार्दिक शुभेच्छाया नावे, एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये वैधानिक इशारा देत आदरणीय भाऊ म्हणतात की, कुठल्याही व्यक्ती, संघटना, विचार वा भूमिकेच्या दावणीला ज्यांची बुद्धी बांधलेली आहे; त्यांच्या मानसिक आरोग्यास हा लेख वाचणे अपायकारक ठरू शकते. त्यापुढे विश्लेषण करत असताना भाऊंनी पटेल विरुद्ध काँग्रेस (इंदिराजी) आणि आजवरचे राजकारण याची अगदी व्यवस्थितपणे मांडणी करून आरक्षणाचा मुद्दा कसा वाढत गेला आणि पटेल (पाटीदार) कशा प्रकारे व्यापारी वृत्तीऐवजी नोकरी मिळवण्यासाठी आरक्षणाच्या कुबड्या मिळाव्यात म्हणून कसे प्रक्षोभक होत गेले याबाबत माहिती दिली आहे. आजच्या परिस्थितीत एक पटेल व्यक्ती मुख्यमंत्रिपदी विराजमान असताना देखील  गुजरातमध्ये आरक्षणाची मागणी जोर धरू लागली, यामागे काहीतरी राजकीय हितसंबंध गुंतलेले असू शकतात, असे भाऊंच्या अनुभवातून समजते. तर मग केवळ केंद्र सरकार आणि गुजरातमधील राज्यसरकारसह इतर राज्यांतील सरकारे अस्थिर करण्याच्या उद्देशाने चालवलेला हा आरक्षणाचा वाद कितपत योग्य आहे? अथवा या पाटीदारांना भविष्यात आरक्षणाच्या लाभाची गरज आहे काय? याचा विचार व्हायला हवा कारण गुजरातमधील पटेलांना आरक्षण दिल्याच्या दुसऱ्या दिवसापासून देशातील इतर समाज देखील आरक्षणाच्या मागणीचे अस्त्र उगारत सरकारदरबारी ठिय्या आंदोलने उभी करतील. मग भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न अथवा मोदी सरकारचा भविष्यातील अच्छे दिनांचा दावा पोकळ आणि अस्थिर ठरल्याशिवाय राहणार नाही.

            खरे पाहता हार्दिकरावांनी केवळ भडकाऊ भाषणे देऊन आणि सरदारांचे वारसदार असल्याचे सांगत चालवलेला गोंधळ थांबवून आपल्या पद्धतीने एखादा उद्योग करायला हवा. कारण सरकारला याउपर इतरही उद्योग आहेत आणि सरकार एकूण जागांच्या ५०% पेक्षा अधिकांना आरक्षण देऊही शकत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. हार्दिकरावांना जर सर्वोच्च न्यायालय आणि संविधान यांचा सन्मान करणे जमत नसेल तर त्यांच्या या आंदोलनास आणि ऐतखाऊ आरक्षणाच्या मागणीस देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून माझ्या हार्दिक शुभेच्छा!

Saturday, August 8, 2015

कलाम सर सलाम


‘कलाम सर’, ‘मिसाइल मॅन’, ‘भारतरत्न’, लोकांचे राष्ट्रपती, एक आधुनिक काळातील वैज्ञानिक ऋषी, देशाचा इंजिनिअर अशा एक ना अनेक नावांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आदर केला जातो. परंतु खरे तर हे व्यक्तिमत्व अखेरपर्यंत एका प्राध्यापकाच्याच वेशात राहिले. वयाची 80 वर्षे सरून गेली असताना देखील ज्ञानाचा हा अगाध सागर, एखाद्या तरुण प्राध्यापकास देखील लाजवेल अशा तर्‍हेने वाहत राहिला. कलाम सरांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देखील ते शिलाँग-मधील एका कॉलेजमध्ये व्याख्यान देत होते. त्यामुळेच तर अशा या चिरतरुण आधुनिक काळातील विज्ञान ऋषीला वय वर्षे 96 उलटून गेलेल्या अर्जन सिंग या भारतीय सैन्यातील मार्शलने लष्करी गणवेशात येऊन सलाम केला. कलाम सर सलाम...!
