Thursday, April 4, 2019

नवं मतदारांच्या हाती आहे देशाचे भविष्य !


२१ व्‍या शतकातील जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्‍ट्र म्‍हणून भारताची ओळख आहे. त्यामुळे भारत देशाच्या भविष्यातील वाटचालीकडे तसेच भारतात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे. यावेळी इस २००० सालानंतर जन्म घेतलेल्या मुला मुलींना पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावत येणार आहे. तसे पाहता हा एक ऐतिहासकि क्षण आहे, कारण ऐकविसाव्या शतकात जन्म घेतलेल्या भारतीय युवकांना आपल्या देशाचे नेतृत्व कोणी करावे, हे ठरवण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे, त्यामुळे या नवं मतदारांनी २१ व्या शतकातील भारताच्या भविष्यासाठी मतदान करण्याचा आपला हक्क बजावणे गरजेचे आहे.

भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर वय वर्षे २१ पूर्ण करणाऱ्या नागरिकास निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात आले होते, परंतु त्यावेळची देशाची परिस्थिती पाहता आणि सामान्य जनांचा लोकशाही प्रक्रियेबद्दलचा उत्साह पाहता, त्यावेळी नव्याने मतदान करणाऱ्या युवकांची संख्या अगदी कमीच होती. परंतु कालांतराने राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये मतदान करणाऱ्या व्यक्तीचे वय २१ वरून १८ वर्षे, एवढे कमी केल्यानंतर खऱ्या अर्थाने नवं मतदारांचा, मतदान करण्याकडे उत्साह वाढू लागला. त्याचाच परिणाम म्हणून २०१४ सालीची लोकसभा निवडणूक म्हणजे एक ऐतिहासिक टप्पा पार करणारी निवडणूक ठरली होती. कारण १९८४ नंतर प्रथमच एखाद्या पक्षास लोकसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले होते. यामध्ये नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या युवकांची भूमिका खूप महत्त्वाची होती.

स्पष्ट बहुमत असलेले, एक स्थिर सरकार किती वेगाने आणि सक्षमपणे निर्णय घेऊ शकते, हे आपण २०१४ ते २०१९ च्या दरम्यान पाहिलेले आहे. असेच १९८४ ते १९८९ च्या दरम्यान घडलेले होते. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकांमध्ये देखील देशामध्ये स्थिर सरकार येण्याच्या दृष्टीने नवं मतदारांचा कौल अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, तसेच यावर २१ व्या शतकातील भारताच्या भविष्याची पायाभरणी देखील केली जाणार आहे.

२०१४ सालीच्या लोकसभा निवडणुकांवेळी अंदाजे २.३१ कोटी युवक हे वय वर्षे १८ ते १९ वयोगटातील होते (ही आकडेवारी एकूण मतदारांच्या २.७ टक्के एवढी होती). यापैकी ३९ टक्के नवं मतदारांनी आजच्या सत्ताधारी पक्षास मतदान केले असल्याचा अंदाज आहे. यावेळी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांवेळी १८ ते १९ वर्षे वयोगटातील नवं मतदारांची संख्या १.५ कोटींच्या घरात आहे. यावेळी नव्या भारतातील हे नवं मतदार भारताचे भविष्य ठरवणार आहेत.

राजकीय पक्षांनी नवं मतदारांसाठी स्वतः मध्ये करावयाचे बदल...
  • देशातील सर्व राजकीय पक्षांना केवळ राजकारण न करता नवं मतदारांसाठी काही नवीन मुद्दे आणावे लागणार आहेत. कारण हा मतदार पारंपरिक राजकारणापासून दूर राहून काही तरी वेगळे करणाऱ्या राजकीय पक्षांना पसंत करतो आहे.
  • नव मतदार निर्णायक स्थितीत आल्याने तसेच देशाच्या हिताचे निर्णय घेण्यास आपण सक्षम आहोत, याची जाण नवं मतदारांमध्ये जागृत झाल्यामुळे तेच ते राजकारण न करता, या नव्या पिढीस नव्याने सामोरे जाण्याचे आवाहन राजकीय पक्षांच्या समोर असणार आहे.
  • सर्व राजकीय पक्षांना नव मतदार डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पक्षांचे घोषणापत्र आणि योजना तयार कराव्या लागणार आहेत. केवळ भूलथापा देऊन चालणार नाही.
त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये युवकांच्या हाती सत्तेची चावी असणार आहे, असे म्हटले तर वेगळे वाटायला नको, कारण आजच्या भारत देशातील युवा जागृत होत आहे. देशाने जागतिक पातळीवर सर्व क्षेत्रात प्रगती करावी यासाठी हातभार लावणारा भारतातील युवा वर्ग देखील, यावेळी देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी भरघोस मतदान करून सरकार निवडेल अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment