Tuesday, September 11, 2018

इतर मागासवर्गीय जातींची जनगणना

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
स्वतंत्र भारतात इतर मागासवर्गीयांची संख्या नेमकी आहे तरी किती, ते एकदा स्पष्ट होऊ द्या, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. परंतु इतर मागासवर्गीय समाजास न्याय मिळवून देण्याचे कार्य केंद्रातील आजच्या भाजपप्रणीत एन. डी. ए. सरकारने केले आहे. २०२१ साली देशात राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या जनगणनेत इतर मागासवर्गीयांचा (ओबीसींचा) स्वतंत्र तपशील गोळा करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. देशाचे गृहमंत्री माननीय राजनाथ सिंह यांनी तशा सूचना दिल्या आहेत. 

जणगणनेचा इतिहास पाहता, आपल्या देशात इ. स. १८७२ सालापासून दर दहा वर्षांनी जनगणना होते, प्रारंभीच्या काळात ती जातिनिहाय केली जात असे. नंतर ती धर्माधारित होऊ लागली. ब्रिटीशकालीन भारतामध्ये १९३१ साली शेवटची जातीनिहाय जनगणना करण्यात आलेली होती, त्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये प्रथमच २०२१ च्या जणगणनेवेळी इतर मागासवर्गीय लोकांची जातीनिहाय जनगणना करून माहिती गोळा करण्याच्या दिशेने सरकारने विचार सुरु केला आहे. त्याचे कारण ही तसेच आहे, आजवर झालेल्या जणगणनेतून देशातील इतर मागासवर्गीयांची संख्या नेमकी किती आहे, याचा अंदाज येत नव्हता. मंडल आयोगाने १९३१ च्या जनगणनेचा आधार घेत ती ५२ टक्के गृहित धरली होती. तर १९९८ मधील राष्ट्रीय कौटुंबिक मोजणीनुसार ती ३४ टक्के आहे. त्यामुळे, इतर मागासवर्गास समान न्याय देण्याकरिता गणना करण्यात यावी, अशी मागणी आजवर होत आलेली आहे, त्यामुळेच  केंद्रातील एन. डी. ए. सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. 

तसेच स्वतंत्र भारतात इतर मागासवर्गीय जातींची जनगणना केल्यामुळे आजवर किती लोकांना यामधून आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, अथवा किती लोक सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा बिगर सरकारी नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत, याची देखील माहिती मिळू शकणार आहे. ज्यांना लाभ मिळालेला नाही, त्यांना लाभ मिळवून देणे यामुळे सोयीस्कर होणार आहे. यावेळी नव्या जनगणनेच्या निमित्ताने नवी आकडेवारी समोर येईल. त्याचे देशातील समाजव्यवस्थेवर दूरगामी परिणाम पहायला मिळतील. जणगणनेतून समोर येणाऱ्या आकडेवारीतून स्पष्ट होईल, की यातील नेमक्या किती जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात येईल. 

यापूर्वी २०११ ते २०१३ च्या दरम्यान  केंद्र सरकारकडून सामाजिक-आर्थिक निकषांवर आधारित एक जातींची जनगणना (SECC) करण्यात आली होती. त्यावेळी ओबीसी लॉबीची मागणी लक्षात घेता केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक घराच्या सामाजिक तसेच आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण केले होते. 

केंद्र सरकारने २०२१ च्या जनगणनेचा एक भाग म्हणून इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांची माहिती गोळा करण्याचा जो निर्णय घेतला आहे, मुख्यता या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या अंतर्गत असलेल्या उप जातींचे देखील वर्गीकरण करता येणार आहे, तसेच खरोखरीच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या इतर मागासवर्गीय समाजाला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने पुढील पाऊले टाकता येणार आहेत. त्यामुळे एन. डी. ए. सरकार च्या या निर्णयाचे आपण स्वागत करून, इतर मागासवर्गीय समाजास न्याय मिळवून देण्याच्या या प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवला पाहिजे.  

- नागेश कुलकर्णी 


अटलजी और सहकारिता


अटल बिहारी वाजपेयी जी ने बतौर प्रधानमंत्री भारत को बुनियादी ढांचे के लिहाज से विश्व के अग्रणी देशों की कतार में खड़ा करने का प्रयास किया | उन्होंने न केवल पूरे देश में आधुनिक सड़कों का जाल बिछाया, बल्कि भारत में स्थित सुदूर पर्वतीय क्षेत्रों को रेल नेटवर्क से जोड़ने के लिए भी प्रयत्न किए | अटलजी के कार्यकाल में ही भारत में मोबाइल क्रांति की शुरुआत हुई | साथ ही में विमानन क्षेत्र को विदेशी कंपनियों के लिए खोलकर इसके विकास व विस्तार की आधारशिला रखी गई। अटलजी केवल देश के नेता नहीं थे, वे विश्व शिखर पर विराजमान, जगन्मान्य नेतृत्व थे | भारत देश में विविध क्षेत्रों में उन्होंने किया हुआ कार्य, देश की आनेवाली पीढ़ियों को, युवाओं को नई सिख देता रहेगा | अटलजी का यही सपना था, की देश का युवा साक्षर हो, सक्षम हो और स्वयं निर्भर हो | तभी तो उन्होंने नारा दिया था, जय जवान, जय किसान और जय विज्ञान | विज्ञान की राह पर चल के युवा भारत और भी ऊँचाइयों को छु सके, इसलिए अटलजी अविरत परिश्रम करते रहें | उनका सहकारिता क्षेत्र में भी योगदान रहा है | 

अटलजी के कार्यकाल में ही स्वयं सहायता समूह को आकार दिया गया | और ग्रामीण अर्थव्यवस्था को गती देते हुए, महिलओं के सशक्तिकरण की नीवं रखी गई | १९९९ में शुरू की गई “स्‍वर्ण जयंती ग्राम स्‍वरोजगार योजना” इसी उद्देश्य से शुरू की गई थी | इस योजना कार्यक्रम के अनुसार ग्रामीण क्षेत्रों में निरंतर आय के अवसर पैदा करने के लिए मध्यम और निम्न मध्यम वर्ग के व्यक्तियों/ युवाओं को प्रेरणा देकर लघु उद्यमों की स्‍थापना पर ध्‍यान केंद्रित किया गया | ग्रामीण क्षेत्र के व्यक्तियों में उद्योगी व्यक्ति की क्षमता पैदा करना, उन्हें कौशल विकास प्रशिक्षण देना, लघु उद्योग के लिए ऋण देना तथा प्रौद्योगिक हस्तांतरण करना, विपणन और ढांचेगत सहायता पर विशेष बल देना, ऐसे कार्यक्रम उस वक्त हात में लिए गए थे | 

एक तरफ देश में सड़के बन रही थी | युवाओं को स्कूली शिक्षा प्राप्त हो रही थी, तो दुसरी तरफ “स्वयं सहायता समूह” के माध्यम से ग्रामीण भारत में आर्थिक सक्षमीकरण के प्रयास किए जा रहे थे | देशा का युवा स्वयं निर्भर और सक्षम होने की दिशा में आगे बढ़ रहा था | तभी भारत देश में “सर्व शिक्षा अभियान” के माध्यम से प्रेरित युवा स्कूलों की ओर आकर्षित हो रहा था | “स्कूल चले हम” यह गाना गुनगुनाते बच्चे स्कूल जा रहे थे | याने की स्वयं निर्भरता और स्कूली शिक्षा का हक़ इन की नीवं अटलजी ने रखी थी |

पहले मध्यम वर्ग से लेकर के धनी लोगों को व्यवसाय और उद्योग शुरू करते वक्त सरकार की तरफ से जो दिक्कते होती थी, वे कम करने में अटलजी की महत्त्वपूर्ण भूमिका रही | अटलजी की सरकार ने डिसइन्वेस्टमेंट प्रक्रिया शुरू की | परिणामस्वरूप उद्योग क्षेत्र को अप्रत्यक्ष या प्रत्यक्षरूप से फायदा हुआ | लोगों की व्यवसाय और उद्योग में पुंजी और आय बढ़ने लगी | अटलजी के सरकार ने ही "अंत्योदय अन्न योजना" नाम से जाने जाने वाली और देश के सबसे निचले तबके तक का विचार कर के बनाई हुई, यह योजना गरीबों के लिए चलाई गई सबसे बड़ी योजना थी | इस में अंत्योदय का विचार था |

