Sunday, November 18, 2018

बाल मनाची 'नाळ'

काही गुपितं न कळलेलीच बरी असतात... 
ती गुपितं समजली की त्याचा बाल मनावर काय परिणाम होवू शकतो याचा वयस्क व्यक्ति म्हणून आपण विचार करणे आवश्यक आहे.
आज नाळ चित्रपट पाहिला. उत्तमरित्या दिग्दर्शित आणि ग्रामीण भागातील एक कथा डोळ्यासमोर उभी करणारा हा चित्रपट आहे.
चैत्याने म्हणजेच श्रीनिवासने अगदी भूमिकेस साजेसा अभिनय केला आहे.

ग्रामीण भाग, त्यातील बालपण... चित्रपटातील नदी, घरांची बांधणी, खेळाचे प्रकार, मित्र आणि एकूण वातावरण या सर्व गोष्टी पाहून स्वतःचे बालपण आठवले.
आपण असं म्हणतो की लहान मुलं हे मातीचं भांड असतं. आपण जसं घडवू तसा ते आकार घेत असतं. मुलं मोठी होत असतानाच त्यांना सुख, दुःख, राग, लोभ यांची शिकवण पालकांकडून नकळत मिळत असते. याचा प्रत्यय देणारी नाळ ही एक कथा आहे.
चैत्याला त्याची आज्जी मेल्याचा काही गंधच नाही कारण त्याला त्यावेळी एक वेगळी ओढ खुणावत होती. किंवा चैत्या आणि त्याच्या आईमधील संवाद पण काही बाबी सांगून जातो. चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या प्रत्येक पात्रात, जागेत आणि एकूणच चित्रपटातील कथानकात एक आपलेपण आहे. एकदम हृदयस्पर्शी. त्यामुळे चित्रपट नक्की पहा...
मी काही परिक्षण करण्यासाठी म्हणून हे सर्व लिहिलेले नाही. त्यामुळे म्हणण्याचा उद्देश समजून घ्यावा. 
आपल्या कुटुंबासमवेत एकदा चित्रपट नक्की पाहा.

No comments:

Post a Comment