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, यांच्यासारखं व्यक्तिमत्व खरं तर एका युगामध्ये एकदाच घडतं, असं म्हणाव लागेल, अगदी विज्ञाननिष्ठ प्राध्यापकापासून ते देशाचा राष्ट्रपती होऊन आपण राजकीयदृष्ट्यादेखील किती सक्षम आहोत हे दाखवण्यापर्यंत कलाम सरांनी अष्टपैलुत्वाचा नवा अध्याय देशासमोर रचला. देशाच्या
सर्वोच्च नागरी पदावर प्रथमच एखादी गैरराजकीय व्यक्ती स्थानापन्न झाल्यामुळे देशातील जनतेने देखील कलाम सरांचे त्यावेळी स्वागतचं केले. त्यामुळेच देशातील सर्वात लोकप्रिय आणि युवा वर्गामध्ये मिसळणारे ‘लोकांचे राष्ट्रपती’ हा बहुमान कलाम सरांना मिळाला. तसे पाहता काही वेळाच असे होत असावे, की यशाला देखील एकाच व्यक्तीच्या मागे लागून, त्या व्यक्तीकरवी समाजमनावर बिंबवण्याची इच्छा झाली असावी. कलाम सरांबाबत असे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, कारण सध्या स्थितीत जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला देखील कलाम सरांनी पोखरण-2 (11 मे 1998 - 13 मे 1998) ला घडवून आणलेल्या जमिनीअंतर्गत अणुस्फोटाबाबत माहिती होऊ दिली नव्हती. अमेरिकेच्या ताकास तूर लागू न देता ‘ऑपरेशन शक्ती’ या नावाने ओळखला जाणारा पोखरण-2 येथील जमिनीअंतर्गत अणुस्फोट घडवून आणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बरोबरीने कलामसरांनी देखील भारत देश अणुशकतीच्या बाबतीत अग्रेसर असल्याचे सार्‍या जगाला दाखवून दिले होते. त्यामुळेच तर कलाम सरांच्या निधनानंतर अमेरिकेच्या व्हाइट हाऊसवरील त्यांचा राष्ट्रीय ध्वज एका दिवसासाठी अर्ध्यावर उतरवून, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमतःच एखाद्या भारतीय नागरिकास या प्रकारे श्रद्धांजली वाहण्यात आली.
कलाम सरांच्या आयुष्याचा प्रवास तसा पाहता खडतरच होता, त्यावरही मात करत या विज्ञाननिष्ठाने अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्यरीत्या सांगड घालत देशामध्ये वैज्ञानिक क्रांती घडवून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. इस्रो, डीआरडीओ आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करत असताना कलाम सरांनी अनेक नवनवीन संशोधनांस नवे रूप दिले. भारताच्या अंतराळ संशोधनातील महत्त्वाच्या एस्.एल्.व्ही. आणि पी.एस्.एल्.व्ही या उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीमध्ये कलाम सरांचेच मार्गदर्शन कामी आलेले होते. एस्.एल्.व्ही.-3 या उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीबाबत कलाम सरांनी पत्रकारांशी बोलताना एक किस्सा सांगितला होता, तो येथे आवर्जून सांगावासा वाटतो. कलाम सर - ‘एकदा रात्री उशीरापर्यंत कलाम सर त्यांच्या कार्यशाळेमध्ये काम करत बसले होते. (थुंबा येथील कार्यशाळा) त्यावेळी तेथे विक्रम साराभाई आले आणि त्यांना पाहून म्हणाले की, एवढ्या रात्री एकटाच हे काय करतो आहेस?, त्यावर कलाम सर म्हणाले की, ‘सर मला अंतराळ संशोधनात काम करण्याची खूप इच्छा आहे, त्यामुळे एक संशोधन करत आहे, त्यावर विक्रम साराभाई म्हणाले की, ‘तू केवळ काम न करत राहता, डोळ्यासमोर एक व्हिजन ठेव आणि काम कर, अंतराळात उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तिसर्‍या टप्प्यासाठी तू काम सुरू कर, कारण अमेरिकेकडे पहिल्या टप्प्याचे संशोधन आहे.’ त्यावर कलाम सरांनी तिसर्‍या टप्प्याचे काम (एस्.एल्.व्ही-3) सुरू केले. पुढे दोन वर्षांच्या कालावधीनंतर श्रीमान् विक्रम साराभाई परत एकदा कलाम सरांना भेटायला आले, यावेळी त्यांनी विचारले, की काम झोल असेल तर, तुझे संशोधन उद्या येथे येणार्‍या कॅनडातील शिष्टमंडळापुढे सादर कर. कलाम सरांनी त्याप्रमाणे हे तिसर्‍या टप्प्यातील संशोधन कॅनडातील त्या शिष्टमंडळासमोर सादर केले आणि त्यावेळी ते तिसर्‍या टप्प्यातील संशोधन पाहून आश्‍चर्यचकित झालेल्या त्या कॅनडातील शिष्टमंडळाने कलाम सरांचे ते (एस्.एल्.व्ही-3) पेटंट विकत घेतले.’ हे सर्व सांगण्यामागचा उद्देश हाच की डोळ्यासमोर एखादे व्हिजन ठेवल्यानंतर ती पूर्णत्वाकडे घेऊन गेल्यानंतरच माणसाने सुखाची झोप घ्यायला हवी. ही व्हिजनच भविष्यातील भारतास घडवू शकेल याचसाठी कलाम सरांनी भारतासाठी ‘व्हिजन 2020’चा पाया रचला होता.