सरकार ने अटलजी के कार्यकाल में शुरू की गई कई योजनाओं में लोगों की सहभागिता को बढ़ावा देने का काम किया | जो काम सरकारे करती थी, वे काम अब लोग करने लगे थे, और वे भी समूह से और सहभागीरूप से | वैसे तो अटलजी के कार्यकाल में लोकहित के बहुत सारे अन्य काम हुए थे और कई कामों की शुरुआत की गई थी | परंतु ग्रामीण भारत में सहकारिता और समूह उद्योग स्थापित करने का प्रयास करना यह जनमानस भारत में निर्माण हो, इस की शुरुआत स्वयं सहायत समूह के माध्यम से ज्यादा बढ़ी |

अंततः अंत्योदय के  मार्ग पर मार्गक्रमण करते हुए | देश में सहकारिता को समाज के आखरी तबके तक ले जाने का प्रयास करना यही हमारा भी संकल्प होना चाहिए और यही अटलजी को असल में श्रद्धांजलि भी होगी | 


बाधाएँ आती हैं आएँ
घिरें प्रलय की घोर घटाएँ,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएँ,
निज हाथों में हँसते-हँसते,
आग लगाकर जलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।

- नागेश कुलकर्णी 

बदलत्या संस्कृतीचा साक्षीदार होताना


भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारं भारतीय दंड संहितेचं कलम 377 रद्द ठरवलं. LGBT साठी हा निर्णय स्वागतार्ह असून, या निर्णयाचे आपण सर्वांनी  स्वागतच करायला हवे. देशात LGBT लोकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी अनेक संस्था कार्य करत आहेत, यावेळी त्यांच्या लढ्याला योग्य न्याय मिळाला असे म्हणावे लागेल. परंतु प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा, बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशावर आणखी कोणता वेगळा परिणाम होऊ शकतो का?, याचा देखील विचार आपण करायला हवा.

आजकालची तरुण पिढी आणि बदलणारी संस्कृती यांची बदलती वागणूक पाहता, भविष्यातील भारताचा विचार करण्याची हीच वेळ आहे. पाश्‍चिमात्त्य विचारसरणी आणि साता समुद्रापल्याडच्या संस्कृतीचे विशेष आकर्षण यामुळे तरुण मुलं-मुली व्यसनाधीन आणि वासनांधतेकडे वाहवत जाताना दिसत आहेत. यानिमित्ताने परिणामांचा विचार न करता क्षणिक सुखांच्या मागे धावणाऱ्या तरुणाईस वेळीच आवरायला हवे, अन्यथा आपल्या भावी पिढ्या देशास सांस्कृतिक ऱ्हासाच्या दिशेने घेऊन जातील.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने Obergefell विरुद्ध Hodges या खटल्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. त्यावेळी एकूण नऊ न्यायाधिशांच्या खंडपीठाने 5 विरूद्ध 4 अशा संख्येने अमेरिकेमध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यात दिली. या निर्णयावेळी, निर्णयाच्या बाजूने चार आणि विरोधात चार मते पडलेली असताना, निर्णायक मत देते वेळी न्यायाधीश अँथोनी केनेडी यांनी, "या लोकांनाही समानतेचा हक्क आहे, त्यासाठी आम्ही त्यांना त्यांचा हक्क बहाल करत आहोत", असे म्हणत, निर्णयाच्या बाजूने निकाल जाहीर केला. या सर्व घटनाक्रमाचा एकूण विचार करता अमेरिकेला देखील हा निर्णय मान्य नव्हता. परंतु अगदी निसटत्या मताधिक्याने हा निर्णय घेऊन कायदा पास करण्यात आला, ज्याचे त्यानंतर सर्व अमेरिकन नागरिकांनी स्वागत केले.

असेच काही दिवसांपूर्वी, जनतेमधून सार्वमत घेऊन आयर्लंडने समलिंगी विवाहांना सर्वानुमते मान्यता दिली. त्यावेळी तेथील लोकांनी आनंदोत्सव साजरा करत पार्ट्या केल्या. तत्कालीन ब्रिटनच्या पंतप्रधानांनी या सर्व प्रकाराचे समर्थन करत आयर्लंडच्या जनतेचे अभिनंदन केले. हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच कि, भारतामध्ये LGBT समुदायाचे हक्क असे म्हणून, कलम 377  रद्द केल्यास, पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यास उत्सुक असलेल्या भारतीय तरुण पिढीवर याचे वाईट परिणाम होऊ शकतात.

यापुढे भारतात अभिव्यक्तीच्या नावाखाली समलिंगी विवाह, त्यात प्रामुख्याने गे मॅरेजची (कारण आपल्याकडे मुलींची संख्या कमी होत आहे.) संख्या वाढण्याची भीती आहे, मग गे मॅरेजनंतर मुल दत्तक घेऊन संसार करणे, अथवा पती-पत्नी हे नात नकोच! कोण सांभाळणार एकमेकास अथवा ती कटकट नको, त्यामुळे मित्र-मित्र अथवा मैत्रिणी-मैत्रीणी एकत्र राहू, अन मुलं दत्तक घेऊ, अशी भावना वाढीस लागून विवाह संस्था अस्थिर होऊ शकते. अवाढव्य लोकसंख्या असलेल्या भारत देशात असे काही झाले तर विचार करा? असेही आजकाल, स्त्री आपल्या घरात देखील सुरक्षित राहिलेली नाही. रोज वर्तमानपत्रांमधून नवनव्या हेडलाईन्स झळकत असतात. बापाचा मुलीवर डोळा, भावाचा बहिणीवर डोळा, दिर-भावजयीचे अनैतिक संबंध तर कुठे आई-मुलगा. गतिमंद, मतिमंद मुलांवर अनैसर्गिक कृत्यांचे प्रकार वाढत आहेत. शिक्षक-मुले, शिक्षिका-मुले, शिक्षक-मुली यांचे नाते देखील यामध्ये अडकते आहे. आईसमान असलेल्या मित्राच्या आईने एका बारा वर्षाच्या मुलावर जबरदस्ती केली, तर कुठे सहा महिन्यांच्या बाळावर बलात्काराच्या घटना घडत आहेत. काही थोरामोठ्यांची देखील यामध्ये नावे घेतली जातात, यामध्ये राजेंद्र पचौरी, तहलका फेम तरुण तेजपाल, आसाराम बापूसारखे स्वयंघोषित संत.

भारत देशामध्ये देखील अमेरिकेप्रमाणे LGBT लोकांची संख्या अधिक आहे, एका सर्वेक्षणानुसार ती 12 लाख तर कोणाच्या सर्वेक्षणानुसार  12 ते 15 कोटी असेल असा अंदाज आहे, कारण आपल्याकडील कलम 377 च्या भीतीने याबाबत यापूर्वी कोणीही सार्वजनिक वाच्यता करीत नव्हते. एकीकडे लग्नानंतर पुरुषांनी स्त्रीच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध केल्यानंतर हा बलात्काराचा गुन्हा ठरवला जावा याबाबतीत, कायदा व्हावा असा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे आला असताना 377 कलम रद्द करणे अधिक धोक्याचे ठरू शकते हे भारत सरकारच्या लक्षात यायला हवे. भारतामध्ये पांढरपेशा कुटुंबामध्येदेखील समलैंगिकतेविषयी आकर्षण आढळून येते असे एका सर्वेक्षणानुसार प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात 2006 सालापासून नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन आणि लेखक विक्रम सेठ यांनी भारतातील किन्नर समाजांच्या हक्कांसाठी 377 कलम शिथिल करावे, अशी आग्रही मागणी लावून धरली होती. तसेच भारतीय सर्वोच्च न्यायालयाने देखील नाझ फाऊण्डेशन विरुद्ध सरकार या खटल्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत, किन्नर समाजाला मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी नाझ फाऊण्डेशन चालवलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले होते.

