Monday, March 4, 2019

जूने मित्र नवे मित्र !


लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आपल्या दुरावलेल्या मित्रांना जवळ करण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर काही नवीन मित्र जोडणीच्या दिशेने देखील प्रयत्न केले जात आहेत. याचाच परिपाक म्हणून तामिळनाडूतील सत्ताधारी असलेला ए.आय.ए.डी.एम.के पक्ष एनडीए सोबत आला आहे. परिणामस्वरूप एनडीएचे बळ वाढणार आहे. भाजपसोबत एनडीए मधील घटक पक्ष असलेल्या जून्या मित्रांबरोबर नवीन मित्र जोडले जाणार आहेत.

नुकतेच महाराष्ट्रामध्ये चार वर्षांच्या ‘तू तू मैं मैं’ नंतर भाजप आणि शिवसेनेची युती झाली. आपल्या नाराज मित्राला शांत करण्यासाठी भाजपने काहीसा कमीपणा स्वीकारला तर शिवसेनेने देखील भाजपचे नेतृत्व सक्षम असल्याच्या गोष्टी बोलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात भाजप किंवा सेना एकटी राहिली असती, तर दोन्ही पक्षांचे नुकसान झाले असते. शिवसेना पक्षास बहुदा अस्तित्वाची लढाई लढावी लागली असती. त्यामुळेच सेनेने मागील चार वर्षात भाजपवर आरोप प्रत्यारोप करत शेवटी युतीचा निर्णय घेतलेला असावा.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये ८० पैकी ७१ जागांवर विजय मिळवला होता. तसेच इतर २ जागा भाजपच्या सहकारी असलेल्या मित्रपक्ष अपना दलने जिंकल्या होत्या. तसेच भाजपने (एनडीएने) गुजरात व राजस्थानसह सात राज्यांमध्ये सर्व जागा जिंकल्या होत्या. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे. २०१४ साली एनडीए विरोधी पक्षात होता, यावेळी सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे केलेली कामे घेऊन मतदान मागण्यासाठी जावे लागणार आहे.

आंध्र प्रदेशमध्ये काही वयक्तिक मुद्द्यांवर चंद्रबाबू एनडीए मधून बाहेर पडले असले तरी त्यांच्याबाबत आंध्रच्या जनतेमध्ये असलेल्या नाराजीमुळे भाजपला अधिक फायदा होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच भाजपची पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाशी युती आहे. शिवसेनेनंतर भाजपचा हा सर्वात जुना मित्र पक्ष आहे. पंजाबमध्ये भाजप अकाली दल युती सत्तेत नसली तरी देखील केंद्रातील एनडीए सरकारने केलेल्या कामांच्या बळावर २०१४ च्या तुलनेत भाजप चांगली कामगिरी करू शकतो अशी अपेक्षा आहे.

पश्चिम बंगालसह केरळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून भाजपने स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणूकांमध्ये  तृणमूल कॉंग्रेसनंतर सर्वात मोठा दुसरा पक्ष म्हणून भाजप नावारूपास आलेला आहे. त्यामुळेच तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी यांचा भाजपवर जळफळाट होत आहे. शारदा चिटफंड प्रकरण आणि कोलकत्ता पोलीस कमिशनर प्रकरण यामुळे बंगालमधील कार्यकर्त्यांच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. तिकडे बिहारमध्ये नितीश कुमार व राम विलास पासवान यांच्या पक्षांशी केलेली युती भक्कम दिसत असली तरी त्यांच्यामध्ये देखील जागा वाटपावरून काही रुसवे फुगवे असल्याच्या बातम्या वर्तमान पात्रातून झळकल्या होत्या.

भाजपला २०१४ च्या निकालांची पुनरावृत्ती करायची असेल तर जुन्या मित्रांना जपत, नव्याने मित्र जोडणे देखील आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत झालेली युती भाजपसाठी दिलासादायक ठरणारी आहे. भाजपने नवे मित्र जोडत असताना नव्या राज्यांकडे आपला अश्वमेध वळवलेला दिसून येतो. त्यादृष्टीने भाजपने तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक आणि पीएमकेशी केलेली युती महत्त्वाची आहे. तेथे लोकसभेच्या ३९ जागा आहेत. भाजप मित्रांना सोबत घेऊन जाऊ इच्छितो, एवढा संदेश त्यातून निश्चितच जातो.

जूने नवे मित्र जपत असताना व निवडणूकांना सामोरे जात असताना भाजपला आणखी काही विषयांवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. शिवसेनेशी युती केली तरी गेल्या पाच वर्षांत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली कटुता कशी दूर करणार? उत्तर प्रदेशातील भारतीय समाज पार्टीचे (एसबीएसपी) प्रमुख असून ओमप्रकाश सुहेलदेव यांनी भाजपशी युती संपुष्टात आणली आहे. तमिळनाडूत पळनीस्वामी सरकारची कामगिरी यथातथाच आहे, त्यामुळे या युतीचा कितपत फायदा होईल, याबाबत विचार करणे आवश्यक आहे. आसाममध्ये आसाम गण परिषदेने नागरिकत्व कायद्यावरून युती तोडण्याचा इशारा दिला. पूर्वोत्तर राज्यातील इतर सहयोगी पक्षांची स्थिती देखील अशीच आहे. जर कदाचित आंध्र प्रदेशमध्ये वाय एस आर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांच्याशी युती केली तर त्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत काय करणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे २०१४ च्या तुलनेत विरोधकांसह मित्र पक्षांच्या तू तू मैं मैं च्या निमित्ताने नव्या समस्या भाजपसमोर उभ्या राहिलेल्या आहेत. याकडे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदी कसे पाहतात व या नव्या जून्या मित्र पक्षांची बोळवण कश्या पद्धतीने करतात हे येणारा काळ आणि लोकसभेच्या निवडणुकाच ठरवणार आहेत.

No comments:

Post a Comment