Saturday, October 31, 2015

प्रसारमाध्यमांनो सावध व्हा!

देशात सध्याच्या स्थितीत वाढत चाललेला धार्मिक आणि राजकीय वाद नकळतपणे प्रसारमाध्यमांकडून वाढविला जात आहे, अथवा अशा प्रकारांना माध्यमे खतपाणी घालत आहेत, असे वाटते. माध्यमसमूह प्रतिस्पर्ध्यांवरती कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात पत्रकारिता धर्म विसरून संविधानाने घालून दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करत असल्याच्या घटना मागील काही दिवसांत आढळत आहेत. त्यामुळे या प्रसारमाध्यमी टीआर्पीवाल्या मान्यवरांना वेळीच शहाणपण जर सुचले नाही, तर देशातील अस्थिरता वाढण्यास आणि अराजकता  माजण्यास वेळ लागणार नाही.


            They hanged Yakub, छोटा राजनची घरवापसी, दलितांवर अत्याचार, पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन किंवा साहित्यिकांनी परत केलेल्या पुरस्कारांचा बडेजाव अशा एक ना अनेक मथळ्यांखाली आजकालचे माध्यमे (प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया) डोकी केवळ आणि केवळ टीआर्पी वाढविण्यासाठी सर्वत्र आगपाखड करत आहेत. प्रसारमाध्यमांमधील बातम्या प्रथम दाखविण्याच्या स्पर्धेमध्ये एकप्रकारे ते किती खालच्या थराला जाऊन वार्तांकन करतात याचे भान देखील त्यांना राहत नाही. तसे पाहता स्वत:ला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयांचे गाढे अभ्यासक म्हणवून घेणारी तज्ज्ञमंडळी देखील वृत्तपत्रांमधून स्वत:चे लेखन प्रकाशित करत असताना समाजामध्ये त्या लिखाणामुळे होणारा वाईट  परिणाम आणि वाढणारी तेढ याचा तिळमात्र विचार करत नाहीत, असे आजचे चित्र आहे.
            सध्या देशामध्ये एक नवीन प्रकारचे शीतयुद्ध जुन्या पद्धतीने उभारून त्याला खतपाणी घालण्याचे काम हे प्रसारमाध्यमी टोळ करत आहेत. पंतप्रधान पदावर कोणती व्यक्ती विराजमान आहे, हा प्रत्येक व्यक्तीच्या विचारदृष्टीने त्या व्यक्तीसंबंधीचा विचार असतो. आता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी देशाचा गाडा हाकत असतील तर त्या व्यक्तीचा नाहीतर त्या पदाचा मान या मंडळींनी राखायला हवा. जगातील इतर राष्ट्रांचा उल्लेख करायचा झाल्यास, समजा एखाद्या मुस्लिम राष्ट्रामध्ये त्यांचा राष्ट्रप्रमुख उघडउघड जातीधर्मविषयक वाच्यता करत असेल तर तो सन्मान समजला जातो, परंतु आपल्या देशामध्ये सध्या ही भावना पसरविण्याचा प्रकार सुरू आहे, ज्या प्रसारमाध्यमांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकांवेळी मोदींना पंतप्रधानपदी विराजमान करण्यात मोलाचा वाटा उचलला होता (अर्थात काँग्रेसला हरविण्यासाठी), त्याच प्रसारमाध्यमांनी आजकाल प्रतिगामी विरुद्ध पुरोगामित्व असा एक नवा वाद देशात आरंभला आहे! का तर, केवळ यांचा टीआर्पीचा धंदा चालतो आणि यांच्या या वृत्तपत्र समूहास काही राजकीय पक्षांचे आर्थिक पाठबळ देखील असतेच. भविष्यात धार्मिक तेढ  निर्माण करून मतपेट्यांचे राजकारण करू पाहणाऱ्या या राजकीय पुढाऱ्यांच्या निर्लज्जतेची खरंच यामुळे कीव करावीशी वाटते, आणि लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणवले जाणारे हे प्रसारमाध्यमी टोळ त्यास बळी पडतात, यामुळे खंत देखील वाटते. देशाम ध्ये सध्या एकूणच जे काही अपघाती राजकारण सुरू आहे, त्यामुळे जातीधर्मांच्या बेड्यांमध्ये अडकलेला आपला देश यामध्ये आणखी खोलवर रुतत चालला आहे, याला केवळ आणि केवळ हे टीआर्पीवाले बाजारभाट कारणीभूत आहेत.
            देशामध्ये काही घटना घडली की त्याला राजकीय हितासाठी धार्मिक तेढ कशी निर्माण होईल याकडे ही मंडळी आवर्जुन लक्ष देतात की काय, असेच यांच्या लिखाणावरून वाटत असते. गृहराज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी हरियाणातील एका कुटुंबात भाऊबंदकीच्या वादातून झालेल्या जळितकांडावर भाष्य केले, त्या वाक्याचा माध्यमांनी विपर्यास केला. स्थानिक पातळीवर घडलेल्या त्या घटनेस दलित विरुद्ध सवर्ण असा रंग देण्यात आला. तर दुसरीकडे पान्चजन्य या साप्ताहिकात तुफेल चतुर्वेदी यांनी त्यांच्या लेखात लिहिलेल्या एका वाक्यावरून रान उठवत जणू काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच दादरी प्रकरणाचे समर्थन करण्यासाठी चतुर्वेदी यांना लेख लिहिण्यास भाग पाडले होते, असे चित्र निर्माण करण्यात आले, मग काय यांना टीका करायला आणि दूरदर्शनवरून तासन्तास गप्पा मारायला नवा विषय, अन् टीका टिप्पणींनी धार्मिक तेढ निर्माण करण्यास मोकळेपणा मिळाल्यागत चाललेली उठाठेव पाहून माध्यमी टोळांनावेळीच शहाणे व्हा!’ असं म्हणावेसे वाटते. तुफेल चतुर्वेदी यांनी वेदांमध्ये गोहत्या करणाऱ्या व्यक्तीस देहदंडाची शिक्षा देण्यात यायची असे त्यांच्याइस उत्पात के उस पारया हिंदीमध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे, तर मग ते यावरून दादरी प्रकरणाचं समर्थन करतात असे, हे टीआर्पीवाले म्हणूच कसं शकतात? यावरून देशातील पारदर्शक पत्रकारिता केवळ बाजार बनून राहिली आहे, असे दिसते. संविधानाप्रती आणि सर्वोच्च न्यायालयाप्रती यांना काही विश्वास अथवा जिज्ञासाच राहिलेली नाही, केवळ स्वत:ची पाकिटे भरण्याकरिता हे उद्योग करीत असल्यागत वाटते. देशामध्ये चाललेल्या राजकीय, आर्थिक तसेच सामाजिक हालचालींना ज्या प्रकारे सर्वांसमोर ठेवले जावे त्याप्रकारे ठेवता, अप्पलपोटेपणे वागणारे हे प्रसारमाध्यमी मान्यवर पत्रकारिता धर्मास तिलांजली देत आहेत. पत्रकारितेतून देशाच्या हितासाठी आणि सरकार जेथे चुकते त्या ठिकाणी त्यांना जागे करणे हे काम माध्यमांनी करायला हवे. परंतु असे होता हे मान्यवर संवैधानिक पदांची प्रतिष्ठा राखता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केवळ द्वेषभाव पसरवत जातात.

            नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून खरंच देश बदलला आहे का? धार्मिक तेढ वाढविण्यास सरकार जबाबदार आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदूत्व आणि हिंदू राष्ट्रवाद ही संकल्पना हा विचार डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रहितासाठी आजवर केलेल्या सर्व निर्णायक कामांना नजरेआड करत, केवळ नरेंद्र मोदी आणि संघ यांना धारेवर धरणे कितपत योग्य आहे? एम्आय्एम् पक्षाचे अकबरुद्दीन आवैसी ज्या द्वेष भावनेने मुस्लिम तरुणांना चिथावणीखोर भाषेत बोलत असतात, त्याबाबत खरी परिस्थिती दाखविण्याचे काम हे माध्यमी टोळ का करत नाहीत? एखाद्या ठिकाणी बलात्काराची घटना घडली, तर दलित मुलीवर बलात्कार अथवा  मुस्लिमांवर अत्याचार, या बातमीमध्ये जातीचा उल्लेख करण्याची काय आवश्यकता आहे? त्यातल्या त्यात नवीन म्हणजे महाराष्ट्राचा उल्लेख करायचा झाल्यास मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक वादास हे माध्यमी टोळ का खतपाणी घालतात? बिहार निवडणूकांचे वार्तांकन करत असताना दलित, महादलित, मुस्लिम मतदारांच्या संख्येचा उल्लेख का केला जातो? यावरून हे माध्यमी टोळ संविधानाच्या नियमांची नकळत पायमल्ली करून जातात, हे त्यांना समजते की नाही यावर विचार व्हायला हवा आणि या अशा माध्यमांच्या वाचकांनी देखील प्रत्येक घटनेतील सत्यता याची देही अथवा याची डोळा पाहिल्याशिवाय अथवा ऐकल्याशिवाय त्यावरती विश्वास ठेवू नये अन्यथा देश राजकीय आणि धार्मिक अस्थिरतेकडे ज्याप्रकारे झुकत चालला आहे, हे पाहता पुढील काळात देशातील धार्मिक तेढ वाढण्यास झालेली सुरुवात थांबणार नाही.

            शेवटी एकच म्हणावेसे वाटते, की या  प्रसारमाध्यमी विश्लेषकांनी प्रक्षोभक भाषा, धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करता संवैधानिक घटनांचा आदर राखत वेळीच शहाणे व्हायला हवे अन्यथा अराजकतेच्या खाईत ढकलण्याचे पातक या टीआर्पीवाल्या टोळ्यांच्या माथी लागल्याशिवाय राहणार नाही.

Monday, October 5, 2015

एका युगाचा अंत

३१ ऑक्टोबर हा इंदिरा गांधींचा स्मृतिदिन. ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांच्या निधनास ३१ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने...
भारताच्या पंतप्रधान, नेहरू कन्या, गूंगी गुडिया, एक जबरदस्त नेतृत्व असे काही शब्द कानावर पडले की आपणास आठवण होते ती श्रीमती इंदिरा गांधी यांची आणि ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी झालेल्या त्यांच्या हत्याकांडाची ; तसेच त्यानंतर सर्वत्र उसळलेल्या शीख विरोधी दंगलींची.

इंदिरा गांधी : एक प्रभावी नेतृत्व
            इंदिराजींचा जन्म १९  नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. नेहरूकन्या असल्याकारणाने त्या लहानपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत्या. नेहरूंच्या मृत्यूनंतर न खचता त्यांनी स्वत:चा राजकीय प्रवास सुरूच ठेवला आणि देशहिताचे अनेक निर्णय अंमलात आणले.
- १९५५  मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या.
- १९६४  साली प्रथमत: केंद्रीय मंत्रीमंडळात निवड.
- तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणीमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
- लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर २४  जानेवारी १९६६  रोजी प्रधानमंत्रिपदी विराजमान.
- १९६९  मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण असो वा पोखरण येथे पहिली अणुचाचणी असो, अशा अनेक घटनांमुळे त्या नेहमी चर्चेत असत.
- १९७७  साली देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला.

ऑपरेशनब्लू स्टारआणि इंदिरा गांधी:
            इंदिराजींनी १९७५ साली देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता, त्यामुळे त्या १९८०  पर्यंत सत्तेपासून दूर होत्या. मात्र १९८०  नंतर झालेल्या निवडणुकांत मतदारांनी त्यांच्यावर परत एकदा विश्वास दाखवला. पण त्यांना यावेळी पंजाबमध्ये सुरू असलेल्या फुटीरतावादी आणि उग्र खलिस्तानवादी शक्तींशी सामना करावा लागला, त्याचवेळी इंदिराजींनीऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला.

पंजाबमधील राजकीय घडामोडींना आलेला वेग :  
इ. स. १९८२ च्या ऑगस्ट महिन्यात अकाली दलाने धर्मयुद्ध मोर्चाची स्थापना केली. अन् दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडियन एअरलाईन्सचे विमान अपहरण करून लाहोरला नेले. पाकिस्तानने विमान उतरवण्यास परवानगी नाकारली म्हणून पुन्हा अमृतसरला पाठवले. तेव्हा अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली.
- २३ एप्रिल १९८३ ला पंजाब पोलिसचे डीआय्जी अवतार सिंह अटवाल हे सुवर्ण मंदिर परिसरात दर्शनासाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली.
- जून  ते  ऑगस्ट  १९८३  दरम्यान अकाली दलातर्फे मोठ्या प्रमाणात बंद आणि रेल रोको पुकारण्यात आला.
- दहशतवाद्यांनी डिसेंबर १९८३  मध्ये सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त येथे आश्रय घेतला.
- फेब्रुवारी १९८४ ला प्रीतलारी मासिकाचे संपादक आणि वरिष्ठ पत्रकार सुमित सिंह शाम्मी यांची हत्या करण्यात आली.
- एप्रिल १९८४ ला अमृतसरमध्ये भारतीय जनता दलाचे प्रमुख हरबन्सलाल खन्ना यांची हत्या झाली.
- याच दरम्यान अकाली दल व केंद्र सरकार यांच्यामध्ये चाललेल्या वाटाघाटी विफल झाल्याने अकाली दलाच्या नेत्यांमधील असंतोष विकोपाला गेला.
- शेवटी इंदिराजी पंतप्रधान असल्याकारणाने केंद्र सरकारने ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय घेतला.

ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई आणि इंदिराजी :
            ३ जून १९८४ पासून भारतीय सेनेने सुवर्ण मंदिर परिसरात कारवाई सुरू केली होती. मंदिर परिसरातील इतर इमारतींचा ताबा घेऊन त्यावर मशीनगन्स बसवल्या गेल्या. ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व तत्कालीन मेजर जनरल कुलदीप सिंह ब्रार हे करत होते.
मुख्यत: जर्नेल सिंह आणि त्यांचे साथीदार अकाल तख्त या अतिशय महत्त्वाच्या भागात लपून बसलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. जर्नेल सिंहाचे सशस्त्र समर्थक व इतर दहशतवादी दलांचे नेतृत्व तिथे शाबेग सिंह हे करत होते. (शाबेग सिंह हे पूर्वी भारतीय सैन्यात मेजर जनरल पदावर होते, १९७१ च्या भारत पाक युद्धात त्यांनी बांग्लादेशमधील मुक्तिवाहिनीच्या सभासद सदस्यांना प्रशिक्षित केलेले होते.)
            इंदिराजींच्या आदेशानुसारऑपरेशन ब्लू स्टारआखून भारतीय सैन्याने सुवर्णमंदिरामध्ये घुसून जर्नेल सिंह यांची हत्या केली खरी, परंतु याचे खरे परिणाम भोगावे लागले ते पुढे इंदिराजींना आणि इंदिराजींच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशाला. त्यावेळी भारत सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या ऑपरेशनमध्ये भारतीय सेनेचे ८३  जण मारले गेले. यामध्ये  मुख्य अधिकारी आणि  कनिष्ठ अधिकारी व ७५  जवान यांचा समावेश होता. सुमारे २००  जण जखमी झाले. तर ४००  पेक्षा जास्त दहशतवादी या कारवाईमध्ये मारले गेले.

ब्लू स्टारकारवाईचे परिणाम :
            कारवाई जरी पार पडली तरी देखील खलिस्तानवादी चळवळ लगोलग थंड झाली नाही. इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिरामध्ये घडवून आणलेल्या कारवाईमुळे शीख समुदायामध्ये तीव्र रोष निर्माण झाला. त्यामुळे भारतीय सैन्यामध्ये असलेल्या काही शीख सैनिकांनी देखील बंडाचा पवित्रा घेतला. त्याचाच परिणाम म्हणून इंदिराजींच्या रूपाने या भारतभूमीला एक सच्चा राजकारणी नेता आणि भारतरत्न गमवावा लागला.
इंदिराजींची ३१  ऑक्टोबर १९८४  रोजी सकाळी त्यांच्या अंगरक्षकांकडूनच हत्या करण्यात आली.

इंदिराजींची हत्या :
            ३१  ऑक्टोबरच्या सकाळी इंदिराजी त्यांच्या राहत्या घरामधून कामानिमित्ताने बाहेर पडल्या. त्या त्यांच्या घरासमोरील बगीचामधून बाहेर उभ्या असलेल्या कारपर्यंत जात असताना त्यांचे अंगरक्षक असलेल्या दोन इसमांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. सतवंत सिंह आणि बेअंत सिंह अशी नावे असलेल्या शीख समुदायातील या दोन तरुण अंगरक्षकांनी अक्षरश: गोळ्यांचा वर्षाव केला. एकामागून एक गोळी लागत गेली व शेवटी इंदिराजी जागीच धारातीर्थी पडल्या.
            सतवंत सिंहने त्याच्या हातांमध्ये असलेल्या स्टेनमगनमधून ३०  राऊंड फायर करून इंदिराजींवर गोळ्या झाडल्या. इंदिराजींच्या जागीच पडलेल्या त्या मृतदेहाकडे पाहत ते दोघेही तिथेच थांबले अन् बेअंत सिंह म्हणाला, ‘‘मला जे करायचे होते ते माझे करून झाले आहे, आता तुम्हाला काय करायचंय ते करा’’ (
 I have done what I had to do. You do what you want to do)
            इंदिराजी यांची हत्या झाली यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. सलमा सुलतान यांनी इंदिराजींची हत्या झाल्याचे दूरदर्शनवरून जनतेला सांगितले. इंदिराजीनंतर कोण असा प्रश्न त्यानंतर जनतेपुढे पडला त्यावेळी राजीव गांधी यांचे नेतृत्व समोर आले.