भारतीय प्राचीन काळाने जो योग आणि आध्यात्माचा विचार दिला आहे, त्याचा विचार न करता भारतीय युवावर्ग सध्या संभोग आणि व्यसन यामुळे एड्ससारख्या अतिभयंकर रोगांचा बळी ठरत चालला आहे. भारतीय प्राचीन संस्कृतीत, एव्हाना आजदेखील काहीजण वेळ काढून योगसाधना, ब्रह्मचर्याचे पालन, युवावर्गासाठी लैंगिक शिक्षण यांचे धडे देतात. स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण करणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य असल्याचे शिकवले जाते. पौगंडावस्थेतील युवक-युवतींना त्यांच्या पालकांनी वेळीच योग्य लैंगिक शिक्षण दिले तर युवा वर्गास दिशा मिळू शकते. परंतु आजकाल हा सारा थोतांडपणा वाटतोय लोकांना, आपल्याकडे ए. आय. बी. सारख्या शोज् ना मान्यता मिळते. करण जोहर, रणवीर सिंह, सोनाक्षी सिन्हा यांसारखे बॉलिवूड कलाकार या कार्यक्रमाचा आनंद घेतात. आजकाल दीपिका पदुकोणचा “इट्स माय चॉईस” हा व्हिडिओ प्रदर्शित होतो, स्त्रियांना देखील पुरुषांएवढाच अतिरेक करण्याचा अधिकार हा व्हिडिओ सांगून जातो. यावरून फक्त आनंद मिळवण्यासाठी, शरीर संबंध प्रस्थापित करणार्‍या नवपिढीतील पुरुष हा प्रत्येक स्त्रीकडे फक्त एक स्त्री या नजरेने पाहतो, यामुळे आजच्या समाजमान्यतेनुसार, अश्‍लिलतेची खरी व्याख्या काय हाच कधी कधी प्रश्‍न पडतो?

आपल्या समाज व्यवस्थेमध्ये तर आंतरजातीय विवाहांना देखील विरोध होतो, मग गे मॅरेजला मान्यता कशी मिळू शकेल, किंवा प्रत्येक जन असे वागू शकणार नाही, असे अनेक मतमतांतरे आज मांडली जात आहेत. परंतु येथे एक लक्षात घ्यावे की भारतामध्ये कायदे असोत वा नसो, लोकशाहीमुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मनमर्जीनुसार वागते. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास चार भिंतीमधील गोष्टी जगाला नाही दिसू शकणार, यावर बोलणे सोपे आहे, परंतु चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही...! कारण आपल्या देशात पालक आणि पाल्य यांच्यामधील संवाद हरवत चालला आहे, अश्लील चित्रफिती मोबाईलवर आता सहज उपलब्ध होत आहेत. मुला- मुलींना वयापेक्षा लवकरच शहाणेपण येत आहे.

आजवरची भारताची स्थिती पाहता, गांधी मला भेटला या कवितेत हस्तमैथुन या शब्दाचा उल्लेख केला म्हणून त्या कवितेवर ३० वर्षे खटला चालतो, तर दुसरीकडे जगभरात इंटरनेटवर सुरू असलेल्या चार कोटींपेक्षा अधिक अश्‍लील माहिती पुरवणार्‍या पोर्न साईट्सना भारतात आपण बंद करू शकत नाही, असा निर्णय न्यायालय देते. वाढत्या इंटरनेटच्या युगात अरुणा शानबाग खटला, दिल्ली गँगरेप, शक्ति मिल खटला अशा खटल्यांचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने मुळावरच घाव घालायला हवा, इंटरनेटवरील या चार कोटी पोर्न साईट्स बंद केल्या तर काय परिणाम होऊ शकतात, यावरही विचार व्हायला हवा होता. 

कलम 377
IPC च्या कलम 377 नुसार समलैंगिकता, पशु-प्राणी यांना लैंगिक त्रास देणे हा गुन्हा आहे. हा अनैसर्गिक कृत्याचा प्रकार मानून यासाठी आजन्म कारावासासारख्या शिक्षेचे प्रावधान करण्यात आलेले आहे.


शेवटी भारत देशाच्या बदलत्या संस्कृतीचा साक्षीदार होताना असे वाटते, की कलम 377 ज्यांचे Cromozomes XYY आहेत, म्हणजेच ज्यांच्यामध्ये जन्मजात हे बदल झालेले आहेत, त्यांच्या भावनांचा आदर व्हायला हवा, त्यांना न्याय मिळायला हवा, परंतु त्याच बरोबर 377 कायद्याचा दुरुपयोग होणार नाही, अथवा यामुळे एकूण समाजव्यवस्था- समाजरचना बदलणार नाही याकडेही सरकारने आणि प्रामुख्याने न्यायव्यवस्थेने लक्ष द्यायला हवे. कारण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये खूप फरक आहे, प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी जगताना व्यवनाधीनता आणि वासनांधता यांपासून दूर राहावे. तरच खरा भविष्यातील युवा भारत घडेल.

नाझ फाऊण्डेशन विरुद्ध NCT सरकार दिल्ली खटला - 2009.
या खटल्यामध्ये दोन न्यायाधिशांच्या खंडपीठाने खटल्याची सुनावणी करतेवेळी निर्णय दिला होता की दोन वयस्क नागरिकांच्या मर्जीनुसार झालेल्या त्यांच्या स्वत:च्या समलैंगिक (Homosexual) संबंधांना गुन्हा ठरवणे, हे खरे तर त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन केल्यासारखे अथवा त्यांच्या हक्कांवर गदा आणल्यासारखे होईल. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. त्यानुसार 2013 साली सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या विरुद्ध निकाल देतेवेळी 377 कलम योग्य असल्याचे म्हटले होते. 

- नागेश कुलकर्णी 

Monday, May 21, 2018

अर्थात : देशाचे अर्थकारण बदलेल !




भारत देशाने १९९१ साली खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण करून देशात एक वेगळीच अर्थक्रांती घडवून आणलेली होती. त्यावेळी देशाचे अर्थकारणच बदलले होते. आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाच्या अर्थकारणास उभारी देण्याचे काम त्यावेळी करण्यात आले होते. आजच्या दिवशी देशाची एवढी हलाकीची परिस्थिती नाही. परंतु बँकिंग क्षेत्रात, बँकांची दिवाळखोरी वाढताना दिसून येते, अमुक एक उद्योगपती बँकांचे एवढे लाख कोटी घेऊन पसार किंवा तमुक एका उद्योग समूहाने बँकेचे काही लाख कोटी देऊ शकत नाही म्हणून स्वतःस दिवाळखोर म्हणून जाहीर केले. असे वृत्त आपण प्रसार माध्यमांतून ऐकत असतो. देशाच्या अर्थकारणात अशा घटनांवर वेळीच तोडगा काढणे आवश्यक असते, अन्यथा देशाची आर्थिक गती मंदावते.




याचाच प्रत्यय म्हणून काल भारतीय अर्थजगतात एक आगळी वेगळी घटना घडून गेली! याविषयावर २०१५ सालापासून संसदेच्या पटलावर काम करणाऱ्या, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, देशाच्या अर्थकारणात खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यानंतरचा सर्वात मोठा आर्थिक बदल घडवून आणला आहे. काल टाटा स्टीलने भुषण स्टील ही कंपनी विकत घेतली, यापुढे भुषण स्टील मध्ये ७२.६५ % समभाग हे टाटा स्टीलचे असतील. या ऐतिहासिक घटनेविषयी माहिती घेण्यापूर्वी, याचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे.



२०१६ मध्ये मोदी सरकारने इंसाँलव्हंसी अँड बँक्रपसी कोड (आय. बी. सी.) या नावाचा कायदा पारित करविला. पुढे जाऊन नँशनल काउंसील आँफ लाँ ट्रायब्यूनल (एन. सी. एल. टी.) ची स्थापना करण्यात आली. २०१४ च्या पूर्वीच्या  सरकारच्या चूकीच्या धोरणांमूळे बँकेकडून मोठ्याप्रमाणात कर्ज घेणाऱ्या व वेळोवेळी परत करू न शकल्यामुळे दिवाळखोर होणाऱ्या कर्जबुडव्यांची संख्या वाढत चाललेली होती. त्यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्राला या बुडीत कर्जांमुळे आपलं भांडवल गमावण्याची वेळ आली होती. सरकारी कायद्यांच्या क्लिष्टतेमुळे ज्या मालमत्ता गहाण पडलेल्या असत त्याची विक्री करवून कर्जवसूली करणे हे सरकारसाठीच जिकीरीचं काम होवून बसले होते. आय. बी. सी. व एन. सी. एल. टी. च्या निर्मितीमुळे दिवाळखोर आणि कर्ज बुडव्या कंपन्यांवर वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत काही बंधने आली. बँकांनाही  आपली थकीत कर्जे पुनरगठीत करता येण्याचे मार्ग बंद झाले. यामध्येच काल भूषण स्टीलची इ निविदा प्रक्रियेने बोली लागून टाटा स्टील ने ही कंपनी विकत घेतली.



इंसाँलव्हंसी अँड बँक्रपसी कोड (आय. बी. सी.) म्हणजे काय ?

भारत देशात जे दिवाळखोरीचे नियम आहेत ते दिवाळखोरी आणि दिवाळखोरीसाठी एक प्रकारचा कायदा तयार करून एकत्रित करणे आणि सध्याच्या संरचनेला एकत्रित करून देशाचे अर्थकारण स्थिर करणे म्हणजेच दिवाळखोरी व दिवाळखोरीची संहिता, २०१६ (आय. बी. सी.) असे म्हणता येईल.



आय. बी. सी. कायद्याविषयी काही ठळक मुद्दे : 
  1. आय. बी. सी. स्वतंत्र व्यक्ती, कंपन्या आणि भागीदारी फर्मसाठी विभक्त दिवाळखोरी प्रक्रियेची रूपरेषा देतात.
  2. कर्जदार किंवा कर्जदारांद्वारे या प्रक्रियेची सुरवात केली जाऊ शकते. थकित म्हणून जाहिर झाल्यापासून १८० दिवसाच्या मुदतीत वा वाढीव ९० दिवसांच्या मुदतीत प्रकरण निकालात काढणे बंधनकारक होऊन हे शक्य नसल्यास मालमत्तेची विक्री हा एकमेव मार्ग खुला राहिला.
  3. छोट्या कंपन्या आणि इतर कंपन्या (एक कोटी रुपयांपेक्षा कमी मालमत्तेसह) यांच्यासाठी ठराव प्रक्रियेची विनंती ९० दिवसाच्या आत पूर्ण केली जाईल ज्यासाठी ४५ दिवसांपर्यंत वाढवले जाऊ शकते.
  4. दिवाळखोरीची कार्यवाही पाहण्याकरिता, दिवाळखोरी विषयक मंडळ स्थापन करून या कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांना त्यांचे नियमन करणे बंधनकारक आहे.
  5. आय. बी. सी. कायद्याने व्यक्ती आणि कंपन्यांसाठी दिवाळखोरी ठरावाच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी दोन वेगवेगळे न्यायाधिकरण स्थापन केलेले आहेत. कंपनीसाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल आणि व्यक्ती व संयुक्त भागीदारीसाठी डिबेट रिकव्हरी ट्रिब्युनल तयार करण्यात आले आहेत.


या कायद्याची अंमलबजावणी आणि कार्यपद्धती :

- आम्ही दिवाळखोर झालो आहोत, अशी एक याचिका निर्णय देणाऱ्या  अधिकाऱ्याकडे (कॉर्पोरेट कर्जदारांच्या बाबतीत एन. सी. एल. टी. कडे ) कर्जदारांकडून सादर केली जाते.

-  यावर विचार करण्यासाठी मग १४ दिवसांचा वेळ दिला जातो.

- जर याचिका स्वीकारण्यात आली तर, न्यायाधिकरणाकडून १८० दिवसांच्या आत (वाढीव ९० दिवसांनी) एक आय. आर. पी. (दिवाळखोरीधारक व्यावसायिक) नियुक्त केला जातो. आणि याबाबत निर्णय प्रक्रिया सुरु केली जाते.

- या कालावधीसाठी, कंपनीचे संचालक मंडळ निलंबित करण्यात येते, आणि प्रवर्तकांना ही  कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये काहीही अधिकार नसतात.

- यानंतर ई निविदा काढून ती कंपनी किंवा कंपनीचे समभाग विकण्याची प्रक्रिया सुरु होते. विशेष म्हणजे दिलेल्या ठराविक वेळेच्या नंतर निविदा सादर करणाऱ्या अथवा बोली लावणाऱ्या कंपनीचा यामध्ये विचार केला जात नाही, यामध्ये संपूर्णपणे पारदर्शकता जपली जाते.

- त्याच कंपनीच्या मालकास आपल्या नातेवाईक अथवा मित्रमंडळी यांच्यामार्फत या बोली मध्ये सहभागी होता येत नाही.


यानंतर म्हणजेच इंसाँलव्हंसी अँड बँक्रपसी कोड (आय. बी. सी.) आणि नँशनल काउंसील आँफ लाँ ट्रायब्यूनल (एन. सी. एल. टी.) च्या स्थापनेनंतर रिझर्व बँकेने १२ खाती एन. सी. एल. टी. ला वर्ग केली व अंमलबजावणी सुरु झाली. अशा पहिल्या एक दोन फाईलमधील एक फाईल भुषण स्टिल्सची होती.



टाटा स्टील्स कडून भुषण स्टील्स विकत घेण्याची प्रक्रिया :

- एकुण ५३ क्रेडिटर्सकडून, यामध्ये अंतर्गत आणि अंतरराष्ट्रीय कर्जदार समाविष्ट आहेत ,भुषण स्टील्सने घेतलेली कर्जे बाकी होती. त्यामुळे ही कंपनी दिवाळखोरीच्या वाटेवर होती.

- यामध्ये वित्तिय संस्था व बँका यांना देय असलेली रक्कम रुपये ५६०७९ कोटी इतकी होती.

- कालच्या दिवशी एन. सी. एल. टी. च्या निर्णयानुसार हा व्यवहार पुर्ण होऊन भुषण स्टील्सची ७२.६५ %  मालकी टाटा स्टील्सकडे आली.

- बँका व वित्तीय संस्था यांना आपल्या येण्यातील जवळपास ७५% रक्कम वसुल करता आली, उरलेली २४% रक्कम वादग्रस्त राहते ज्याला इंग्रजीत हेअरकट असा शब्द वापरला आहे.

- पुर्वीच्या पद्धतीनुसार ही केस खूप काळ चालली असती. व्याजावर व्याज चढवत शेवटी बँकांना आपल्या रकमा लाँस म्हणून काढून टाकाव्या लागल्या असत्या.

- परंतु २७० दिवसात संपुर्ण केसचा निकाल लावणे हे या संपुर्ण घटनेचं वेगळेपण आहे आणि म्हणून एन. सी. एल. टी. चं यश आहे.


पर्यायाने असंही मान्य करावं लागेल की केंद्र सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीचा हा विजय आहे. कारण आजवर अनेक सरकारे आली अन गेली परंतु देशातील लायसन्स राज पद्धती, कर सुधारणा पद्धती आणि आर्थिक धोरण बदलण्याचे धाडस खूप कमी सरकारांनी केलेले आहे. त्यामुळे कालच्या या घटनेकडे एक प्रकारे देशातील आर्थिक बदलाची नांदी म्हणून पाहता येईल. यामुळे भविष्यात नक्कीच बेरोजगारी आणि दिवाळखोरी मुळे जाणाऱ्या नोकऱ्या आणि त्यामुळे येणारी बेकारी यास निश्चितच आळा बसेल आणि देशाच्या वाढत्या जी. डी. पी. ला चालना मिळेल.



