Monday, October 5, 2015

एका युगाचा अंत

३१ ऑक्टोबर हा इंदिरा गांधींचा स्मृतिदिन. ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांच्या निधनास ३१ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने...
भारताच्या पंतप्रधान, नेहरू कन्या, गूंगी गुडिया, एक जबरदस्त नेतृत्व असे काही शब्द कानावर पडले की आपणास आठवण होते ती श्रीमती इंदिरा गांधी यांची आणि ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी झालेल्या त्यांच्या हत्याकांडाची ; तसेच त्यानंतर सर्वत्र उसळलेल्या शीख विरोधी दंगलींची.

इंदिरा गांधी : एक प्रभावी नेतृत्व
            इंदिराजींचा जन्म १९  नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. नेहरूकन्या असल्याकारणाने त्या लहानपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत्या. नेहरूंच्या मृत्यूनंतर न खचता त्यांनी स्वत:चा राजकीय प्रवास सुरूच ठेवला आणि देशहिताचे अनेक निर्णय अंमलात आणले.
- १९५५  मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या.
- १९६४  साली प्रथमत: केंद्रीय मंत्रीमंडळात निवड.
- तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणीमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
- लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर २४  जानेवारी १९६६  रोजी प्रधानमंत्रिपदी विराजमान.
- १९६९  मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण असो वा पोखरण येथे पहिली अणुचाचणी असो, अशा अनेक घटनांमुळे त्या नेहमी चर्चेत असत.
- १९७७  साली देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला.

ऑपरेशनब्लू स्टारआणि इंदिरा गांधी:
            इंदिराजींनी १९७५ साली देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता, त्यामुळे त्या १९८०  पर्यंत सत्तेपासून दूर होत्या. मात्र १९८०  नंतर झालेल्या निवडणुकांत मतदारांनी त्यांच्यावर परत एकदा विश्वास दाखवला. पण त्यांना यावेळी पंजाबमध्ये सुरू असलेल्या फुटीरतावादी आणि उग्र खलिस्तानवादी शक्तींशी सामना करावा लागला, त्याचवेळी इंदिराजींनीऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला.

पंजाबमधील राजकीय घडामोडींना आलेला वेग :  
इ. स. १९८२ च्या ऑगस्ट महिन्यात अकाली दलाने धर्मयुद्ध मोर्चाची स्थापना केली. अन् दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडियन एअरलाईन्सचे विमान अपहरण करून लाहोरला नेले. पाकिस्तानने विमान उतरवण्यास परवानगी नाकारली म्हणून पुन्हा अमृतसरला पाठवले. तेव्हा अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली.
- २३ एप्रिल १९८३ ला पंजाब पोलिसचे डीआय्जी अवतार सिंह अटवाल हे सुवर्ण मंदिर परिसरात दर्शनासाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली.
- जून  ते  ऑगस्ट  १९८३  दरम्यान अकाली दलातर्फे मोठ्या प्रमाणात बंद आणि रेल रोको पुकारण्यात आला.
- दहशतवाद्यांनी डिसेंबर १९८३  मध्ये सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त येथे आश्रय घेतला.
- फेब्रुवारी १९८४ ला प्रीतलारी मासिकाचे संपादक आणि वरिष्ठ पत्रकार सुमित सिंह शाम्मी यांची हत्या करण्यात आली.
- एप्रिल १९८४ ला अमृतसरमध्ये भारतीय जनता दलाचे प्रमुख हरबन्सलाल खन्ना यांची हत्या झाली.
- याच दरम्यान अकाली दल व केंद्र सरकार यांच्यामध्ये चाललेल्या वाटाघाटी विफल झाल्याने अकाली दलाच्या नेत्यांमधील असंतोष विकोपाला गेला.
- शेवटी इंदिराजी पंतप्रधान असल्याकारणाने केंद्र सरकारने ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय घेतला.

ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई आणि इंदिराजी :
            ३ जून १९८४ पासून भारतीय सेनेने सुवर्ण मंदिर परिसरात कारवाई सुरू केली होती. मंदिर परिसरातील इतर इमारतींचा ताबा घेऊन त्यावर मशीनगन्स बसवल्या गेल्या. ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व तत्कालीन मेजर जनरल कुलदीप सिंह ब्रार हे करत होते.
मुख्यत: जर्नेल सिंह आणि त्यांचे साथीदार अकाल तख्त या अतिशय महत्त्वाच्या भागात लपून बसलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. जर्नेल सिंहाचे सशस्त्र समर्थक व इतर दहशतवादी दलांचे नेतृत्व तिथे शाबेग सिंह हे करत होते. (शाबेग सिंह हे पूर्वी भारतीय सैन्यात मेजर जनरल पदावर होते, १९७१ च्या भारत पाक युद्धात त्यांनी बांग्लादेशमधील मुक्तिवाहिनीच्या सभासद सदस्यांना प्रशिक्षित केलेले होते.)
            इंदिराजींच्या आदेशानुसारऑपरेशन ब्लू स्टारआखून भारतीय सैन्याने सुवर्णमंदिरामध्ये घुसून जर्नेल सिंह यांची हत्या केली खरी, परंतु याचे खरे परिणाम भोगावे लागले ते पुढे इंदिराजींना आणि इंदिराजींच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशाला. त्यावेळी भारत सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या ऑपरेशनमध्ये भारतीय सेनेचे ८३  जण मारले गेले. यामध्ये  मुख्य अधिकारी आणि  कनिष्ठ अधिकारी व ७५  जवान यांचा समावेश होता. सुमारे २००  जण जखमी झाले. तर ४००  पेक्षा जास्त दहशतवादी या कारवाईमध्ये मारले गेले.

ब्लू स्टारकारवाईचे परिणाम :
            कारवाई जरी पार पडली तरी देखील खलिस्तानवादी चळवळ लगोलग थंड झाली नाही. इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिरामध्ये घडवून आणलेल्या कारवाईमुळे शीख समुदायामध्ये तीव्र रोष निर्माण झाला. त्यामुळे भारतीय सैन्यामध्ये असलेल्या काही शीख सैनिकांनी देखील बंडाचा पवित्रा घेतला. त्याचाच परिणाम म्हणून इंदिराजींच्या रूपाने या भारतभूमीला एक सच्चा राजकारणी नेता आणि भारतरत्न गमवावा लागला.
इंदिराजींची ३१  ऑक्टोबर १९८४  रोजी सकाळी त्यांच्या अंगरक्षकांकडूनच हत्या करण्यात आली.

इंदिराजींची हत्या :
            ३१  ऑक्टोबरच्या सकाळी इंदिराजी त्यांच्या राहत्या घरामधून कामानिमित्ताने बाहेर पडल्या. त्या त्यांच्या घरासमोरील बगीचामधून बाहेर उभ्या असलेल्या कारपर्यंत जात असताना त्यांचे अंगरक्षक असलेल्या दोन इसमांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. सतवंत सिंह आणि बेअंत सिंह अशी नावे असलेल्या शीख समुदायातील या दोन तरुण अंगरक्षकांनी अक्षरश: गोळ्यांचा वर्षाव केला. एकामागून एक गोळी लागत गेली व शेवटी इंदिराजी जागीच धारातीर्थी पडल्या.
            सतवंत सिंहने त्याच्या हातांमध्ये असलेल्या स्टेनमगनमधून ३०  राऊंड फायर करून इंदिराजींवर गोळ्या झाडल्या. इंदिराजींच्या जागीच पडलेल्या त्या मृतदेहाकडे पाहत ते दोघेही तिथेच थांबले अन् बेअंत सिंह म्हणाला, ‘‘मला जे करायचे होते ते माझे करून झाले आहे, आता तुम्हाला काय करायचंय ते करा’’ (
 I have done what I had to do. You do what you want to do)
            इंदिराजी यांची हत्या झाली यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. सलमा सुलतान यांनी इंदिराजींची हत्या झाल्याचे दूरदर्शनवरून जनतेला सांगितले. इंदिराजीनंतर कोण असा प्रश्न त्यानंतर जनतेपुढे पडला त्यावेळी राजीव गांधी यांचे नेतृत्व समोर आले.

