नुकतेच राहुल गांधी
यांनी त्यांच्या प्रचाराच्या दौऱ्यादरम्यान अतिशय नाट्यमयरितीने एका जखमी पत्रकारास
मदत केली, त्याच्या कपाळावरील घाम वगैरे पुसला, त्याला दवाखान्यात नेले, असे भासवण्याचा
आले होते, त्यानिमित्ताने राहुल गांधी यांच्या छोट्या छोट्या राजकीय नाट्यांवर भाष्य
करणारा हा लेख…
राहुल. राहुल या नावाचा
विविध भाषांमध्ये आणि विविध धर्मांमध्ये वेगवेगळा अर्थ आहे. उप निषदांमध्ये राहुल म्हणजे
सर्व प्रजेची दुःखे नष्ट करणारा, बौद्ध धर्मामध्ये राहुल म्हणजे बंधन (Bondage), तर
अरेबिकमध्ये याचा अर्थ होतो भटकंती करणारा प्रवासी. परंतु काँग्रेसचे अध्यक्ष व काँग्रेस
कार्यकर्त्यांच्या मनातील भावी पंतप्रधान राहुल गांधी यांच्या नावाचा अर्थ काय निघतो,
हे त्यांनाच माहीत असावे. बहुधा अरेबिक शब्दावरून त्यांनी अर्थ काढलेला असावा. उप निषदांमधील
अर्थ त्यांना मान्य नसणार, कारण काँग्रेस हा धर्मनिरपेक्षितांचा पक्ष आहे. त्यामुळे
कदाचित अरेबिक अर्थ मान्य असेल.
२०१४ साली मोदी सरकार
सत्तेत आल्यानंतर काँग्रेस पक्षात एक प्रकारची मरगळ आली होती. जणु काही सारे संपलेच,
अशा प्रकारे काँग्रेसने गाशा गुंडाळला होता. परंतु संसदेच्या एका कोपर्यात बसलेला
हा सर्वांत मोठा विरोधी पक्ष मागील एक वर्षापासून लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अचानकपणे
जागा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट देऊन देखील, राहुल गांधी राफेल कराराचे
राजकारण करत फिरत आहेत. २०१४ पूर्वीच्या निवडणुका या मूलभूत सुविधांच्या (रस्ते, वीज,
घरे) मुद्द्यांवर लढल्या जात होत्या, परंतु यावेळी हा मुद्दाच अस्त्वित्वात नसल्यामुळे,
राहुल गांधी यांना स्वतःचे राजकीय अस्त्वित्व टिकवण्यासाठी राफेलच्या मुद्द्याची ढाल
पुढे करावी लागत आहे.
भविष्यात पंतप्रधानपदाची
स्वप्ने पाहणारी व्यक्ती म्हणून ओळख असलेले राहुल गांधी काही दिवसांपूर्वी ५६ दिवसांसाठी
अचानकपणे गायब झाले होते. सुट्टीवरून परत आल्यानंतर ते धडाक्यात कामाला लागले. जनतेचे
दुःख हे त्यांना त्यांचे दुःख वाटू लागले. शेतकर्यांच्या घरी जाऊन राहणे, गावोगाव
पदयात्रा काढणे, याचा धडाका त्यांनी लावला. हे केवळ ५६ दिवसांच्या अज्ञातवासाने घडले?
त्यावेळी कोणी म्हणे त्यांनी विपश्यना केली. तर कोणी म्हणत होते की थायलंडवारी करून
आले. परंतु हे सर्व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरु करण्यात आले होते. यामध्ये
प्रियांका गांधी वढेरा यादेखील भावाच्या मदतीला धावून आलेल्या आहेत.
१९७७ साली सत्तांतर
झाल्यानंतर इंदिराजींनी परत सत्ता हस्तगत करण्यासाठी देश भ्रमंतीचा जो सपाटा लावला
होता, त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल ठेवत संसदेत एकेकाळी झोपा काढणारे राहुल गांधी
आज राज्या-राज्यांमधून फिरत आहेत. हा त्यांचा स्वतःचा विचार नक्कीच नसावा. यामागे काँग्रेसजनांना
त्यांचे पुढील राजकीय भविष्य शोधायचे आहे, आणि त्यासाठी त्यांना सध्या गांधी घराण्याशिवाय
पर्याय नाही. यामुळेच मार्च-एप्रिलच्या या तळपत्या उन्हामध्ये देखील काँग्रेसजन आपल्या
अभिषिक्त युवराजांसह गावोगावी, दारोदारी भटकत आहेत. उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान,
मध्यप्रदेश या राज्यांसह देशभर फिरत आहेत.