-      नागेश कुलकर्णी.

Saturday, May 20, 2017

दुर्ग भ्रमंती - नरवीर ‘सिंहगड’

पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला सिंहगड (कोंडाणा किल्ला) पुणेकरांसाठी सर्वात जवळचे ठिकाण आहे. पुण्यातील दुर्गप्रेमी सिंहगडावर सतत गर्दी करत असतात. सह्याद्री पर्वताच्या भुलेश्वर डोंगररांगेवर पूर्वी "कोंढाणा" नावाचा प्राचीन किल्ला होता. तानाजी मालुसरेंच्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव "सिंहगड" ठेवले. तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला कोंढाणा किल्ला, आजच्या स्थितीत पुणेकर मंडळींसाठी पर्यटनस्थळ म्हणून कार्यरत आहे. सिंहगडावरून परिसरातील पुरंदर, लोहगड, विसापूर, राजगड आणि तोरणा किल्ल्यापर्यंतचा प्रदेश दिसतो.
सिंहगडावर जाण्यासाठी पुणे मनपापासून आणि स्वारगेटहून गडाच्या पायथ्यापर्यंत पी. एम. टी. बस आहेत. तसेच सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता असल्यामुळे खडकवासला धरणाजवळून गडाच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहन घेवून जाता येते. पी. एम. टी. बसने गडाच्या पायथ्यापर्यंत गेल्यानंतर हातकरवाडी गावातून पुढे पायी जाण्यासाठी पायवाट आहे. गडावर जाण्यासाठी वाहनाने जाण्यापेक्षा या पायवाटेने गेल्यानंतर ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो.
सिंहगडावर पुणे दरवाज्यापासून ते शेवटी असलेल्या टिळक वाड्यापर्यंत (बंगल्यापर्यंत) सर्व ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच गडावर अनेक हॉटेल्स देखील आहेत.

पुणे दरवाजा मार्गे : पुणे-सिंहगड पी. एम. टी. बसने पुण्यातून निघाल्यानंतर खडकवासला धरणापासून सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते.
पुणे- कोंढणपूरमार्गे : पुणे- कोंढणपूर बसने कल्याण गावामध्ये पोहचल्यानंतर कल्याण दरवाज्यातून सिंहगडावर जाता येते. कल्याण दरवाजा सिंहगडाच्या पश्चिम दिशेस आहे.

कोंढाणा किल्ला / सिंहगड चा इतिहास :
कोंढाणा किल्ला केंव्हा बांधला असावा, याचा ज्ञात पुरावा नाही. परंतु कोंढाण्याचा इतिहास सुरु होतो तो आदिशाहीच्या सत्तेपासून. कोंढाणा गावामध्ये असलेला कोंढाणा किल्ला पूर्वी आदिलशाहीच्या अखत्यारीत होता. त्यावेळी आदिलशाहिने दादोजी कोंडदेव यांना किल्ल्याचा सुभेदार म्हणून नियुक्त केले होते. इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पुरंदरच्या तहावेळी कोंढाणा किल्ला मोघलांना देण्यात आला. त्यावेळी मुघलशाहीकडून सरदार उदयभान राठोड यांस कोंढाणा किल्ल्याचा गडकरी म्हणून नियुक्त करण्यात आले.
मराठेशाहीच्या इतिहासात कोंढाणा किल्ल्यावर घडलेल्या पराक्रमामुळे कोंढाण्याचे नामकरण ‘सिंहगड’ झाले, आणि किल्ला विशेषत्वाने प्रसिद्धीस आला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने, मुघलांकडे असलेला कोंढाणा किल्ला, मराठ्यांनी जिंकला खरा परंतु यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांना वीर मरण आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी यावेळी, “गड आला, पण माझा सिंह मात्र गेला”, असे म्हणत कोंढाण्याचे नामकरण ‘सिंहगड’ असे केले.

सिंहगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
पुणे दरवाजा : सिंहगडाच्या वाहन तळापर्यंत गेल्यानंतर सुरुवातीस पुणे दरवाजा आहे. गडावर प्रवेश करण्यासाठी पुण्याच्या बाजूने हा मुख्य दरवाजा आहे. पुण्याच्या बाजूस असणारे असे तीन दरवाजे आहेत. एका मागे एक अशा या तीन दरवाज्यामधून गडाकडे जाण्याकरिता वाट आहे.

दारूचे कोठार : पुणे दरवाज्यातून आत आल्यानंतर समोर दारूचे कोठार दिसते. दारूच्या कोठाराची थोडीफार पडझड झालेली आहे. परंतु हे सुस्थितीत आहे. पुणे परिसरातील पर्यटकांची याठिकाणी सतत वर्दळ असल्यामुळे, याठिकाणी सतत गर्दी असते. गडावर येथे तोफखाना असे लिहिलेली एक पाटी देखील आहे.

खांद कडा : पुणे दरवाज्यामधून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर खांद कडा दिसतो. या कड्यावरून सह्याद्री पर्वताच्या परिसरातील निसर्ग दिसतो. तसेच पुण्यातील इमारती देखील दिसतात.

कोंढाणेश्वर महादेव मंदिर : इतर किल्ल्यांप्रमाणे कोंढाणा किल्ल्यावर देखील एक यादवकालीन महादेवाचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते. मंदिरामध्ये  कोंढाणेश्वर महादेवाची पिंड आणि एक नंदीची मुर्ती आहे.

अमृतेश्वर मंदिर : कोंढाणेश्वराच्या मंदिरापासून थोडे पुढे गेल्यानंतर अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. यादव घराण्याच्यापूर्वी कोंढाणा किल्ल्यावर कोळ्यांची वस्ती होती, आणि भैरव हा कोळ्यांचा देव असल्यामुळे अमृतेश्वर मंदिरामध्ये भैरव आणि भैरवीच्या मुर्त्या आहेत. यामध्ये हातात राक्षसाचे मुंडके असलेली भैरवाची मुर्ती आहे.

नरवीर तानाजी मालुसरे स्मारक : अमृतेश्वर मंदिराच्या मागील बाजूने पुढे चालत गेल्यानंतर नरवीर  तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते. उदयभान राठोडशी लढता लढता धारातीर्थी पडलेल्या नरवीर तानाजींच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आले आहे.

देव टाके : नरवीर तानाजी मालुसरे स्मारकाच्या जवळून पुढे गेल्यानंतर देव टाके आहे. या टाक्यातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होत असे.

कल्याण दरवाजा : सिंहगडाच्या पश्चिम दिशेस कल्याण दरवाजा आहे. कोंढणपूर गावामधून पायथ्याच्या कल्याण गावातून गडावर आल्यानंतर कल्याण दरवाज्यामधून गडावर प्रवेश करता येतो. कल्याण दरवाज्यावर काही दगडी शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.

उदयभान राठोडचे स्मारक : मोगलांनी उदेभान राठोड यास कोंढाण्याचा गडकरी म्हणून नियुक्त केले होते. नरवीर तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांच्या लढाईमध्ये उदयभान देखील मारला गेला होता. या उदयभान राठोडचे देखील गडावर स्मारक आहे.

झुंजार बुरूज : सिंहगडाच्या दक्षिण दिशेस झुंजार बुरूज आहे. उदयभान राठोडच्या स्मारकापासून पुढे गेल्यानंतर झुंजार बुरुजावर येता येते. झुंजार बुरुजावरून पानशेतचा परिसर, राजगड, तोरणा आणि पुरंदर दिसतात.

तानाजी कडा : तानाजी कडा सिंहगडाच्या पश्चिम दिशेस आहे. नरवीर तानाजी मालुसरे याच बुरुजावरून मावळ्यांसह गडावर चढले होते. तानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड आणि त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा वेगळ्याप्रकारे सांगण्याची गरज नाही.