हत्येनंतर उद्भवलेली परिस्थिती :

            इंदिराजींच्या हत्येनंतर देशातील आणि विशेषत: दिल्ली स्थित शीख समुदायातील व्यक्तींच्या कत्तली करण्यात आल्या. देशात दंगल उसळली. राजीव गांधी पंतप्रधान झाले. परंतु देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होती एक शीख व्यक्ती. ग्यानी झैलसिंह हे देशाचे राष्ट्रपती होते.

Friday, October 2, 2015

उत्सवी उन्माद

प्रति,
गणपती बाप्पा,
            बाप्पा! तुझ्या उत्सवकाळात सर्वांना केवळ धमाल, खूप मज्जा आणि मज्जाच मज्जा या पलिकडे दुसरे काही सुचत नाही. 10 दिवसांच्या तुझ्या वास्तव्यकाळात अनेक मंडळकारी उद्योगींना आयतेच उद्योग मिळतात. ते तुझ्या श्रद्धेपोटी हे सर्व करतायत की स्वतःच्या जीवाची ऐश करवून घेण्यासाठी हेही तेच ठरवत असतात. कर्णकर्कश आवाजी डी.जे. आणि यांचा नाच त्याला कुठे कुठे तळीरामांची साथ, बस्स म्हणजे या उद्योगींच्या भक्तीभावाने त्यावेळी अगदी स्वर्गच जवळ केलेला असतो. आमचं मंडळ मोठ की तुमचं मंडळ मोठं आणि कोणाचा डी.जे. जोराचा आवाज करतो. या स्पर्धेमध्ये बाप्पा तुझ्याकडे दुर्लक्ष करणारे हे मंडळ तुला देखील छोट्या छोट्या तुकड्यांध्ये वाटून घेतात.

..वि.वि.
बाप्पा, पत्रास कारण की,
            तुझे तिकडे सारे काही क्षेम असावे अशी आशा करतो, कारण इकडे काहीच क्षेमकुशल नाही. पुण्यातील गणेशोत्सवाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशभर नव्हे तर जगभर गणोशोत्सवांची सुरुवात करण्यात आली होती. बाप्पा! टिळक महाराजांनी जो उद्देश आपल्या डोळ्यांसमोर ठेवून तुला देवळामधून बाहेर काढून रस्त्यांवरती सर्वत्र सार्वजनिक स्वरुपात विराजमान केलं, त्या उद्देशांना आज मूठ माती देत हे उद्योगी मंडळ केवळ भंपकपणा आणि उधळपट्टी करत, या उत्सवाचा उन्मादी नाद सादर करत आहेत. बाप्पा तुझे कान आणि शरीर ठीक असावे, ही तुझ्याच चरणी सदिच्छा, कारण तुझ्या विसर्जनावेळची स्थिती पाहता, तो DJ तो नाच अन ते सर्व काही श्रद्धे पलीकडचे असते. महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे वातावरण आहे, म्हणून काही मंडळे तुझे विसर्जन कृत्रिम हौदामध्ये केले, तर काहींनी अक्षरशः पुण्यातील मुठा नदीपात्रात तुझ्या मूर्तींना नदी पात्रातील शुद्ध पाण्याने शाहीस्नान करविले. नुसताच ढीग साचला होता नदीपात्रात, आणि वरतून इतर मूर्ती विसर्जित करत असताना मूर्ती नदीमध्ये फेकून देण्याचे कामही काही लोक करत होते. बहुधा
बाप्पा तुझ्या अंगाला यावेळी खरचटले देखील असणार!

बाप्पा! पत्रास कारण की,
            स्वच्छ भारताच्या केवळ वल्गना करणार्या आणि रस्ता स्वच्छ करताना किंवा ह्या तशाप्रकारे सेल्फीशीगिरी (सेल्फी काढणार्या) तुझ्या भक्तांनी तुझ्या मूर्तींना गटारातील पाण्याचा रस्ता दाखवला. तसेच पुण्यातील चौकाचौकात कचर्याचे ढिग साचवून रस्त्या-रस्त्यावर कचरा जमवून, चांगलाच गणेशोत्सव साजरा केला. जे पुण्यात झाले तेच मुंबई आणि इतर ठिकाणीही होते. बाप्पा मुंबईचा समुद्रकिनारा कचर्याच्या ढिगांनी खचून भरला होता. यामूधन असा प्रश्न पडतो की, टिळक महाराजांनी जी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली होती, त्या उद्दिष्टांची पूर्तता यावेळी कितपत पूर्ण केली जात आहे. विविध उद्योगीमंडळांकडून जगभरातील स्वतः केलेल्या चुकांचे परिणाम दाखवणारे देखावे, मनुष्याच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करणारे देखावे दाखवले जातात. परंतु होणार्या प्रबोधनातून स्पष्ट होणार्या चिंतेप्रति हे लोक कितपत सजग असतात?

बाप्पा पत्रास कारण की,
            मानाच्या गणपतींच्या मिरवणूकीदरम्यान, बाप्पा- पुण्यातील गल्ली बोळांत तुफान गर्दी असते, पुण्यातील लक्ष्मी रोड ते अलका टॉकिजजवळचा टिळक चौक या परिसरात तर 2 दिवस मिरवणूक चालते म्हणे. बाप्पा! तिथे काही तळीराम तर दिवसभर उच्छाद मांडतात. या सर्व गोष्टी तू मात्र शांतपणे पाहतोस. रस्त्यांवरील चेंगराचेंगरीत लहान मुले, अबालवृद्ध आणि स्त्रियांचे हाल होतात, त्यात उन्हाचा कडाका
सुरू असताना मिरवणुकांधून दुष्काळ आणि तत्समसंबंधी देखावे दाखवले जातात. बाप्पा! तू आगमानावेळी थोडासा पाऊस घेऊन आलास, तसाच जातेवेळीदेखील पाऊस देऊन गेला असतास तर बरे झाले असते.

बाप्पा पत्रास कारण की,
            तुझ्या विसर्जनाच्या दुसरे दिवशी पुण्यातील (विसर्जनाची मिरवणूक तब्बल 28 तास चालली) सकाळी पुण्यातील डेक्कन परिसरात माळवाडीकडून येणारी एक रुग्णवाहिका गरवारे महाविद्यालयाजवळ तब्बल पाऊणतास ताटकळत थांबली होती, कारण पुढे तुझी भली मोठी मिरवणूक सुरू होतीतळीरामांची सकाळी सकाळी डेक्कन कॉर्नरला जत्रा भरली होती. तर एका वृद्ध आजोबांना त्यांच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी रिक्षा देखील मिळत नव्हती.
बाप्पा! तुझ्या या मिरवणुकांची खरच गरज आहे का? आणि त्यादिवशी जे पुण्यात झाले ते दृश्य देशात इतर ठिकाणीही झाल्याचे ऐकिवात आहे. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनास व्ही. आय्. पी. रांगेतून जाण्यार्या एका युवतीस तेथील स्थानिक पोलिसांनी भयानक चोप दिल्याचा प्रकार समोर आला. बाप्पा म्हणजे आता तुझे दर्शन घेणे देखील घातक ठरू शकते का?