इस्रो आणि डी.आर्.डी.ओ.मध्ये असताना देखील सरांनी अनेक प्रकल्पांना नावारूपास आणले. एस्.एल्.व्ही-3 च्या उभारणीनंतर कलाम सरांनी पी.एस्.एल्.व्ही. ची उभारणी केली. तसेच इस्रोमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करत असताना भारतीय बनावटीच्या रोहिणी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यामध्येदेखील कलाम सरांचे योगदान होते. तसेच डी.आर.डी.ओ.मधील अग्नी आणि पृथ्वी या जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांच्या बांधणीमध्ये देखील कलाम सरांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. यामुळेच तर त्यांना ‘मिसाईल मॅन’ ही उपमा बहाल करण्यात आली.
कलाम सरांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे ‘ऑपरेशन शक्ती’ (पोखरण-2). त्यावेळी कलामसर आणि राजगोपाल चिदंबरम् यांच्या नेतृत्वाखाली शक्ती 1 ते शक्ती 5 अशा एकूण पाच अणुबॉम्बचा अणुस्फोट घडवून आणून भारताने अणुचाचणी यशस्वीरीत्या पार पाडली होती. यावेळी भारतावर काही कारणास्तव अनेक प्रकारचे निर्बंध असल्याकारणाने ‘ऑपरेशन शक्ती’चे कामकाज रात्रीच्या वेळी करावे लागत असे. कलाम सर त्यांच्या सहकार्‍यांसमवेत लष्करी गणवेशामध्ये उंटावरती बसून पेट्रोलिंगला निघालेल्या लष्करी अधिकार्‍यासारखे घटनास्थळी पोचतं, रात्रभर अंधारामध्ये, अमेरिकन उपग्रहांची नजर चुकवत काम करत आणि सकाळी ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण करून परत त्यांच्या बेस कॅम्पवर येत असत, या सर्व घटनेला मूर्तरूप देत असताना कलाम सरांच्या वैज्ञानिक आणि राजकीय कल्पनाशक्तीच्या बळावरचं, हा प्रयोग यशस्वी होऊ शकला. कलाम सर आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या या यशस्वी ऑपरेशन शक्ती नंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील त्यांचे भरभरून कौतुक केले होते. तसेच नंतर भारताच्या भेटीवर आलेल्या प्रत्येक अमेरिकन राष्ट्रपतींनी देखील आवर्जून कलाम सरांना भेटण्याची वेळ मागून घेतली. जगभरातील 40 च्या वर विद्यापिठांनी मानद डॉक्टरेट देऊन कलाम सरांचा पुढील काळामध्ये आदर सत्कार केला. परंतु भारत सरकारतर्फे कलाम सरांना कोणताही उचित पुरस्कार दिला गेला नाही, कारण ‘भारतरत्न’ या पुरस्कारासही आपलासा वाटणारा या प्राध्यापकास हा पुरस्कार 1997 सालीच देण्यात आला होता. त्यामुळे पुढे चालून राजकारणात उतरायची इच्छा नसताना देखील राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवून राष्ट्रपती ‘लोकांचा राष्ट्रपती’ होण्याचा बहुमान कलाम सरांना लाभला.