छत्रपती राजाराम महाराज स्मारक : छत्रपती राजाराम महाराज यांची सिंहगडावर समाधी आहे.  मुघलशाहीशी लढा देत असताना छत्रपती राजारामांचे सिंहगडावर निधन झाले होते. त्यावेळी छत्रपती राजाराम यांचे स्मारक सिंहगडावर बांधण्यात आले. पुढे पेशवाईमध्ये सिंहगडावर असलेल्या या स्मारकांची रीतसर व्यवस्था ठेवण्यात आलेली होती.

लोकमान्य टिळक यांचा वाडा : सिंहगडावर लोकमान्य टिळक यांचा एक वाडा आहे. इ.स. १९१५ साली लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची या वाड्यामध्ये भेट झाली होती. आगरकर आणि लोकमान्य टिळक सिंहगडावर आल्यानंतर येथे येत असत.

सिंहगड. सिंहगड आपणास मराठेशाहीच्या एका सरदाराच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. इतिहासात विजयी पताका मिरवणारा ‘सिंहगड’ आजच्या दिवशी मात्र आपल्याच लोकांनी बाटवला आहे. रेव्ह पार्ट्या, दारू पिवून दंगा करण्यासाठी आजकाल पुणे परिसरातील मंडळींसाठी सिंहगड पायथा एक प्रकारचा अड्डाच झाला आहे. अश्लील चाळे करण्यासाठीच जाऊन काही हे मुक्त ठिकाण असल्यागत गडावर प्रेमी युगुलं वावरत असतात. याच साठी नरवीर तानाजींनी बलिदान दिले का? याच साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सिंहगड ठेवले होते का? याचा विचार आजकाल खुप कमी लोक करत असावेत. त्यामुळेच सिंहगडावर दुर्गप्रेमी कमी आणि प्रेमी लोक अधिक असतात.
प्रशासनाच्या पुढाकाराने सध्या गडावर व्यवस्था राखली जात आहे. तरी देखील इतिहासातील वास्तवाचा पुरावा असलेल्या सिंहगडचे पावित्र्य, एक नागरिक म्हणून आपण देखील जपणे गरजेचे आहे. गडावर गेल्यानंतर स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या या ऐतिहासिक वारसा स्थळांना आपल्या भावी पिढ्यांसाठी एक आदर्श आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणून वारसारूपाने प्रदान करण्यास हातभार लावू शकतो.


हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 
- नागेश कुलकर्णी 

Friday, May 19, 2017

दुर्ग भ्रमंती - सज्जनगड



|| दास डोंगरी राहतो, 
यात्रा रामाची पाहतो |
देव भक्तासवे जातो, ध्यान रुपे ||

महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांच्या इतिहासात स्वतःच्या विशिष्ठ पाऊल खुणा अस्तित्वात आहेत. मग आजच्या दिवशी त्या किल्ल्यावर काही अवशेष असतील अथवा नसतील, तरीही अनेक किल्ले स्वतःचे पावित्र्य आणि वेगळेपण जपून आहेत. त्यामध्ये सज्जनगडाचा रायगडाच्या बरोबरीने क्रमांक लागतो. समर्थ रामदासांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी जाणून घेत असताना सज्जनगडाचा नामोल्लेख येतोच, त्यामुळे सज्जनगडाचे स्वराज्य स्थापनेत विशेष आणि महत्वपूर्ण योगदान आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील शंभू महादेव या नावाने ओळखली जाणारी एक डोंगररांग सातारा जिल्ह्यात पुर्व दिशेस विस्तृतपणे वाढत जाते. शंभू महादेव डोंगररांगेवरच सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या अगदी जवळ असलेल्या परळी गावाच्या डोंगरराईत हा किल्ला आहे. उरमोडी नदीच्या खोर्‍यात परळीचा किल्ला उभा आहे. सज्जनगड किल्ल्यावर समर्थ रामदासांची समाधी आहे. तसेच समर्थ रामदासांचे याठिकाणी अनेक दिवस वास्तव्य होते.

सज्जन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. कोणत्याही वाटेने गेल्यानंतर पायऱ्या चढून गडावर जावे लागते.

परळी गावामधून : सातारा गावामधून परळी गावामधून गडाकडे जाता येते. परळी गावातील गड पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत.

गजवाडी पासून : सातारा परळी वाटेवर परळीच्या अलीकडेच गजवाडी गाव आहे. तेथून गडावर जाता येते. तेथून पुढे गडावर जाता येते.


सज्जन गडाचा इतिहास :
परळी गावाच्या शेजारी असलेल्या डोंगरावर पूर्वी आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, असे म्हणतात. त्यामुळे या किल्ल्यास अपभ्रंश स्वरुपात ‘अस्वलगड’ असे म्हटले जात असे, स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर असे सांगण्यात आले. सज्जन गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव असल्यामुळे, या किल्ल्यास परळीचा किल्ला असे देखील म्हणतात. सज्जनगडाची उभारणी शिलाहार घराण्यातील भोज राजाने ११ व्या शतकात केली असल्याचे इतिहासकारांकडून सांगण्यात येते. सज्जनगड हा किल्ला बहमनी राजाकडून वारसदार आदिलशाहीकडे वर्ग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो स्वराज्याच्या सेवेत दाखल झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीस मान देवून समर्थ रामदास स्वामी उर्फ नारायण विसाजी ठोसर हे परळीच्या किल्ल्यावर वास्तव्यासाठी आले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे "सज्जनगङ" असे नाव ठेवले, असे इतिहासातून समजते. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याचे पहिले छत्रपती या नात्याने छत्रपती शिवाजीराजे भोसले सज्जनगडावर समर्थ रामदासांच्या भेटीसाठी आले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांनी युवराज संभाजी राजांना समर्थ रामदासांच्या सज्जनगडावरील वास्तव्यात पाठवले होते. दरम्यान युवराज संभाजीराजे भोसले  सज्जनगडावरून पळून गेले होते. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज याचं गुरु शिष्याच नात होत. समर्थ रामदासंकडून मार्गदर्शन घेण्याकरिता शिवाजी महाराज वेळोवेळी सज्जनगडावर जात असत अथवा पत्र व्यवहार करत असत. (यावर वाद असू शकतो, परंतु इतिहासातील नोंदींवरून हे मान्य करावेच लागेल.) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर तसेच प्रतापगडावरून अफजल खानाच्या वधाचा डाव आखत असताना,समर्थ रामदासांच्या अनुयायांनी म्हणजेच ‘रामदासी’नी छत्रपतींसाठी हेरगिरीचे काम केले असल्याची नोंद इतिहासात आढळते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर इ.स. १६८२ मध्ये सज्जनगडावर श्रीरामाचे मंदिर बांधून तेथे राममूर्तींची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थ रामदासांचे निधन झाले. समर्थ रामदासांचे रामदासी, रामदासांच्या निधनानंतर देखील सज्जनगडावर श्रीराम मंदिरात रामदासांच्या समाधीजवळ राहत होते. यावेळी समर्थ रामदासांच्या शिष्या अक्कास्वामी यांनी मठाची व्यवस्था पाहिली होती. त्यानंतर इ.स. १७०० मध्ये फतेउल्ल खानाने सज्जनगडास वेढा देऊन, सज्जनगड मोगलांच्या ताब्यात घेतला. त्यावेळी गडाच्या विशिष्ठ ठिकाणावरून त्याचे ‘नौरसतारा’ असे नामकरण करण्यात आले होते. त्यानंतर मुघलांकडून इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी सज्जनगड पुन्हा मराठेशाहीच्या राजवटीखाली सहभागी करून घेतला. इ.स. १८१८ मध्ये सज्जनगड ब्रिटीशांच्या राजवटीत कंपनी सरकारच्या अधिपत्याखाली आला.