बाप्पा पत्रास कारण की,
            मी तुझ्या विसर्जन मिरवणुकीवेळी पुणे परिसरातील मूर्ती विसर्जनातील उत्सवी उन्मादाची विदारकता पाहिली. नशेमध्ये धुंद असलेल्या तुझ्या नामधारी भक्तांकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण न होता वेगळीच दृश्ये येथे पहावयास मिळाली, खरं तर लाज वाटली आणि तुझी माफीदेखील मागाविशी वाटली. तुझ्या या उन्मादी उत्सवकाळात आणखी धोका वाढू शकतो, त्यामुळे पुढच्या वर्षी यायचे की नाही याचा तू विचार कर आणि तुझ्या या काही उन्मादी/उद्योगी मंडळांनी तुझ्या उत्सव काळात पर्यावरणाचे रक्षण करून उत्सव साजरा करण्याची शपथ घेतली तरचं तू ये, नाही तर टिळक महाराजांनी ज्या उद्देशाने ही सार्वजनिक उत्सवाची पद्धत रूढ
केली होती, ती सध्या वाहवत जाताना दिसतेच आहे.
तरी, बाप्पा तुझ्या या उन्मादी भक्तांना माफ कर आणि पुढील वर्षीच्या उत्सवात त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत त्यांना मार्गदर्शन कर.

कळावे.

तुझाच एक भक्त.

Friday, September 25, 2015

शाश्वत विकास परिषद (SDG) २०१५











आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी  विकासाच्या दृष्टीने जगातील सर्व विकसित आणि विकसनशील देशांनी

