Friday, March 29, 2019

भाजपचे उतार वयातील लोहपुरुष

राजकारणात कोणी कोणाचा नातेवाईक नसतो अथवा कोणी कोणाचा मित्र नसतो. राजकारणात स्वतःची प्रतिमा स्वतःच तयार करावी लागते. ती टिकवावी लागते, अन्यथा त्यास ग्रहण लागते. राजकारण करत असताना, जसे राजकारण केव्हा सुरु करावे याचे भान असले पाहिजे तसेच राजकीय कारकीर्दीस कुठे पूर्ण विराम द्यावा याचे देखील भान असणे गरजेचे आहे.

देशातील मागच्या चार पिढयांसाठी लालकृष्ण अडवाणी हे नाव माहितीचे आहे. भाजपच्या स्थापनेपासून ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान पदापर्यंत अडवाणी हे भाजप व अटलजींसोबत होते. पक्षाच्या चढ उताराच्या काळात अगदी सक्षमपणे उभे होते, त्यामुळेच त्यांना भाजपचे लोहपुरुष असे म्हटले जाते. परंतु २००९ साली भाजपकडून अडवाणी पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता, तसेच सर्वच स्तरावर भाजपची पिछेहाट होत होती. अशावेळी पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी देवून त्यांनी माघार घेणे अपेक्षित होते. परंतु असे न होता, त्यांनी गांधीनगरमधून २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली, तसेच मोदींच्या उमेदवारीत आडकाठी आणण्याचा छोटासा देखील करून पाहिला.

स्वातंत्र्यपूर्व काळात कराचीत जन्मलेले आणि देशाच्या फाळणीनंतर दिल्लीत येऊन आपल्या राजकारणाचा आरंभ करणारे अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अल्पकाळातच जनसंघाचे सक्षम व विश्वासू नेते बनले होते. त्यावेळी दीनदयाल उपाध्याय यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या बरोबरीने त्यांनी स्वतःची व पक्षाची नवी ओळख बनवली. पक्ष संघटनेत कार्यरत असलेल्या अडवाणींनी दिल्ली नगरपरिषदेत नगरसेवक आणि त्यानंतर नगराध्यक्ष असा प्रवास करत स्वतःची राजकीय कारकिर्द सुरु केली होती.  त्यामुळे दिल्लीमध्ये पक्ष वाढविण्यात अडवाणींचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच १९७० मध्ये पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठविले होते. जनसंघातील एक नवे नेतृत्व म्हणून उदयास आलेल्या अडवाणींकडे, आणीबाणीनंतर आलेल्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये माहिती आणि नभोवाणी मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. भाजपच्या स्थापनेनंतर अडवाणी त्या पक्षाचा एक प्रमुख चेहरा बनले.

१९८५ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे केवळ दोन खासदार लोकसभेत निवडून आले होते. त्यानंतरच्या काळात अडवाणींच्या राजकीय कौशल्याच्या बळावर भाजपाला लोकसभेत महत्त्वाचे स्थान मिळू शकले आणि शेवटी काँग्रेस आणि भाजपा हेच दोन महत्त्वाचे पक्ष राष्ट्रीय स्तरावर एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून कार्यरत झाले. अडवाणींनी १९९० च्या दशकात काढलेल्या रथयात्रेमुळे भाजप थेट ग्रामीण भागात व देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता. त्यामुळे पक्ष वाढीस गती आली होती, तसेच पक्षाने एक नवी ओळख निर्माण केली होती.

९० च्या दशकात खऱ्या अर्थाने अटलबिहारी वाजपेयी आणि अडवाणी हे दोघे भाजपचे देशव्यापी चेहरे बनले. त्यावेळी अडवाणींनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर अधिक भर दिला, तर अटलजींनी नेतृत्व कौशल्याची चुणूक दाखवत, देशात प्रथमच काँग्रेसेत्तर पक्षाचा व्यक्ती म्हणून पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यामध्ये अडवाणींची भूमिका महत्त्वाची होती. भाजपच्या राजकारणाला त्यांनीच आक्रमक हिंदुत्वाची जोड दिली. वाजपेयी भाजपचा सोज्ज्वळ व सर्वसमावेशक चेहरा बनले, तर अडवाणी यांनी जाणीवपूर्वक कठोर मुखवटा धारण केला. अटलजी पंतप्रधान असताना गृहमंत्री व उपपंतप्रधान पदाची धुरा सांभाळणारे अडवाणी २००४ साली मात्र पक्षाचा चेहरा बनले होते.

भाजपने २००४ ची लोकसभेची निवडणूक अडवाणींच्या नावावर लढवली. परंतु या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. तरी सुद्धा पक्षातील अडवाणींबद्दलची सहानुभूती टिकून होती, अटलजींच्या राजकारणातील निवृत्तीनंतर अडवाणी पक्षातील सर्वात ज्येष्ठ मार्गदर्शक बनले. त्यानंतर पक्षाचे अध्यक्षपद अडवाणींकडून नितीन गडकरी यांच्याकडे आले. खरेतर याचवेळी अडवाणी पक्षाच्या मार्गदर्शक मंडळींच्या यादीत सर्वोच्च स्थानी जाऊन बसले होते. परंतु २००९ ची लोकसभा लढवण्याचा हट्ट त्यांनी सोडला नाही आणि शेवटी पक्षाच्या पराभव झाला, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते पद सुषमा स्वराज यांच्याकडे आले. 

हे सर्व सांगण्याचा अट्टाहास याचसाठी की, क्षेत्र कोणतेही असो प्रत्येकाने वेळीच निवृत्त होणे आणि स्वतःचे निवृत्तीचे वय ओळखणे आवश्यक असते. राजकारणात काही पदे अशी असतात की, ती एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर हुलकावणी देतात तर काहींना अनावधानाने मिळतात. यामध्ये २००४ साली पंतप्रधान झालेल्या मनमोहन सिंह यांचे नाव घ्यावे लागेल, ते अपघाताने पंतप्रधानपदी विराजमान झाले, तर १९९१ पासून गुढग्याला बाशिंग बांधून बसलेले शरद पवार २०१९ च्या निवडणुकीत देखील पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहात आहेत. त्यामुळे दिल्ली नगरपरिषदेतील नगरसेवक ते देशाचे उपपंप्रधान असा प्रवास केलेल्या भाजपच्या उतार वयातील या लोह पुरुषाने वयाच्या ९१ व्या वर्षी तरी थांबणे आवश्यक होते.

No comments:

Post a Comment