सज्जन गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

समर्थ दर्शन : सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत पोचत असताना, वाटेवर उजव्या बाजूस हनुमानाची उंच मुर्ती नजरेस पडते. गडाच्या पायथ्याजवळ असलेल्या वाहन तळाकडे जात असताना ही मुर्ती दिसते. या मूर्तीच्या परिसरात समर्थ दर्शन येथे, समर्थ रामदासांचा जीवनपट उलगडलेला आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाद्वार : सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत वाहनाने गेल्यानंतर, पायथ्यापासून गडाकडे जात असताना वाटेवर सर्वप्रथम ‘श्री छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ लागते. गडावर जाण्यासाठी मुख्य द्वार असल्यामुळे, दररोज रात्री ९ वाजता नियमाप्रमाणे द्वार बंद करण्यात येते. तसेच सकाळी द्वार उघडण्यात येते. शिवाजी महाद्वार खुप भक्कम आणि उंच आहे.

श्री समर्थ महाद्वार : शिवाजी महाद्वारातून पुढे गेल्यानंतर पुढे दुसरे द्वार लागते, ते म्हणजे ‘श्री समर्थ महाद्वार’ होय. आजही या दोन्ही द्वारांचे मुख्य दरवाजे रात्री ९ नंतर बंद होतात. या दोन्ही मुख्य महाद्वारांच्या तटबंदी भक्कम आहेत. गडाकडे जात असताना वाटेवर समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतीची प्रतिकृती स्वरूपातील छोटी मंदिरे आहेत.

रामघळ : श्री समर्थ महाद्वारातून पायर्‍या चढून गडावर प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस रामघळ आहे. रामघळ समर्थ रामदासांची एकांतात बसण्याची जागा होती.

अंग्लाई देवीचे मंदिर : गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे एक पाटी लावलेली दिसते, अंग्लाई देवी मंदिराकडे. या पाटीपासून पुढे गेल्यानंतर एक छोटे तळे आहे. याच परिसरात अंग्लाई देवीचे मंदिर आहे. अंग्लाई देवीची ही मुर्ती समर्थ रामदासांना डोहात सापडली असल्याची आख्यायिका सांगितली जाते.

पेठेतील मारुती मंदिर : गडावरील मुख्य पेठेत हे मारुती मंदिर आहे. समर्थ रामदास गडावर राहण्यास येण्यापूर्वीपासून हे मंदिर गडावरती आहे.

समर्थ रामदासांचे समाधी मंदिर आणि श्रीराम मंदिर : अंग्लाई देवीच्या मंदिराकडून परत येवून समाधी मंदिराकडे जात असताना वाटेवर संस्थानाचे कार्यालय, श्री समर्थ संस्थान कार्यालय आणि काही छोटी साहित्य भांडार वस्तूंची दुकाने आहेत. मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर विस्तीर्ण आणि भव्य असा सभामंडप आहे. सभामंडप परिसरात मंदिराचा मुख्य गाभारा आहे. सभामंडप परिसरातच समर्थ महाप्रसाद गृह आहे. समोरच श्रीरामाचे मंदिर, समर्थ रामदासांचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थ रामदासांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. श्रीराम मंदिराच्याखाली तळ मजल्यावर समर्थ रामदासांचे समाधी मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूने गेल्यानंतर संस्थानच्या धर्मशाळेकडे जाण्यासाठी वाट आहे. सज्जनगडावरील धर्मशाळेत निशुल्क राहण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच मंदिर परिसरातील प्रसादालयात निशुल्क भोजन देखील करता येते.
सज्जनगडावर परिसरात कल्याण स्वामी यांचे स्मारक आहे. तसेच समर्थ रामदासांच्या शिष्या वेण्णा बाई आणि अक्काबाई स्वामी यांचे देखील समाधी वृंदावन मंदिर आहे. ब्रह्मपिसा स्मारक आहे. एकूणच काय तर सज्जनगड परिसर सध्या केवळ समर्थमय आहे.

धाब्याचा मारुती मंदिर : सज्जनगडाच्या पश्चिम तटबंदीजवळ समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. असे सांगण्यात येते की, गडाच्या या पश्चिम बाजूस छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांची भेट होत असे. धाब्याच्या मारुतीपासून ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता दिसतो.
सज्जनगड परिसरात आल्यानंतर साताऱ्याहून ठोसेघर धबधबा, अजिंक्यतारा किल्ला आणि कास पठार ही ठिकाणे देखील जवळ आहेत. पर्यटक सज्जनगडावर आल्यानंतर यासर्व ठिकाणी जावून येवू शकतात.
आजच्या दिवशी सज्जनगडावर पडलेल्या अवस्थेतील तटबंदी आहेत आणि गड म्हणून काही भग्न अवस्थेतील अवशेष आहेत. परंतु समर्थ रामदास स्वामींच्या समाधी स्थळामुळे सज्जनगडास विशेष श्रद्धास्थान प्राप्त झाले आहे. रामदासी आणि समर्थ रामदासांना श्रद्धास्थान मानणारे भाविक गडावर नियमित येत असतात. तसेच राम नवमीला गडावर उत्सव असतो. त्यामुळे समर्थांच्या या भूमीवर आपण पर्यटक म्हणून अथवा भाविक म्हणून गेल्यानंतर गडाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 

-    नागेश कुलकर्णी

Monday, May 1, 2017

दुर्ग भ्रमंती - परम प्रतापी पुरंदर

ज्याप्रमाणे प्रतापगडाने पराक्रमी इतिहास अनुभवलेला आहे, त्याचप्रमाणे पुरंदरनेदेखील मोरारबाजी देशपांडे यांचा पराक्रम पाहिलेला आहे. पुणे परिसरातील इतर किल्ल्यांच्या दृष्टीने पुरंदरचा इतिहास खुप महत्वाचा आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. तसेच पेशवे कालीन इतिहासात देखील पुरंदरावर पेशव्यांचे विशेष वर्चस्व होते. त्यामुळेच इतिहासात पुणे आणि कोकणच्या वाटेवर असलेल्या पुरंदर किल्ल्याला इतिहासात विशेष महत्व होते. पुरंदरपासून जेजुरी गड जवळ आहे.

 
पोवाडे गाणारे शाहीर आणि इतिहासकार, पुरंदरचे वर्णन करत असताना म्हणतात,
 
अल्याड जेजुरी,

पल्याड सोनोरी |

मध्ये वाहते कऱ्हा,

पुरंदर शोभतो शिवशाहीचा तुरा ||
 
पुरंदर किल्ला बांधण्यात आलेल्या डोंगराचे नाव ‘इंद्रनील पर्वत’ असे होते. त्यामुळे पुरंदर म्हणजे इंद्र, याप्रमाणे किल्ल्यास पुरंदर हे नाव देण्यात आले असावे असा कयास आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. नारायणपूरमध्ये यादवकालीन महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. त्यामुळे हा किल्ला साधारण १००० ते १२०० वर्षांपूर्वी बांधण्यात आला असावा असे इतिहासकार सांगतात.

पुण्याहून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी सासवडला आल्यानंतर नारायणपूरकडे जाणाऱ्या एस.टी.बसने आपण किल्ल्यापर्यंत पोहचू शकतो. तसेच स्वतःचे वाहन घेवून गेल्यानंतर याच मार्गाने पुरंदरच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते. सासवड हे पुणे जिल्ह्यातील पुणे जेजुरी रस्त्यावरील तालुक्याचे ठिकाण आहे.
 
 
पुरंदरचा इतिहास :
एका आख्यायिकेनुसार द्रोणगिरी पर्वत उचलून नेत असताना, हनुमानाकडून पर्वताचा काही भाग या परिसरात खाली पडला होता, तोच हा डोंगर. पुढे यास ‘इंद्रनील पर्वत’ असे देखील म्हटले गेले.