एकत्र येऊन १९९० च्या दशकात संयुक्त राष्ट्र संघाच्या अध्यक्षतेखाली मानवी हक्क, स्त्रिया आणि लहान मुले यांच्या संगोपनासाठी सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचे सांगून, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषदा घेण्यास सुरुवात केली. त्या आंतरराष्ट्रीय  परिषदांमधून एक मुद्दा समोर आला की मानवाच्या विकासासाठी आपण सर्वांनी स्वतःवर काही बंधने निर्माण करायला हवीत तसेच त्याचे सर्वांनी पालन करायला हवे. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे १००० सरकार बाह्य संस्थांनी पुढाकार घेऊन २००० साली दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरणाचे संरक्षण, मानवी हक्क संरक्षण आणि संवर्धन तसेच असुरक्षित समाजाचे संरक्षण या संदर्भात कच्चा मसुदा तयार केला. या मसुद्यास अनुसरून संयुक्त राष्ट्राच्या २००० साली झालेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स परिषदेने २०१५ पर्यंत साध्य करण्यासाठी स्वतःवर काही उद्दिष्टे लादून घेतली होती. त्यावेळी सदस्य असणाऱ्या १८९ देशांनी आणि २३ आंतरराष्ट्रीय संस्थांनी ठरवल्या- प्रमाणे २००० ते २०१५ या कालावधीमध्ये  उद्दिष्टे साध्य झाली अथवा नाही किंवा या पुढील १५ वर्षांकरताचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात २५-२७ सप्टेंबर २०१५ दरम्यान शाश्वत विकास परिषद (SDG) संपन्न होत आहे. मानवी जीवनाचे भविष्य ठरवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या परिषदेस १९३ सदस्य राष्ट्रांचे सदस्य न्यूयॉर्क येथे उपस्थित आहेत.
            शाश्वत विकास परिषदेची (SDG) औपचारिक परिषद या आधी २०१२ मध्ये ब्राझील मधील रिओ या ठिकाणी पार पडली होती. त्या पहिल्या औपचारिक परिषदेत (रिओ प्लस २०) , जून २०१२  मध्ये रियो दि जानेरो येथे  शाश्वत विकासाचे भविष्यकालीन नियोजन आणि तरतुदी यावर संयुक्त राष्ट्र परिषदेत चर्चा करण्यात आली होती. त्या परिषदेचे पुढील भाग म्हणून होत असलेल्या न्यूयॉर्क मधील शाश्वत विश्व  परिषदेस मानवतेच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. ही परिषद आयोजित करण्याच्या अगोदर संयुक्त राष्ट्र संघाकडून THE FUTURE WE WANT and Transforming our world : the 2030 Agenda for Sustainable Development या नावाने अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये भविष्यातील मानवी विकासाची उद्दिष्टे आणि ध्येय यांचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. या आधी जुलै २०१४ मध्ये, शाश्वत विकासाची उदिष्टे साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ओपन वर्किंग ग्रुप (OWG) विधानसभेचे आयोजन केले गेले होते. ज्यामध्ये गरीबी आणि उपासमार समाप्त करणे, आरोग्य आणि शिक्षण यांमध्ये सुधारणा करणे, शहरे अधिक शाश्वत बनवणेहवामानातील बदलांचा  सामना करणे तसेच समुद्र आणि वन संरक्षण करणे याचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर २०१५ पूर्वीच्या विकासावर वाटाघाटी करण्यास जानेवारी २०१५ मध्ये सुरुवात केली आणि वाटाघाटी ऑगस्ट २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आल्या. एक अंतिम दस्तऐवज तयार करून, न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या  कार्यालयात तो प्रसिद्ध करण्यात आला. ही सर्व पार्श्वभूमी सांगत असताना २५ ते २७  सप्टेंबर दरम्यान होत असलेली परिषद मानव हिताच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे हे आपल्या लक्षात येते.
शाश्वत विकास परिषदेची प्रस्तावित उद्दिष्टे :
          या परिषदेने सदर केलेल्या मसुद्यात एकूण १७ उद्दिष्टे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत, जी पूर्ण करण्यासाठी सर्व सदस्य राष्ट्रांकडून पुढील १५ वर्षांचे नियोजन केले जाणार आहे.
. गरिबी समूळ नष्ट करणे.
. सर्व मानवजातीस अन्न सुरक्षा आणि सुधारित पोषा अन्न देऊन भूकबळी समाप्त करणे आणि शाश्वत शेती विकासाला प्रोत्साहन देणे.
. सर्वांना निरोगी जीवन आणि आनंददायी जीवन जगता यावे याची खात्री करून देणे.
. सर्वांना समान संधी आणि न्याय देणे.
. सर्व राष्ट्रांमध्ये स्त्री-पुरुष समानता साध्य करणे आणि सर्व स्त्रिया आणि मुलींना  शिक्षण देऊन सक्षम बनवणे.
. सर्वांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.
. सर्वांना स्वस्त, स्थायी आणि आधुनिक ऊर्जा उपलब्ध करून देणे.
. सर्वांना योग्य रोजगार उपलब्ध करून देताना, कामाच्या रीतसर मोबदला देणे.
. पायाभूत सुविधा वाढवताना समावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरणास नावीन्यपूर्ण प्रोत्साहन देणे. १०. विकसित आणि विकसनशील देशांमधील विषमता दूर करणे.
११. शहरे आणि मानवी वस्ती सर्व  समावेशक, सुरक्षित आणि संवेदनक्षम बनवणे.
१२. टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या पुनरुत्पादित वस्तूंचा वापर वाढवणे.
१३. हवामानातील बदल आणि त्याचे परिणाम सोडविण्यासाठी त्वरित कारवाई करणे.
१४. शाश्वत विकास साधण्यासाठी सागरी संसाधनांचा अधिकाधिक वापर करणे.
१५. जमिनीची धूप आणि जैवविविधतेचे नुकसान थांबवण्याकरिता ओसाड  जमिनीचे व्यवस्थापन करणे. १६. आंतरराष्ट्रीय स्तरांवर प्रभावी जबाबदार आणि समावेशक संस्था तयार करून शाश्वत विकासासाठी शांततापूर्ण  मार्गाने प्रयत्न करणे.

१७आंतरराष्ट्रीय स्तरावर शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारीची अंमलबजावणी म्हणजे मजबूत आणि सर्वसमावेशक व्यवस्था तयार करणे.