काही दिवसांपूर्वी
पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश यात्रेवरून परत आल्यानंतर, राहुल यांनी त्यांना सल्ला
दिला की, आलाच आहात, तर देशातील शेतकर्यांना भेटून या! हे केवळ हास्यास्पद आणि नाटकीय
विधान होते! पंतप्रधान देशाचा प्रतिनिधी म्हणून परदेशात गेले होते, यांच्यासारखी सुट्टीतील
मजा अनुभवायला नव्हे. तसेच काही दिवसांपूर्वी राहुल यांचे राजकीय डावपेच त्यांच्या
सहकार्यांसोबत त्यांना केदारनाथाच्या दर्शनास देखील घेऊन गेले होते. परंतु परत आल्यानंतर
केदारनाथला काय पाहिलं या प्रश्नाचं उत्तर देखील त्यांना देता आलं नाही. मात्र अशावेळी
प्रसारमाध्यमे अगदी खंबीरपणे राहुल यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गाताना दिसून आले. त्यानंतर
त्यांनी राज्यांमधील निवडणुकांच्या काळात रेल्वेमधून प्रवास करत पंजाब गाठले होते.
तेथील शेतकरी (काँग्रेसचे काही नेते) मंडळींशी संवाद साधला होता आणि परत संसदेत येऊन,
पंजाबातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था अशी माहिती दिली होती. राहुल यांनी संसदेसमोर मांडलेली
माहिती अर्धवट असल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी पंजाबातील अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत
कौर यांनी त्यांचे पितळ उघडे पाडले होते.
सध्या सत्तेत असलेल्या
भाजप सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी कसा का असेना, परंतु एखाद्या सक्षम विरोधकाची गरज होती.
कारण एक सक्षम विरोधी पक्ष असल्याशिवाय लोकशाहीला स्थिरता येत नाही. परंतु अधिवेशन
सुरु असताना लोकसभेमध्ये पंतप्रधानांना मिठी मारल्यानंतर डोळे मिचकावणारे राहुल गांधी,
एक सक्षम विरोधक म्हणून सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आणि आता हेच राहुल गांधी, भारताने
स्पेसमध्ये उपग्रह पाडण्याची ऐतिहासिक किमया केल्याची माहिती देणाऱ्या पंतप्रधानांना
जागतिक रंगमंच दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्ये काहीही केल्यानंतर डोळे मिचकावणारे
राहुल गांधी राजकीय रंगमंचावरील खरे कलाकार आहेत.
मागील पाच वर्षातील
राहुल यांच्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील. ज्या केवळ राजकारण करण्यासाठीच करण्यात
आलेल्या होत्या. सत्तेसमोर शहाणपण चालत नाही आणि सत्ता गेल्याशिवाय शहाणपण येत नाही.
या दोन्ही बाजू राहुल यांच्या, राजकीय राहुलगिरीमुळे पुढे येत आहेत. कारण सत्तेवर असलेल्या
एखाद्या राजकीय पक्षास प्रबळ विरोधक नसेल, तर लोकशाहीमध्ये देखील सत्तेवर असणारे सत्ता
डोक्यात गेल्यासारखे वागू लागतात आणि नाही नाही म्हणता, पहिले पाढे पंचावन्न होऊन बसतात.
तसे पाहता काँग्रेस
जनांना राहुल गांधींशिवाय पर्याय नाही. सत्ताधारी पक्ष त्यांच्याबाबत काहीही बोलत असला
तरी, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर डगमगून न जाता राहुल गांधींनी त्यांच्या पक्षातील
जेष्ठांचा सल्ला घेत (कसा का असेना) पक्ष बांधणी करून, एक प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका
तरी पार पाडणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारवर देखील काहीसा अंकुश राहील आणि अभिषिक्त
युवराजांची भविष्यातील स्वप्ने देखील पूर्ण होतील. यासाठी त्यांना बरेचसे परिश्रम करावे
लागणार आहेत, हे मात्र नक्की. यामध्ये प्रियांका गांधी वढेरा यांची त्यांना मोलाची
साथ लाभू शकते.
No comments:
Post a Comment