पुरंदर किल्ल्याबाबतच्या इतिहासातील नोंदीनुसार बहामनी राजवटीमध्ये हा किल्ला चंद्र संपत देशपांडे यांच्या ताब्यात होता. त्यांनी पुरंदर किल्ल्यावर पुर्ननिर्माणास प्रारंभ केला. त्यानंतर इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीमधील अनेक किल्ले स्वराज्याला जोडून घेतले होते. म्हणूनच शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढण्यास पाठवले होते. तेंव्हा पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज देवून, लढाई जिंकली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना गडाचा कारभारी म्हणून नेमले.

इतिहासातील महत्वाची घटना या पुरंदरच्या पायथ्याशीच घडलेली आहे. ती घटना म्हणजे पुरंदरचा तह. दिलेर खान आणि मिर्झाराजे जयसिंग, औरंगजेबाच्या सांगण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि दख्खन प्रांतातील त्यांच्या कारवाया थांबवण्यासाठी शिवाजी राजांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याच्या हेतूने, दख्खन प्रांतात दाखल झाले होते. त्यावेळी छत्रपतींचे मावळे आणि खानच्या शिबंदीमध्ये पुरंदरजवळ लढाई झाली होती. दिलेर खानाने लढाईच्या शेवटच्या टप्प्यात वज्रगड ताब्यात घेवून पुरंदरावर हल्ला केला, त्यावेळी पुरंदरच्या माचीवर दिलेर खानाची आणि मुरार बाजींची लढाई झाली होती. लढाईमध्ये शेवटपर्यंत लढा दिल्यानंतर मुरारबाजी धारातीर्थी पडले आणि पुरंदरही पडला. पुरंदर किल्ला पडल्याचे समजताच छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले. त्यानंतर ११ जून १६६५ रोजी झालेला ’पुरंदरचा तह’ इतिहासात प्रसिद्ध आहे. पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी पुणे परिसरातील २३ किल्ले मोघल साम्राज्यास दिले होते. पुरंदरचा तह जरी झालेला असला, तरीही पुरंदर परिसराने मुरार बाजींचा परम प्रताप पाहिलेला होता, त्यामुळे या पुरंदर किल्ल्यास ‘परम प्रतापी पुरंदर’ अशी उपाधी नकळतपणे मिळते.

त्यानंतर मराठेशाहीतील सरदार निळोपंत मुजुमदार यांनी किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी पुरंदर ताब्यात घेवून त्याचे नाव ’आजमगड’ ठेवले होते. त्यानंतरच्या लढाईमध्ये मराठेशाहीतील सरदाराने पुरंदर परत स्वराज्यात आणला, त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी किल्ला पेशव्यांच्या स्वाधीन केला. पुण्याच्या आधी पुरंदर किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. दरम्यान पेशवाईतील श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांचा जन्म पुरंदरावर झाला. त्यानंतर इंग्रजांनी इ.स. १८१८ मध्ये पेशवाईच्या पडावानंतर पुरंदर ताब्यात घेतला.
 
पुरंदर किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. सह्याद्री पर्वताच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही डोंगररांगा पुर्व दिशेस विस्तृतपणे वाढत जातात, त्यापैकी एका डोंगर रांगेवर सिंहगड आहे. त्याच्याच पुढे भुलेश्वरजवळ, याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड किल्ले आहेत. कात्रजचा घाट, बापदेव घाट, दिवेघाट चढून गेल्यानंतर पुरंदरच्या पायथ्याशी पोहचता येते.

पुरंदरच्या पायथ्यापासून मुरारगेटने किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर समोर "पद्मावती तळे" दिसते. त्याच्या पुढे इंग्रजांच्या काळात बांधलेले एक चर्च आहे. चर्चपासून पुढे गेल्यानंतर "वीर मुरार बाजींचा” पुतळा आहे.
 
बिनी दरवाजा : बिनी दरवाज्यामधून किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर “वीर मुरारबाजीं” चा पुतळा दिसतो. किल्ल्याच्या उत्तर दिशेस असलेल्या माचीवरील हा एकमेव दरवाजा आहे. बिनीच्या दरवाज्यातून पुढे गडाकडे थोडे पुढे गेल्यानंतर ‘पुरंदरेश्वर’ मंदिर आहे.
 
पुरंदरेश्वर मंदिर : हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले महादेवाचे पुरंदेश्वर मंदिर, गडावरील मुख्य स्थान आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिरात देवेंद्र इंद्र देवाची मूर्ती आहे. पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील बाजूस पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. पुरंदेश्वर मंदिराबाहेर एक विहिर आहे, या विहिरीस "मसणी विहीर" असे म्हणतात.
 
राजाळे तलाव आणि भैरवखिंड : पुरंदरेश्वर मंदिरापासून पुढे चालत गेल्यानंतर उत्तर माचीच्या टोकावर राजाळे तलाव आहे. राजाळे तलावाच्या पुढे पुरंदर आणि वज्रगड यांच्यामध्ये भैरवखिंड आहे. भैरव खिंडीतून वज्रगडाकडे जाण्यासाठी वाट आहे.
 
पेशव्यांचा वाडा : पुरंदेश्वर मंदिराच्या एका बाजूस पेशव्यांच्या दुमजली वाड्याचे भग्न अवशेष दिसतात. पेशवाईच्या सुरुवातीस बाळाजी विश्वनाथ यांनी हा वाडा बांधून घेतला होता. या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते.
 
दिल्ली दरवाजा : पुरंदर किल्ल्याच्या उत्तर दिशेस हा दरवाजा आहे. दरवाज्यावर हनुमानाची मुर्ती आहे. दिल्ली दरवाज्यातून आत गेल्यानंतर "गणेश दरवाजा" आहे. गणेश दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर "बावटा बुरुज" आहे. पूर्वी येथे ध्वज लावला जात असे.
 
कंदकडा : गणेश दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर समोर पूर्व दिशेस पसरलेला कंद कडा नजरेस पडतो. या कड्याच्या शेवटी कंदकडा बुरूज आहे. कंदकडा पाहून परत गणेश दरवाज्याजवळ आल्यानंतर शेंदर्‍या बुरुजाकडे जाता येते.
 
शेंदर्‍या बुरूज : हा बुरुज पद्मावती तळ्याच्यामागे आहे. स्थानिकांकडून सांगण्यात येते की, शेंदर्‍या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत होता, तेव्हा गडावरील उपस्थित सोननाक यांनी त्यांचा मुलगा आणि सून यांचा बळी देवून बुरूज उभा केला होता.
 
केदारेश्वर मंदिर : पुरंदरचे मूळ दैवत असलेल्या केदारेश्वर मंदिरात जाण्यासाठी दगडी जीना बांधलेला आहे. तसेच या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीला भाविक केदारेश्वराच्या दर्शनासाठी आजही येत असतात. केदारेश्वराचे मंदिर पुरंदर किल्ल्यावरील सर्वात उंचावरील ठिकाण आहे. मंदिर परिसरातून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहीडा, मल्हारगड हे किल्ले दिसतात. केदारेश्वर मंदिराजवळच केदारगंगेचा उगम होतो.

आजच्या परिस्थितीत पुरंदर किल्ला आणि वज्रगड भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सुरेक्षेच्या कारणास्तव पुरंदर किल्ला बंदच असतो. आणि वज्रगड किल्ल्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. भारतीय सैन्याकडून पुरंदर किल्ल्यावरील कंदकडा, केदार दरवाजा आणि बावची माची सुरक्षेच्या कारणास्तव तारांचे कुंपण घालून बंद करण्यात आली आहेत. तसेच भैरवखिंड आणि वज्रगड परिसरात जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.

मुरार बाजींच्या परम प्रतापाची साक्ष देणारा पुरंदर आज भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे गडावर सुरक्षा व्यवस्था अधिक असते. परंतु इतिहासातील लढायांची आठवण करून देणारा हा किल्ला पाहिल्यानंतर मराठेशाहीचा सार्थ अभिमान वाटतो.

हा लेख महा तरुण भारत साठी लिहिलेला आहे .

नागेश कुलकर्णी