हत्येनंतर उद्भवलेली परिस्थिती :

            इंदिराजींच्या हत्येनंतर देशातील आणि विशेषत: दिल्ली स्थित शीख समुदायातील व्यक्तींच्या कत्तली करण्यात आल्या. देशात दंगल उसळली. राजीव गांधी पंतप्रधान झाले. परंतु देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होती एक शीख व्यक्ती. ग्यानी झैलसिंह हे देशाचे राष्ट्रपती होते.

Friday, October 2, 2015

उत्सवी उन्माद

प्रति,
गणपती बाप्पा,
            बाप्पा! तुझ्या उत्सवकाळात सर्वांना केवळ धमाल, खूप मज्जा आणि मज्जाच मज्जा या पलिकडे दुसरे काही सुचत नाही. 10 दिवसांच्या तुझ्या वास्तव्यकाळात अनेक मंडळकारी उद्योगींना आयतेच उद्योग मिळतात. ते तुझ्या श्रद्धेपोटी हे सर्व करतायत की स्वतःच्या जीवाची ऐश करवून घेण्यासाठी हेही तेच ठरवत असतात. कर्णकर्कश आवाजी डी.जे. आणि यांचा नाच त्याला कुठे कुठे तळीरामांची साथ, बस्स म्हणजे या उद्योगींच्या भक्तीभावाने त्यावेळी अगदी स्वर्गच जवळ केलेला असतो. आमचं मंडळ मोठ की तुमचं मंडळ मोठं आणि कोणाचा डी.जे. जोराचा आवाज करतो. या स्पर्धेमध्ये बाप्पा तुझ्याकडे दुर्लक्ष करणारे हे मंडळ तुला देखील छोट्या छोट्या तुकड्यांध्ये वाटून घेतात.

..वि.वि.
बाप्पा, पत्रास कारण की,
            तुझे तिकडे सारे काही क्षेम असावे अशी आशा करतो, कारण इकडे काहीच क्षेमकुशल नाही. पुण्यातील गणेशोत्सवाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशभर नव्हे तर जगभर गणोशोत्सवांची सुरुवात करण्यात आली होती. बाप्पा! टिळक महाराजांनी जो उद्देश आपल्या डोळ्यांसमोर ठेवून तुला देवळामधून बाहेर काढून रस्त्यांवरती सर्वत्र सार्वजनिक स्वरुपात विराजमान केलं, त्या उद्देशांना आज मूठ माती देत हे उद्योगी मंडळ केवळ भंपकपणा आणि उधळपट्टी करत, या उत्सवाचा उन्मादी नाद सादर करत आहेत. बाप्पा तुझे कान आणि शरीर ठीक असावे, ही तुझ्याच चरणी सदिच्छा, कारण तुझ्या विसर्जनावेळची स्थिती पाहता, तो DJ तो नाच अन ते सर्व काही श्रद्धे पलीकडचे असते. महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे वातावरण आहे, म्हणून काही मंडळे तुझे विसर्जन कृत्रिम हौदामध्ये केले, तर काहींनी अक्षरशः पुण्यातील मुठा नदीपात्रात तुझ्या मूर्तींना नदी पात्रातील शुद्ध पाण्याने शाहीस्नान करविले. नुसताच ढीग साचला होता नदीपात्रात, आणि वरतून इतर मूर्ती विसर्जित करत असताना मूर्ती नदीमध्ये फेकून देण्याचे कामही काही लोक करत होते. बहुधा
बाप्पा तुझ्या अंगाला यावेळी खरचटले देखील असणार!

बाप्पा! पत्रास कारण की,
            स्वच्छ भारताच्या केवळ वल्गना करणार्या आणि रस्ता स्वच्छ करताना किंवा ह्या तशाप्रकारे सेल्फीशीगिरी (सेल्फी काढणार्या) तुझ्या भक्तांनी तुझ्या मूर्तींना गटारातील पाण्याचा रस्ता दाखवला. तसेच पुण्यातील चौकाचौकात कचर्याचे ढिग साचवून रस्त्या-रस्त्यावर कचरा जमवून, चांगलाच गणेशोत्सव साजरा केला. जे पुण्यात झाले तेच मुंबई आणि इतर ठिकाणीही होते. बाप्पा मुंबईचा समुद्रकिनारा कचर्याच्या ढिगांनी खचून भरला होता. यामूधन असा प्रश्न पडतो की, टिळक महाराजांनी जी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली होती, त्या उद्दिष्टांची पूर्तता यावेळी कितपत पूर्ण केली जात आहे. विविध उद्योगीमंडळांकडून जगभरातील स्वतः केलेल्या चुकांचे परिणाम दाखवणारे देखावे, मनुष्याच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करणारे देखावे दाखवले जातात. परंतु होणार्या प्रबोधनातून स्पष्ट होणार्या चिंतेप्रति हे लोक कितपत सजग असतात?

बाप्पा पत्रास कारण की,
            मानाच्या गणपतींच्या मिरवणूकीदरम्यान, बाप्पा- पुण्यातील गल्ली बोळांत तुफान गर्दी असते, पुण्यातील लक्ष्मी रोड ते अलका टॉकिजजवळचा टिळक चौक या परिसरात तर 2 दिवस मिरवणूक चालते म्हणे. बाप्पा! तिथे काही तळीराम तर दिवसभर उच्छाद मांडतात. या सर्व गोष्टी तू मात्र शांतपणे पाहतोस. रस्त्यांवरील चेंगराचेंगरीत लहान मुले, अबालवृद्ध आणि स्त्रियांचे हाल होतात, त्यात उन्हाचा कडाका
सुरू असताना मिरवणुकांधून दुष्काळ आणि तत्समसंबंधी देखावे दाखवले जातात. बाप्पा! तू आगमानावेळी थोडासा पाऊस घेऊन आलास, तसाच जातेवेळीदेखील पाऊस देऊन गेला असतास तर बरे झाले असते.

बाप्पा पत्रास कारण की,
            तुझ्या विसर्जनाच्या दुसरे दिवशी पुण्यातील (विसर्जनाची मिरवणूक तब्बल 28 तास चालली) सकाळी पुण्यातील डेक्कन परिसरात माळवाडीकडून येणारी एक रुग्णवाहिका गरवारे महाविद्यालयाजवळ तब्बल पाऊणतास ताटकळत थांबली होती, कारण पुढे तुझी भली मोठी मिरवणूक सुरू होतीतळीरामांची सकाळी सकाळी डेक्कन कॉर्नरला जत्रा भरली होती. तर एका वृद्ध आजोबांना त्यांच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी रिक्षा देखील मिळत नव्हती.
बाप्पा! तुझ्या या मिरवणुकांची खरच गरज आहे का? आणि त्यादिवशी जे पुण्यात झाले ते दृश्य देशात इतर ठिकाणीही झाल्याचे ऐकिवात आहे. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनास व्ही. आय्. पी. रांगेतून जाण्यार्या एका युवतीस तेथील स्थानिक पोलिसांनी भयानक चोप दिल्याचा प्रकार समोर आला. बाप्पा म्हणजे आता तुझे दर्शन घेणे देखील घातक ठरू शकते का?

बाप्पा पत्रास कारण की,
            मी तुझ्या विसर्जन मिरवणुकीवेळी पुणे परिसरातील मूर्ती विसर्जनातील उत्सवी उन्मादाची विदारकता पाहिली. नशेमध्ये धुंद असलेल्या तुझ्या नामधारी भक्तांकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण न होता वेगळीच दृश्ये येथे पहावयास मिळाली, खरं तर लाज वाटली आणि तुझी माफीदेखील मागाविशी वाटली. तुझ्या या उन्मादी उत्सवकाळात आणखी धोका वाढू शकतो, त्यामुळे पुढच्या वर्षी यायचे की नाही याचा तू विचार कर आणि तुझ्या या काही उन्मादी/उद्योगी मंडळांनी तुझ्या उत्सव काळात पर्यावरणाचे रक्षण करून उत्सव साजरा करण्याची शपथ घेतली तरचं तू ये, नाही तर टिळक महाराजांनी ज्या उद्देशाने ही सार्वजनिक उत्सवाची पद्धत रूढ
केली होती, ती सध्या वाहवत जाताना दिसतेच आहे.
तरी, बाप्पा तुझ्या या उन्मादी भक्तांना माफ कर आणि पुढील वर्षीच्या उत्सवात त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत त्यांना मार्गदर्शन कर.

कळावे.

तुझाच एक भक्त.