एक स्वच्छ प्रतिमेचा, राजकारणाची कसलीही जाण नसलेला आणि तरी देखील एक कणखर राष्ट्रपती म्हणून डॉ. कलाम सरांची राष्ट्रपतिपदाची कारकीर्द सर्वश्रुत आहे. राष्ट्रपती भवनात प्रवेश करत असताना मोजक्या वस्तूंनिशी (एक बॅग कपड्यांची आणि इतर दोन ते तीन बॅगा पुस्तकांच्या) प्रवेश करणारा देशाचा सर्वोच्च  प्रमुख प्रसारमाध्यमांसहित देशाने प्रथमच पाहिला असावा. सोनिया गांधींचा विदेशीचा मुद्दा आणि भारत-अमेरिका अणुकरार याबाबत एक राष्ट्रपती म्हणून डॉ. कलाम सरांनी यावेळी महत्त्वाची भूमिका निभावली होती. लोकांमध्ये मिसळून राहणार्‍या राष्ट्रपतींनी तत्कालीन एन्डीए सरकार जाऊन यूपीए सरकार 2004 साली सत्तेत आल्यानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान होऊ नये याखातर भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रपतींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु कुठल्याही दबावाला बळी न पडता, पंतप्रधानपदावर विराजमान होणारी व्यक्ती भारतीयच असायला हवी असा निर्णय देत डॉ. कलाम सरांनी डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी विराजमान केले होते. तसेच यूपीए सरकारशी अतिशय सौहार्दाचे आणि विनयपूर्वक संबंध असलेल्या राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी त्यावेळी ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ हे बिल संसदेच्या पुनर्विचारार्थ पाठवले होते. राष्ट्रपतींनी कॅबिनेटच्या मर्जीविना असा निर्णय घेतल्याचे कारण पुढे करून सरकारने त्यावेळी राष्ट्रपतींच्या वागणुकीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु अगदी राजकारणाची जाण नसली तरी एक उत्तम आणि कार्यशील राष्ट्रपती म्हणून काम करणार्‍या कलाम सरांनी ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट बिल’ संसदेस पुनर्विचारार्थ पाठवण्याचा आपला निर्णय कायम ठेवला होता. कलाम सरांच्या अशा या सरळ आणि निर्भीड वागणुकीमुळे राजकीय नेतृत्वाला देखील ते हवेहवेसे वाटत होते. राष्ट्रपतिपदावर असतानाच भविष्यातील भारताचे सध्याच्या युवापिढीला कलाम सरांनी स्वप्न दाखवण्यास सुरुवात केली होती. याखातर युवकांनी डोळ्यासमोर एक व्हिजन ठेवून काम करावे असे सतत कलाम सर सांगत असत. त्यामुळेच भविष्यात भारत नक्की महासत्ता होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भारताला ‘व्हिजन 2020’ चे स्वप्न दाखवले होेते. राष्ट्रपती भवनामधून, (25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007) आपली कारकीर्द पूर्ण केल्यानंतर बाहेर पडतेवेळी केवळ आपल्यासोबत एक कपड्याची बॅग आणि इतर तीन पुस्तकांच्या मोठ्या बॅगा बाहेर घेऊन पडणार्‍या या प्राध्यापक राष्ट्रपतीस खराच मनापासून सलाम...!
आयुष्यात जगत असताना डोळ्यासमोर एक ध्येय ठेवून ते पूर्ण करण्यासाठी अविरत झगडत राहिल्यास आयुष्य सार्थकी लागते, असे मरेपर्यंत सांंगत राहणार्‍या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (अवुल पाकिर जैनुलाब्द्दीन अब्दुल कलाम ) सरांना वैमानिक व्हायचे होते, परंतु त्याही पेक्षा मोठे स्वप्न उराशी बाळगून ज्ञानसागराचा ध्यास घेतलेल्या या प्राध्यापकाने आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत अनेक कलाम (आदरभाव आहे) घडवले. आधुनिक काळातील या विज्ञानऋषीस विद्यार्थ्यांशी संवाद साधन असतानाच आयुष्याचा शेवट करवून घ्यावासा वाटला हा एक योगायोगच म्हणावा लागेल. अग्निपंखात देशाच्या ‘मिसाइल मॅन’ला आदरपूर्वक, भावपूर्ण श्रद्धांजली...!

आणि भारतातील युवापिढीकडून कलाम सरांना अखेरचा सलाम...!